Serial Killer - 8 books and stories free download online pdf in Marathi

Serial Killer - 8

8

१३ तारखेला एकाच दिवशी चार खुन झाले होते . तीन खूण म्हणजे रेपिस्ट किलरने ( तोपर्यंत मीडियाने सिरीयल किलरचे नामांकन करून टाकलं होतं , रेपिस्ट किलर म्हणून ) केलेले आणि एक खूण म्हणजे साधना परांजपेचा . साधना परांजपेचा खून कोणी केला हा मात्र प्रश्न होता . मृतदेह व्यवस्थित होता . कुठे काही जखम झालेली नव्हती . प्रथम दर्शनी पाहिले असता विषप्रयोग झाल्यासारखा वाटत होता . बॉडी पोस्टमार्टम साठी पाठवण्यात आली . आता रात्री काही तपास करणे शक्य नव्हते . आम्ही आपापल्या घरी गेलो , पण दुसर्‍या दिवशी मात्र पोलीस स्टेशन वरती वादळ धडकणार होतं . दुसऱ्या दिवशी पाटील साहेबांकडून ती केस ऑफिशियल काढून घेण्यात आली व ती कदम साहेबांकडे सुपूर्त करण्यात आली . मागचे दोन दिवस कदम साहेब आम्हाला साहाय्यक म्हणून काम करत होते , मात्र आता आम्ही त्यांच्या हाताखाली काम करणार होतो . तसा हा आमच्या डिपार्टमेंटच्या प्रश्न होता आणि हे सर्व सिरीयल किंग प्रकरण आमच्या हद्दीखाली येत होतं , पण मीडियाचं प्रेशर आणि राजकीय नेत्यांचा दबावाखाली ते सर्व करण्यात आलं . मला वाटलं होतं पाटील साहेब भडकतील पण त्यांनी हे सर्व काही व्यवस्थित रित्या हाताळले . उलट जरा ते जबाबदारीतून सुटल्याप्रमाणे , मोकळे मोकळे वाटत होते . जणू काही त्यांना आनंद झाला असावा , कि मी या केस वरती नाही म्हणून...

कदम साहेबांनी भराभरा आदेश द्यायला सुरुवात केली . आम्ही सगळे कसून तपासाला लागलो . आमदार साहेबांच्या वेगवेगळ्या संस्थेतील कर्मचाऱ्यापासून तलाठ्यांने भाड्याने घेतलेल्या खोलीच्या मालकापर्यंत आम्ही सगळ्यांची चौकशी करायला सुरुवात केली . प्रत्येकाकडून काही ना काही माहिती मिळत होती . आम्ही ती नोंदवून घेत होतो आणि स्टेशन वरती येत होतो . आम्हाला पुढचा आदेश मिळायचा आणि आम्ही पुढच्या कार्याला जायचो . संध्याकाळपर्यंत आम्ही धावपळ केली आणि प्रत्येक गोष्ट कदम साहेबांकडे जात होती . कदम साहेब दिवसभर स्टेशनमध्ये बसून होते . आलेल्या माहितीवर analysis करण्याचं त्यांचं काम होतं म्हणे... पण स्टेशन वरती आलेल्या माहितीवरून त्यांनी छान पैकी थेरी तयार केली होती . जी त्यांनी आम्हाला संध्याकाळी सांगितली .

आता या सगळ्या गोष्टींची सुरुवात मागच्या आठ तारखेपासून म्हणजे साधारण आठवडाभरापूर्वी झाली . पण या सगळ्या गोष्टींची खरी सुरुवात साधारणपणे चार वर्षांपूर्वी झाली , ज्या वेळेस साधना परांजपे हिचा पहिल्यांदा संपर्क आला आमदार सदाशिवराव ढोले यांच्याशी . तसं साधना परांजपे हिचा आमदार सदाशिवराव ढोले यांच्याशी संपर्क येण्याचा संबंध नव्हता पण आमदार सदाशिवराव ढोले यांची समाजसेवी संस्था आहे , जी बऱ्याच रुग्णांना मदत करते . त्या संस्थेतर्फे साधना परांजपे हिचा आमदार सदाशिवराव डवले यांच्याशी संपर्क आला साधारणपणे चार वर्षांपूर्वी . साधना परांजपे हिला cervical cancer असल्याचे निदान झालं होतं , आणि ट्रीटमेंट साठी लागणारा पैसा उभा करणं शक्य नव्हतं . आई-वडिलांनी गरिबीतून वाढवलेली एकुलती एक लेक . घरी ना जमीनजुमला न साठवणीचा पैसा. कॅन्सर ट्रीटमेंट साठी तिला समाजसेवी संस्थांकडे जाण्यावाचून पर्याय नव्हता . त्याचवेळी आमदार सदाशिवराव ढोले यांचे एका समाजसेवी संस्थेत तिने अर्ज केला आणि पुढे तिचा संबंध आमदार सदाशिवराव ढोले यांच्याशी आला . त्यांच्या या समाजसेवी संस्थेत केलेल्या चौकशी नुसार तेथिल एका क्लार्कचे स्टेटमेंट पुढील प्रमाणे...
" सुरुवातीला साधना परांजपे हिने आमच्या संस्थेत कॅन्सरच्या उपचारासाठी लागणाऱ्या आर्थिक मदतीसाठी अर्ज केला होता . पण आमच्या संस्थेत इतक्या मोठ्या रकमेसाठी शक्यतो अर्ज क्वचितच द्यायचे , त्यामुळे त्यांना आमदार साहेबांकडे पाठवण्यात आलं . हळूहळू त्यांचा दोघांचा संपर्क वाढला आणि पुढे पुढे तर ज्या वेळी आमदार साहेब त्या आमच्या संस्थेत यायचे त्यावेळी त्या बेधडकपणे संस्थेत येऊ लागल्या आणि कोणतीही अपॉईंटमेंट न घेता आमदार साहेबांची भेट घेऊ लागल्या "

