Addiction - 2 - 8 books and stories free download online pdf in Marathi

एडिक्शन - पर्व दुसरे - भाग 8

पुन्हा एकदा मुंबई ...हळूहळू मागे एक - एक इमारत जाऊ लागली आणि अजिंक्य - मृणाल दोघेही आठवणींच्या जुन्या क्षणात हरवू लागले ..जस - जस ऐअरपोर्ट जवळ येऊ लागलं तस - तसा मृणालचा चेहरा बदलू लागला ..ती शांत होती पण मनात कुठेतरी भीतीने घर करून सोडलं होत ..कुणीतरी पुन्हा या शहरात आपल्याला ओळखेल आणि आपलं वर्तमान पूर्णतःच बदलून जाईल याची तिला भीती वाटत होती ..बऱ्याच प्रयत्नानंतर तिला जीवनसाथी , कुटुंब , आणि तिचाच अंश लाभला होता आणि त्यापासुन दुरावणे म्हणजे आयुष्याचा शेवटच होता ..तिच्या चेहऱ्यावर भीतीचे जाळे पसरले होते आणि अजिंक्यने तिच्या हातावर आपला हात ठेवला ..त्यात त्याचा विश्वास होता आणि तो हे सांगत होता की काहीही झालं तरी मी तुझ्या पाठीशी सदैव असेन ..मग घरचे सोबत असोत वा नसतो ..तुला दिलेला शब्द मी सर्वांचा विरोध करून देखील पाळणार आहे ..तिने त्याच्याकडे पाहिले आणि तिलाही हिम्मत आली ..तिने त्याच्या हातावर आपला दुसरा हात ठेवून तिला त्याच्यावर विश्वास असल्याची कबुली दिली ...

काहीच क्षणात प्लेन लँड झाले ..सामान घेऊन ते टॅक्सीपर्यंत पोहोचले ..एका वर्षाने जरी ते पुन्हा इथे आले असले तरीही जुन्या गोष्टी आठवून जणू त्या प्रत्यक्षात घडत आहेत अस वाटत होतं ..मृणालसोबत घालवलेले ते प्रत्येक क्षण तो आठवत होता..त्याला काहीतरी आठवल आणि तो गालातल्या गालात हसू लागला ..त्याला पाहुन मृणाल म्हणाली , " का रे अस वेड्यासारखं काय हसतो आहेस ? " आणि तो पुन्हा हसत म्हणाला , " तुझ्यावर हसतो आहे ? " आणि ती चेहऱ्यावर रुसवा आणत म्हणाली , " आता मी काय केलं बर ? ."

तो मागूनच तिचे गाल खेचत म्हणाला , " तुला आठवतंय मी प्रोजेक्टसाठी बाहेर गेलो आणि काम संपल्यावर तुला भेटता यावं म्हणून रात्रीच्या वेळी भेटायला आलो ..पण त्याच वेळी तुझी तब्येत खराब झाली ..का झाली हे तुला माहिती आहे ..तू जे केलं मला ते अजिबात आवडलं नाही आणि त्यावेळी मला तुझा खूप राग आलेला .रात्रभर तुझ्या चिंतेत सुखाची झोपसुद्धा लागली नव्हती त्यामुळे तू उठण्याची वाट पाहू लागलो ..सकाळी तुला जेव्हा शुद्ध आली तेव्हा दोन कानाखाली मारायला आलो पण तुझा बाळासारखा कोमल चेहरा पाहून शांत झालो ..अस पहिल्यांदाच झालं होतं की मी माझ्या रागाला इतपत सावरलं होत .." आणि ती शांत होत म्हणाली , " चूक माझीच होती मग मारलंस का नाही मला ? " आणि अजिंक्य लाडात येत म्हणाला , " मारलं असतस तर तू पळून गेली असती कुना दुसर्यासोबत ..मग काय फायदा..हो पण आताही संधी गेलेली नाही इच्छा झाली तर देईल दोन तीन ठेवून आणि आता पळून जाण्याच पण टेंशन नाही .." त्याच्या अशा बोलण्याने ती त्याच्या पाठीवर जोरा - जोराने मारू लागली ..आणि तो तिच्यावर पुन्हा जोराने हसू लागला ..समोर टॅक्सीचा ड्रायव्हर हे सर्व बघून हसत होता ..तरीही तिने त्याला मारन सोडलं नाही आणि या सर्वात जास्त खुश होती त्यांची मुलगी ..आई तिच्या बाबांना मारतेय हे बघून तिला फारच मज्जा येऊ लागली होती आणि ती आणखीच हसू लागली ..काहीच क्षणात आश्रम देखील आलं ..मृणाल प्रज्ञाला घेऊन आत जाऊ लागली तर अजिंक्य ड्रायव्हरला पैसे देऊ लागला आणि तेव्हाच ड्रायव्हर त्याला म्हणाला , " साब बहोत मस्त जोडी है आपकी ..पहली बार किसीं जोडी को लोगो के सामने खुलकर मस्ती करके देखा है .वरना यहा अपणेंही लोग अंजाण जैसे लागते है ...इससे पता चलता है की आप दोनो मे कितना प्यार बसा है ..मेरी दुआ है की आप ऐसें ही सदा खुश रहे .." अजिंक्यने त्याच्याशी हात मिळविला आणि तो आश्रमाकडे जाऊ लागला ...

