Addiction - 2 - 11 books and stories free download online pdf in Marathi

एडिक्शन - पर्व दुसरे - भाग 11

मुंबईहून परतल्यावर लगेच दुसऱ्या दिवशी अजिंक्य ऑफिसला जॉइन झाला ..बॉसने मिटिंग घेऊन पून्हा एक नवीन साईट मिळाल्याची बातमी दिली ..आनंदाची बातमी एकूण सर्व खुश होते फक्त अजिंक्यला आनंद झाला नव्हता ..नवीन प्रोजेक्ट म्हणजे पुन्हा जास्त मेहनत आणि जास्त वेळ द्यावा लागणार होता त्यामुळे तो थोडा नाराज झाला ..सराणी ह्याही प्रोजेक्टच काम अजिंक्यकडे सोपवल होत ..आणि विशेष म्हणजे हे प्रोजेक्ट हेद्राबादला पूर्ण करायचं होतं ..त्यामुळे प्रत्येक आठवडयाला दोन दिवस तरी तिथे जाऊन राहावं लागणार होतं आणि म्हणूनच अजिंक्य थोडा नाराज झाला ..

मुंबईहून परतल्यावर अजिंक्य आपल्या कामात फारच व्यस्त झाला होता ..सकाळी उठून लवकर ऑफिसला जाणे आणि सायंकाळी उशिरा परतणे हा त्याचा दिनक्रम झाला ..एवढंच काय तर घरी आल्यावरसुद्धा तो केवळ ऑफिसचच काम करीत बसायचा ..आई - वडिलांवर लक्ष नव्हतं की स्वतःच्या मुलीवर मग बायको तर फार दूरच राहिली ..तरीही मृणाल त्याला एक शब्द उलटून बोलत नव्हती ..एका मुलाने पूर्ण करावयाच्या त्याच्या सर्व जबाबदाऱ्या ती स्वतः पार पाडत होती आणि तीच काम आणखीच वाढू लागल ..दिवसभर कामात व्यस्त असल्यावर रात्रीच्या प्रहरी अजिंक्यशी काही वेळ बोलावं अस तिला वाटायचं पण अजिंक्य एक तर काम करत बसलेला असायचा किंवा मग थकल्याने सरळ झोपून जायचा ..तिच्याशी गप्पा मारायला आईबाबा असले तरीही ती मनातून खचत चालली होती आणि याबद्दल अजिंक्यला कुठलीही कल्पना नव्हती रॅदर दॅन त्याला आपल्या कामातून वेळच मिळत नव्हता ..

असेच दोन महिने निघून गेले होते ..आज अजिंक्य सकाळी - सकाळीच ऑफिसला निघून गेला होता ..मृणाल त्याला नाश्ता करण्याविषयी सांगत होती पण उशीर झाल्याने तो तीच काहीच न ऐकता सरळ ऑफिसला निघून गेला ..अजिंक्य जरी ऑफिसला पोहोचला होता तरीही मृणालला त्याची फार काळजी वाटत होती ..सकाळची दुपार झाली होती पण तिच्या डोक्यातून त्याचा विचार काही गेला नाही ..मृणाल आपले काम आटोपून निवांत बसली ..अजिंक्यने काही खाल्लं की नाही याची चौकशी करण्यासाठी ती त्याला फोन लावत होतीं पण अजिंक्य मात्र कॉल रिसिव्ह करत नव्हता आणि मृणालची अधिकच चिडचिड होऊ लागली ..मृणालने दोन तीनदा कॉल केल्यावर समोरून कॉल रिसिव्ह केला गेला पण अजिंक्य बोलण्याएवजी रिया बोलू लागली , " मृणाल सॉरी ..अजिंक्य प्रेझेन्टेशन देतोय आणि त्याने तुला नंतर कॉल करेन म्हणून सांगितलंय .." मृणालनेही तीच बोलणं ऐकून फोन ठेवून दिला पण तिला त्याचा फारच राग आला होता ..दुपारच्या जेवणाची वेळ होऊन गेली होती ..मृणालने कॉल करून जवळपास तासभर झाला होता ..अजिंक्य परत आपल्याला कॉल करेन म्हणून ती फोनजवळ चिपकुन बसली पण त्याचा फोन आला नाही शिवाय त्यांने एक साधा मॅसेज सुद्धा केला नाही ..त्याच्या फोनची वाट पाहत - पाहतच तिचा डोळा लागला ..