यासारखे अनेक स्टेटमेंट आपल्याला त्या संस्थेतील कामगारांनी दिलेली आहेत . यावरून आपण तीन अनुमान काढू शकतो . पहिला अनुमान म्हणजे साधना परांजपे ही आमदार सदाशिवराव ढोलेकडून मदत मिळावी म्हणून नियमितपणे त्या संस्थेकडे येत होती . दुसरं अनुमान म्हणजे आमदार सदाशिवराव ढोले हे साधना परांजपेला आर्थिक मदत करण्याची लालूच दाखवून लैंगिक शोषण करत होते . आणि तिसरा अनुमान म्हणजे साधना परांजपे ही स्वतःहून आमदार सदाशिवराव ढोले सोबत शारीरिक संबंध ठेवून मदत मिळवण्याच्या प्रयत्नात होती .

आता यातील कोणतीही गोष्ट खरी हे काही आपल्याला माहित नाही . कारण साधना परांजपेच्या पोस्टमार्टम रिपोर्टनुसार साधना परांजपे हिची साइनाइड खायला घालून हत्या करण्यात आलेली आहे . एक गोष्ट मात्र नक्की साधना परांजपे हिच्याकडे खून करण्यासाठी योग्य कारण होतं . ते म्हणजे साधना परांजपेला आमदार सदाशिवराव ढोले यांच्या तर्फे मदत नाकारण्यात आली होती . त्या संस्थेमध्ये त्या दोघांचं मोठं भांडण झाल्याचं तपासातून कळलं आहे . असा आपल्याला प्रश्न पडतो की हे सगळ चार वर्षांपूर्वी झालं मग आता साधना परांजपेनं आता का खून करण्याचं ठरवलं ... सोपे आहे . ज्या वेळी साधना परांजपे आमदार सदाशिवराव ढोले यांच्याकडे मदत मागण्यासाठी गेली होती त्यावेळी कॅन्सर हा त्याच्या प्राथमिक अवस्थेत होता पण आता तिचा मृत्यू काही महिन्यांवर आला होता . सर्विकल कॅन्सरचा सर्वायवल रेट भरपूर आहे , पण तो जर कॅन्सर प्राथमिक अवस्थेत निदर्शनास आला आणि प्राथमिक अवस्थेत त्याच्यावरती उपचार चालू झाले तरच . साधना परांजपे हेच या कॅन्सरचं निदान साधारणपणे चार वर्षांपूर्वी झालं होतं पण उपचाराविना कॅन्सर वाढत गेला आणि आता तिच्याकडे फार आयुष्य शिल्लक नव्हते . त्यामुळे उरलेल्या आयुष्यात तिने तिचा प्रतिशोधाचा प्लॅन तयार केला आणि त्यामध्ये कोणाची तरी मदत घेतली....

आता या ठिकाणी तुम्हाला बरेच प्रश्न पडू शकतील , ते म्हणजे साधना परांजपे हिने जर एवढा सगळा प्लान केला आणि कोणीतरी तिला मदत केली तो माणूस कोण...? आणि तिला जर फक्त माणिकराव लोखंडे , बाबुराव माने , सदाशिवराव ढोले आणि रमाकांत शिंदे या चौघांना मारायचं होतं तर तिने बस ड्रायव्हर चंद्रराव आणि निखिल या दोघांचा खून का केला...?

याही प्रश्नाचे उत्तर आपल्याकडे नाही . आपल्याला माहित असलेल्या गोष्टी म्हणजे साधना परांजपे हिने बदला घेण्यासाठी या चौघांना मारण्याचे ठरवले आणि तिला कोणीतरी मदत केली . त्या दोघांचा संपर्क कोणत्यातरी माध्यमातून होत असणार आहे . आपण साधना परांजपेच्या मोबाईल व टेलिफोनची मागच्या एक वर्षापासूनची नोंदणी मागवली आहे. तिला आलेले फोन कॉल्स आपल्याला तपासून पाहावे लागतील . त्यातून आपल्याला काहीतरी मिळेलच . आणि साधना परांजपेच्या परीचित सर्व व्यक्तींना बोलून घेऊन त्यांची चौकशी करायला हवी . एखाद्या वेळेस त्यांनी साधनाला कोणा अपरिचित व्यक्तीबरोबर पाहिलेलच असेल किंवा साधनाचं वागणं संशयास्पद वाटले असेल.... तरीही आपल्यापुढे अजून एक प्रश्न अनुत्तरितच राहतो तो म्हणजे जर साधना परांजपे या सार्‍या मागे असली आणि तिला कोणाचा तरी हात असला तर मग तिचा खून कोणी केला....? आणि का केला ...?

मला वाटलं होतं कदम साहेबांची थेरी काही उत्तरे मिळवून देईल पण तिने उलट अधिकच प्रश्न तयार केले . कदम साहेबांचं म्हणणं बरोबर होतं , साधना परांजपे जर या साऱ्यामागे असेल तर तिचा खून कोणी केला आणि का केला...?
क्रमःश....