काकू त्यांच्या येण्याची आतुरतेने वाट पाहत होत्या ..मृणालला पाहून त्या फारच खुश झाल्या ..भरपूर दिवसांनी आपल्या नातीला पाहिल्याने तिला छातीशी लावून काकूने चुंबनाचा वर्षाव सुरू केला ..तर अजिंक्य दाराच्या आत येतच म्हणाला , " नात मिळाली तर आमच्याकडे कुणाच लक्ष पण जात नाही राव !! " आणि काकूही मृणालकडे पाहत म्हणाल्या , " कस आहे न मृणाल माझ्या मुलालाच माझी काळजी नाही तर मी तरी का बोलावं तिच्याशी ? " आणि मृणाल पटकन बोलून गेली , " ए आई तू आणि तुझा मुलगा काय आहे ते पाहुन घ्या ..माझ्यावर काही आणू नका ..उद्या तुम्हीच एकत्र याल आणि उगाच माझ्यावर सासुरवास ..त्यापेक्षा मी इथे वेगळीच बरी.." तिच्या अशा बोलण्याने सर्वच जोराने हसू लागले ..काकने प्रज्ञाला मृणालच्या हातात दिले आणि क्षणात जाऊन अजिंक्यला आपल्या मिठीत घेतले ...त्याला भेटताच तिच्या डोळ्यात अश्रू येऊ लागले आणि ती म्हणाली , " तू सोबत होतास तेव्हा कामाच ओझं फार कमी होत आता या म्हातारीला या वयात काम करणं कस परवडणार ? ..जेव्हा सोबत होतास तेव्हा तुझ्याशी मनातलं बोलू शकायचे पण आता एकटीच झुरत असते ..खुप आठवण येते रे तुझी ..आज इथे आलास त्याचा मला फार आनंद आहे ..खूप बरं वाटतंय तुम्हा सर्वांना इथे बघून .." एव्हाना अजिंक्यच्याही डोळ्यात अश्रू आले होते आणि तो काकूंना म्हणाला , " सॉरी काकू कामात एवढा गुंतलो होतो की यातलं काहीच लक्षात आलं नाही ..आता आठवणीने रोज एक फोन नक्कीच करेन ..मग मस्त बोलू वाटल्यास तुझ्या सुनेच्या चुगल्या पण करू .." डोळ्यात अश्रू आणि ओठांवर हसू आवरत काकू म्हणाल्या , " तू ना कधीच सुधारणार नाहीस ..अशक्य म्हणजे अशक्य आहेस तू .."