प्रज्ञाच्या रडण्याचा आवाजाने तिची झोप उघडली ..ती वॉशरूममधून चेहऱ्यावर पाणी घेऊन हॉलमध्ये परतली ..घड्याळीकडे नजर टाकली तर सायंकाळचे 6 वाजले होते ..तर प्रज्ञा आजोबांकडे खेळत होती ..आईने तिला चहाचा कप दिला आणि काही क्षण दोघेही गप्पा मारू लागले ...आई तिची तब्येत बरी आहे की नाही याची विचारपूस करीत होत्या आणि तीही आईच्या बोलण्यावर होकारार्थी मान डोलावत होती ..सहा चे साडे सहा वाजले ..तिने पुन्हा एकदा मोबाइल चेक केला पण अजूनही अजिंक्यचा मॅसेज आला नव्हता ..ती त्याच्यावर नक्कीच नाराज होती पण त्याहीपेक्षा तिला त्याची जास्त काळजी वाटत होती ..अजिंक्यने सकाळपासून काहीच खाल्लं नसेल आणि तो आल्यावर जेवणासाठी ओरडेल म्हणून तिने लगेच जेवणाची तयारी करायला घेतली ..आज साहेबाना काहीतरी स्पेशल द्यावं अस तिच्या मनात होत त्यामुळेच साहेबांची आवडती पुरी भाजी आणि सोबत दह्याची कढी बनवायला तिने घेतली ..तो येईल म्हणून तिने लवकरच स्वयंपाक आटोपला ..जेवण बनवून तयार झालं होतं आणि तिची नजर आताही दारावर होती पण अजिंक्य येण्याची काहीच चिन्हे दिसत नव्हती ..वाट पाहून पाहून घरचे थकले होते आणि त्यांनी जेवण करून घेतलं ..घरच्यांनी मृणालला पण जेवायला सांगितलं पण तिला त्याच्यासोबत जेवायचं असल्याने तिने जेवणासाठी नकार दिला होता ..साडे सातचे साडे नऊ झाले होते ..ती टीव्ही पाहत बसली पण एक नजर आताही त्याच्याकडेच होती ..शेवटी बऱ्याच वेळाने कारचा आवाज आला आणि ती मनोमन खुश झाली ..अजिंक्य फ्रेश होऊन येईल म्हणून तिने जेवण पुन्हा गरम करायला घेतलं ..जेवण करून झालं आणि ती पुन्हा बेडरूममध्ये पोहोचली ..अजिंक्य फ्रेश होऊन पुन्हा काही फाइल्स चेक करू लागला ..मृणाल त्याच्या समोर जात म्हणाली , " सकाळपासून काही खाल्लं नसेल न तू चल सोबतच जेवून घेऊ .." आणि तो फाइल्समध्ये नाक खुपसत म्हणाला , " सॉरी बाहेरच काम होत सो आम्ही सर्वच बाहेर जेवण करून आलोय .." तिला त्याचा आणखीच राग आला होता ..तो सकाळपासून उपाशी असेल म्हणून तीनेसुद्धा काहीच खाल्लं नव्हतं आणि तो आला की सोबतच जेवण करू अस तिने ठरवलं होतं पण तो बाहेरूनच जेवण करून आल्याने तिचा मूड खराब झाला पण तिने त्याला त्यातलं काहीच कळू दिलं नाही ..अजिंक्य जेवण करून आल्याने तिची जेवणाची इच्छा उडाली आणि तिने सर्व जेवण तसच ठेवून दिलं .

किचनमधील आवरून ती पुन्हा बेडरूमला पोहोचली ..बरेच दिवस ते एकमेकांशी दिलखुलासपणे बोलले नव्हते त्यामुळे मृणाल अजिंक्यला म्हणाली , " खूप झालं काम राजे ..किती काम करणार आणखी ..बरेच दिवस झाले आपण निवांत बोललो नाही सो चला पंधरा मिनिटे बाहेर फिरून येऊ .." अजिंक्यने तिच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नव्हतं ..तेव्हा मृणाल रागातच म्हणाली , " अजिंक्य मी काही म्हणाले तुला ..काही बोलणार आहेस का ? " आणि अजिंक्य म्हणाला , " मला काम आहेत भरपूर उद्या हेद्राबादला जायचं आहे सात दिवसासाठी ..सो मला नाही जमणार तू ये जाऊन .." तिला त्याचा राग आला आणि ती त्याचा हात धरून खेचू लागली आणि अजिंक्य ओरडतच म्हणाला , " मृणाल समजत नाही का तुला ? मी काम करतोय ना ? बघ तुझ्यामुळे फाइल्स कशा विखुरल्या आहेत .." अजिंक्यचा आवाज इतका निघाला की तिने त्याचा हात क्षणात सोडला ..तिच्या डोळ्यातून फक्त अश्रू यायचे बाकी होते ..तरीही त्याच लक्ष मृणालकडे नव्हत ..मृणाल आपली नजर चोरत हॉलमध्ये येऊन टीव्ही पाहू लागली ..अजिंक्य आताही आपल्या कामात व्यस्त होता ..अजिंक्यच काम संपलं तेव्हा बारा वाजले होते ..त्यांनी बाहेर येऊन पाहिलं तर मृणाल टीव्ही पाहत होती ..मृणाल नॉर्मल असल्याचं त्याला जाणवलं आणि तो सरळ बेडरूमला जाऊन झोपला ..इकडे मृणालच्या डोळ्यात अश्रू होते जे अजिंक्यला दिसले नव्हते ..टीव्ही पाहणे फक्त एक बहाणा होता खर कारण म्हणजे तिला आपले अश्रू लपवायचे होते ..तीही काही वेळात बेडरूमला पोहोचली ..अजिंक्य झोपी गेला होता ..त्यांच्या अंगावर चादर ओढत तीही बेडवर पडली पण पोटात जेवण नसल्याने शिवाय अजिंक्यच्या अशा वागण्याने तिला रात्रभर झोप लागली नव्हती ..ती करवट बदलत बदलत रात्र काढू लागली आणि शेवटी कामाच्या थकण्याने पहाटे - पहाटे तिला झोप लागली

दुसऱ्या दिवशी मृणालला सकाळी उठायला उशीर झाला ..मृणाल उठली तेव्हा अजिंक्य घरी नव्हता ..आईला विचारल्यावर तिला समजलं की तो काही दिवसांसाठी हेद्राबादला गेला आहे ..अजिंक्य तसा नेहमीच तिची भेट घेतल्यावरच बाहेर जात असे पण आज तिला न भेटताच निघून गेला त्यामुळे तिची सकाळच खराब झाली होती ..तिला त्याचा राग आला असल्याने ती त्याला फ़ोन करणार नव्हती पण त्याचा परिणाम तिच्या वागण्यावर होऊ लागला ..सकाळपासून काम करीत असताना एकही काम योग्य पद्धतीने झालं नव्हतं तर आमटी उतरविताना संपूर्ण गंजच खाली पडला आणि काही आमटी तिच्या हातावर देखील पडली ..आई क्षणातच तिच्याजवळ पोहोचली ..गरम - गरम आमटी हातावर पडल्याने तिला फारच त्रास होत होता ..आणि आई सरळच तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली ..हाताला बँडेज केल्याने तिला बर वाटत होतं पण मनात चाललेली घालमेल मात्र कुठेच कमी झालेली नव्हती ...तीच आज कशातच लक्ष लागत नव्हत ..