काकूंनी लग्नच केलं नसल्याने संसारसुख त्यांनी कधीच अनुभवलं नव्हतं पण अजिंक्य - मृणालच्या रुपात त्यांना दोन मुले भेटली होती ..सोबतच होती ती नात ..जी तिला प्रत्येक वेळी आनंदी ठेवायची ..अजिंक्यला जरी वेळ मिळत नसला तरीही मृणाल मात्र काकूंना आठवणीने फोन करायची आणि दोघेही तासंतास गप्पा मारायचे ..कितीतरी मुलांना आसरा देणाऱ्या त्या माउलीला आपलं म्हणावं अस कुणीच नव्हतं आणि तेच प्रेम या दोघांकडून ती मिळवू लागली ..अजिंक्य - मृणाल आज खूप दिवसांनी परत आल्याने ती स्वताच आपल्या हातानी त्यांना वाढत होती ..शरीर जरी साथ देत नसलं तरी तीच मन आताही आपल्या मुलांसाठी खूप काही करण्यास उत्सुक होत ..प्रज्ञाला तर तिने क्षणांसाठी सोडलं नव्हतं ..तर आजूबाजूला छोट्या - छोट्या मुलांना बघून मृणाल आनंदाने गजबजली होती ..अजिंक्य घोडा बनून सर्वाना फिरवू लागला ..आज वातावरण कस प्रसन्न झाल होत ..जिकडे - तिकडे हसण्याचे आवाज , आनंदाचे फवारे उडू लागले होते आणि किलबिल अनाथ आलंय आज खऱ्या अर्थाने आनंद देणार घर जाणवू लागल ..काकू आज आपल्या नातीला घेऊन निवांत बसून होत्या तर मृणाल - अजिंक्य तीच छोट्यात - छोटं काम करीत होते ..साधा पाण्याचा ग्लास उचलण्याची तिला आज परवानगी नव्हती ..आजचा हा सुंदर नजारा काकूंच्या पापण्या नकळत ओल्या करीत होता ...

दुपारची सायंकाळ झाली होती ..काकूंचा उद्या सत्कार असल्याने त्यांच्या मैत्रिणीनी त्यांना स्वतःकडे बोलावून घेतले होते शिवाय प्रज्ञालाही त्या सोबत घेऊन गेल्या होत्या .तशी प्रज्ञा मनमिळाऊ ..अगदी सहज कुणाकडेही जाई त्यामुळे फार कमी रडत असे ..सहज कुणाकडेही जाऊन दिवसभर त्यांच्याशी खेळत बसणं तिला आवडायचं पण एकदा आईवडिलांची आठवण झाली की मग मात्र शांत बसत नसे ..काकू फक्त दोन तासासाठीच तिला बाहेर घेऊन गेली असल्याने तिची काहीच चिंता नव्हती ..मृणाल - अजिंक्य आता दोघेच आश्रमावर होते ..अजिंक्यच्या डोक्यात काहीतरी विचार आला आणि तो सरळ मृणालकडे पोहोचला ..मृणाल फ्रेश होऊन निवांत बसली होती ..अजिंक्य सरळ तिचा हात पकडून तिला रूममधून बाहेर घेऊन जाऊ लागला ..ती त्याला बरच काही विचारत होती पण तो काहीच बोलायला तयार नव्हता .तिला त्याच्या अशा स्वभावाची फार जवळून ओळख होती त्यामुळे तिने त्याला आता काही विचारणच बंद केलं ..काकूंची कार आश्रमात एका कोपर्याला पार्क करून होती ..त्याने लगेच गाडी सुरू केली आणि गाडी भर वेगाने रस्त्यावर धावू लागली ..अजिंक्य जेव्हा - जेव्हा असा वागत असे तेव्हा त्याच्या डोक्यात काहीतरी नक्कीच शिजत असे हे तिला माहिती होत त्यामुळे ती थोडी बिनधास्त झाली ..तस पाहता अजिंक्यच नेहमीच तिच्याकडे लक्ष असायच पण आज तो फक्त गाडीकडे लक्ष देतोय हे बघून ती थोडी हिरमुसली ..आणि त्याच क्षणी तिला गम्मत सुचली ..तिने स्वतःचे बांधलेले केस मोकळे केले आणि हळूच गाडीची काच खाली केली ..वाऱ्याने तिचे केस अजिंक्यच्या चेहऱ्याला स्पर्श करू लागले ..आणि ती आपलं सुंदर मुख आरशात पाहू लागली ..अजिंक्य तसा रोमँटिक ..पण त्याला तिच्या केसांमुळे गाडी चालवण्यात लक्ष लागत नसल्याने तो नाराज होत म्हणाला , " हे काय ? ..गाडी चालवू दे की नाहीतर दोघेही ढगात पोहोचू .." आणि ती त्याच्याकडे डोळे मोठे करत म्हणाली , " कुणाला तरी मला मोकळ्या केसात पाहायला आवडत म्हणून केस मोकळे ठेवले तर बघा कसे बोलत आहात ..शी बाई नकोच एवढं प्रेम कुणावर .आज काल ना कुणाला आमच्या प्रेमाची कदरच नाही .." आणि ती पुन्हा केस पुन्हा बांधू लागली ..त्याच क्षणी अजिंक्यचा एक हात तिला थांबविण्यासाठी समोर यावा आणि ती तशीच थांबली ..ती त्याच्याकडे पाहू लागली ..डोळ्यांनी डोळ्यांची ती सुंदर भाषा स्वताच हेरली आणि काहीच न बोलता तिचा रुसवा क्षणात नाहीसा झाला ..ती खुश होती त्याच्या अशा वागण्याने शेवटी कधी कधी प्रेमाला शब्दांची गरज नसते हेही तितकंच खरं ..काहीच वेळात गाडी थांबली ..

गाडी पार्क करून अजिंक्य मृणालकडे आला ..एव्हाना मृणाल दुरवरूनच त्या निळाशार समुद्राकडे पाहुन थक्क झाली होती ..अजिंक्य सोबत आल्यावर ती त्याच्या सोबत चालू लागली ..काहीच क्षणात ते दोघेही समुद्रकिनारी पोहोचले ..एकमेकांचा हात हातात धरून ते समुद्राच्या थंडगार पाण्यात दरवळू लागले ....दोघांचेही पावले रेतीवर उमटायची आणि नंतर समुद्राच्या शांत पाण्याने ती पून्हा पुसली जायची असा समुद्र आणि त्यांचा सुंदर खेळ सुरू होता आणि त्या सुंदर क्षणांची मज्जा त्यांच्या चेहऱ्यावर जाणवू लागली ..बाजूला कितीतरी लोक असताना तिने त्याचा हात घट्ट धरून ठेवला होता ..कितीतरी लोक त्यांच्याकडे पाहत होते पण ते या क्षणात इतके हरवले होते की त्यांना जगाच भानच उरलं नव्हतं ..हळूहळू ते दोघेही पाण्यातून बाहेर निघू लागले ..रेतीचा मुलायम स्पर्श अनुभवत ते बाजूला जाऊन बसले ..तिने त्याचा आताही हात सोडला नव्हता ..आणि मृणाल म्हणाली , " अजिंक्य तुला इतक्या भन्नाट कल्पना सुचतात तरी कशा ? ..काय मस्त क्षण आहेत ना हे ? हा शांत समुद्र आणि त्यात एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे आपण..दोघानाही प्रेमाच्या मर्यादा नाहीत आणि निरंतर वाहत असतात ..व्हा !! तुला माहिती आहे अजिंक्य मी आयुष्यात फार तर स्वप्ने पाहिली नाहीत पण एक स्वप्न नेहमीच पाहत आली आहे ..आपल्या हमसफर सोबत हातात हात टाकून समुद्रकाठी निवांत बसने ..हे स्वप्न कधी पूर्ण होईल असं वाटलं नव्हतं पण न बोलता हेही स्वप्न तू पूर्ण केलंस ...खूप मोठा जादूगर आहेस तू ..जो माझ्यासारख्या मुलींना मोहिनी घालतोस आणि आम्हाला माहिती असतानाही आम्ही त्यात गुंतल्या जातो ..सांग की कस ओळ्खतोस इतकं बायकोच्या मनातलं ? " अजिंक्य तिच्यावर हसत म्हणाला , " कस आहे मॅडम ..स्वप्न फक्त बायकोच पाहत नाही ..नवरा पण पाहतो ...माझ्याही डोक्यात होत समुद्रकिनारी बसून ..पाण्यात पाय घालून तुझ्याशी गप्पा मारण फक्त सांगणं राहूनच गेलं ..आपल्या संगिनीसोबत कुणाला हे क्षण नकोसे असतील .हेच तर क्षण असतात जे त्यांच्यातलं नात घट्ट करतात नाही तर बाकी वेळी त्यांना इतरांसाठी जगावं लागत सो लग्न झाल्यानंतरही लपून छपून जगणं असावंच ..आणि त्यातही आवडता साथीदार असला की मग मात्र जग काय म्हणेल याची चिंता वाटत नाही आणि मॅडम प्रेम मीही केलंय तुझ्यावर तेव्हा तुझी सारी स्वप्न आता माझी आहेत ..मग ते बोलून दाखव किंवा मग मी डोळ्यात शोधून घेईल ..ए पण एक राहीलच की मला न याक्षणी गाणंही गायच आहे तुझ्यासोबत ..हातात हात घेऊन? " आणि ती म्हणाली " कुठलं गीत ? "