दुपारपासून सायंकाळपर्यंत ती एकटीच बसून होती ..प्रज्ञा आपल्या आजी - आजोबांकडे खेळत होती ..तर मृणाल आपल्या विचारात हरवली होती ..आज पहिल्यांदाच अजिंक्य तिच्यावर रागावला होता आणि ती जणू तुटायला लागली होती ..आजपर्यंत अजिंक्य तिची हिम्मत होता पण त्याच्या अशा वागण्याने ती फारच खचली ..डोक्यात नको त्या विचारांनी थैमान घालायला सुरुवात केली होती ...

सकाळची दुपार आणि दुपारची सायंकाळ झाली ...आईने काम करण्यापासून नकार दिला असल्याने ती फिरायला बाहेर एकटीच निघाली होती ..फिरताना काही मैत्रिणी भेटल्या आणि काही क्षणांसाठी तीच लक्ष त्यावरून हटल ..त्यांच्या गप्पात ती देखील सामील झाली ..दिवसभर तिच्या विचारांनी तिच्यावर वर्चस्व निर्माण केलं होतं पण बाहेर फिरून आल्याने ते सर्व विचार बाहेर फेकल्या गेले ..अजिंक्य असा नाही , त्याला कुठलं टेंशन असेल म्हणून तो असा वागला अशी तिने स्वताची समजूत करून घेतली आणि अजिंक्यच्या सुंदर आठवणीत ती त्याच्यावरचा राग विसरू लागली ..फिरून परत आली तेव्हा जेवणाची वेळ झाली होती ..मृणालची जेवणाची इच्छा नव्हती तरीही आईने तिला जेवण करायलाच लावलं शिवाय प्रज्ञा तिला त्रास देईल आणि तिच्या हाताला त्रास होईल म्हणून आईने प्रज्ञाला आपल्या सोबतच झोपवलं होत ..जेवण करून ती बेडरूममध्ये पोहोचली आणि मोबाइल हातात घेतला त्यावर कुणाचा तरी मॅसेज आल्याचं दिसत होतं ..तिने मॅसेज ओपन केला ..तर मॅसेजमध्ये अजिंक्य कालच्यासाठी सॉरी म्हणाला होता ..त्याचा सॉरी हा मॅसेज बघून ती फारच आनंदित झाली आणि न राहवता तिने त्याला फोन लावला ..रिंग जात होती पण समोरून फोन रिसिव्ह झाला नाही आणि तिने पुन्हा दुसऱ्यांदा फोन लावला यावेळी मात्र फोन रिसिव्ह केल्या गेला ..ती आनंदाच्या भरात अजिंक्यला आय लव्ह यु म्हणून गेली तर समोरून रिया हसत म्हणाली , " मृणाल आधी बघून तरी घे समोर कोण आहे तर ..नवऱ्याची एकाच दिवसांत इतकी आठवण येत आहे का ?..मी रिया आहे ..अजिंक्य बाहेर मित्रांसोबत गप्पा मारत बसला आहे ..तू म्हणशील तर देते फोन " आणि मृणाल शांत होत म्हणाली , " सॉरी रिया मला आधी विचारायला हवं होतं आणि त्याला नको देऊ फोन ..उगाच कशाला व्यत्यय.मीच ठेवते फोन .." रिया समोर काही बोलणार तेवढ्यात मृणालने रागात फोन कट केला ..

अजिंक्यचा एक मॅसेज आणि तिच्या चेहऱ्यावर हसू परतल पण रियाने कॉल रिसिव्ह करताच ते हसू आपोआप गायब झाल ..रिया जरी तिच्याकडे अजिंक्यबद्दल खूप काही बोलली होती तरीही तिच्या मनात आज वेगवेगळ्या शंका जन्म घेऊ लागल्या ..रिकाम डोकं शैतानाच घर होऊ लागलं आणि त्यात नकोते विचार येऊ लागले ..त्यांच्या नात्यात पहिली ठिणगी या वादाच्या रूपाने पडली आणि मृणाल फारच खचून गेली ..कदाचित ही वादळापूर्वीची शांतता होती जी थोड्यावरच थांबणार नव्हती ..


क्रमशः ...