त्याने तिचा हात हातात धरला आणि काही ओळी त्याच्या ओठांवर आपसूकच आल्या ..

हा सागरी किनारा
ओला सुगंध वारा
ओल्या मिठीत आहे
हा रेशमी निवारा ..

हा सागरी किनारा
ओला सुगंध वारा
ओल्या मिठीत येतो
अंगावरी शहारा ..

मी कालचीच भोळी
मी आज तीच वेडी
ही भेट वेगळी का
न्यारीच आज गोडी
का भूल ही पडावी
ओळखून घे इशारा ..

हा सागरी किनारा ....

होतो अजाणता मी
ते छेडले तराने
स्वीकारल्या सुरांचे
आले जुळून गाणे
हा रोम रोम गाई
गातो निसर्ग सारा
ओल्या मिठीत आहे अंगावरी शहारा

हा सागरी किनारा ...

बोले मुकेपणाने
होकार ओठ देती
नाती तनामनांची
ही एकरूप होती
एकांत नाचत हा
फुलवूनिया पिसारा ..
ओल्या मिठीत आहे अंगावरी शहारा

हा सागरी किनारा ..

" अजिंक्य किती फिल्मी आहे न हे सर्व " , ती म्हणाली आणि त्यावर अजिंक्य म्हणाला , " आयुष्य खूप दुखदायी आहे ..हवं तसं फार कमी वेळेस मिळत तेव्हा ती सारी स्वप्न आपल्याला इतरांच्या माध्यमातून जगायला आवडतात ..म्हणून हे फिल्मी असणं देखील फार आवडीच वाटू लागतं ..हो पण फार हिम्मत लागते बर का अस फिल्मी जगायलाही .." आणि लोक समाजाच्या भीतीने हे क्षण जगायचे राहून जातात ..

मृणाल त्याच्या अशा बोलण्यावर हसू लागली ...बोलताना बराच वेळ झाला होता ..अंधारही पडू लागला त्यामुळे ते दोघेही घराकडे निघू लागले ..ते निघालेच होतेकी मागून एक पुरुष मृणालला आवाज देत होता ..तिने मागे वळून पाहिलं तेव्हा तिला जाणवलं की हा तोच मुलगा आहे ज्याने तिला या व्यवसायात आणलं होतं ..त्याला बघून तिने अजिंक्यचा हात घट्ट धरला ..मृणाल तिथेच थांबली असल्याने तो तिच्या बाजूने येऊ लागला..तो एक - एक पाऊल समोर टाकत होता आणि तीच संपूर्ण शरीर थरथरायला लागलं ..


क्रमशः