Navnath Mahatmay - 7 books and stories free download online pdf in Marathi

नवनाथ महात्म्य भाग ७

नवनाथ महात्म्य भाग ७

तिसरा अवतार “ गहिनीनाथ”
==============
नवनाथांपैकी एक असलेले गहिनीनाथ हे निवृत्तीनाथांचे गुरू होते.
गहिनीनाथांचा मातीच्या पुतळ्यापासून जन्म झाला होता .
मधुनाभा ब्राह्मणाकडून त्यांचे संगोपन झाले होते .
त्यांच्या जन्माची कथा अशी आहे .

कनकागिरी गावात मच्छिंद्राने गोरक्षनाथास उपदेश करून सर्व वेदशास्त्रांत प्रवीण केले, चौदा विद्याहि त्यास पक्क्या पढविल्या.
सकल अस्त्रात वाकबगार केले.
साबरी विद्या शिकविली व सर्व देवाच्या पायांवर त्यास घातले.
नरशी, कालिका, म्हंदा, म्हैशासुर, झोटिंग वेताळ, मारुती, श्रीराम इत्यादिकांची दर्शने करविली.
जेव्हा रामाची भेट झाली, तेव्हा रामाने गोरक्षनाथास मांडीवर बसवून आशीर्वाद दिले.
बावन्न वीरांसहवर्तमान श्रीराम, सूर्य, आदिकरून सर्वांनी गोरक्षास वरदाने दिली व त्यास तपाला बसविण्यासाठी मच्छिंद्रनाथास सांगून ते आपापल्या ठिकाणी गेले.

एके दिवशी गोरक्षनाथ संजीवनीमंत्र पाठ करीत बसला होता.
जवळ मच्छिंद्रनाथ नव्हते .
तो एकटाच त्या ठिकाणी बसला आहे ही संधी साधुन गावची मुले खेळत खेळत त्याच्या जवळ गेली.
ती मुले चिखलाचा गोळा घेऊन आपसात खेळत होती.
त्यांनी गोरक्षास चिखलाची गाडी करावयास सांगितले, पण त्याने आपणास गाडी करता येत नाही म्हणून सांगितल्यावर ती मुले आपणच करू लागली.
त्यांनी चिखलाची गाडी तयार केली.
त्या गाडीवर बसावयासाठी एक गाडीवान असावा असे त्या मुलांच्या मनात येऊन ती चिखलाचा पुतळा करू लागली, परंतु त्यांना साधेना, म्हणून ती एक मातीचा पुतळा करून देण्याविषयी गोरक्षनाथाची प्रार्थना करू लागली.
त्याने त्यांची ती विनवणी कबुल केली व चिखल घेऊन पुतळा करावयास आरंभ केला.

गोरक्षनाथ जो चिखलाचा पुतळा करील त्यापासून गहिनीनाथाचा अवतार व्हावयाचा, वगैरे संकेत पूर्वी ठरलेला होता.
त्या अन्वये त्यास पुतळा करून देण्याची बुद्धि उत्पन्न झाली.
नवनारायणांपैकी करभंजन हा अवतार ह्या मातीच्या पुतळ्यापासून व्हावयाचा होता , म्हणून गोरक्षास तशी बुद्धि होऊन त्याने पुतळा करावयास घेतला.
त्या वेळी गोरक्षचा मुखाने संजीवनी मंत्राचा पाठ चालला होता.
संपूर्ण पुतळा तयार झाला अशी संधी पाहून करभंजनाने त्यात प्रवेश केला.
तेव्हा अस्थी, त्वचा, मांस, रक्त इत्यादि सर्व होऊन मनुष्याचा तेजःपुंज पुतळा बनला.
आणि मग जीवित झाल्यावर तो रडू लागला.
हा रडण्याचा आवाज जवळ असलेल्या मुलांनी ऐकला.
तेव्हा गोरक्षनाथाने भुत आणले असा त्या मुलांनी बोभाटा केला व लागलीच सर्वजण भिऊन पळून गेले.
पुढे मार्गात मच्छिंद्रनाथाशी भेट होताच, त्याने त्या मुलास भिण्याचे आरडा ओरड करून लगबगीने धावण्याचे कारण विचारले.
तेव्हा पुतळ्याची हकीकत मुलांनी सांगितली.

मुलांचे कथन ऐकून मच्छिंद्रनाथ विस्मयात पडले व काय चमत्कार आहे तो आपण स्वतः डोळ्यांनी पहावा असे त्याने मनात आणले.

मच्छिंद्रनाथास मुलांनी दुरून ठिकाण दाखवले .
तेथून एक मुलाचे बोलणे त्यांना ऐकू येऊ लागले .
तेव्हा हा करभंजन नारायणाचा अवतार झाला, असे मच्छिंद्रनाथाने समजून मुलास उचलून घेतले व ते मार्गाने चालू लागले .
गोरक्षनाथाने पुतळा तयार केला असूनही तो मात्र कुठेच जवळ दिसेना, म्हणून मच्छिंद्रनाथ मुलास घेऊन जात असता, गोरक्षनाथास हाका मारीत चालले .
ती गुरूंची हाक ऐकून गोरक्ष एका घरात लपला होता तेथून बाहेर आला.
पण मच्छिंद्राच्या हातातील मुलास पाहताच त्याला भीती वाटली.
त्याची गुरूजवळ येण्याची हिंमत होईना.
हे बघुन गोरक्षास भय वाटते आहे असे मच्छिंद्रनाथ समजले .
मग त्यांनी त्या मुलास चिरगुटात गुंडाळून ठेवले व गोरक्षापाशी जाऊन सांगितले की, हा मनुष्य आहे व तो नवनारायणापैकी एक नारायणाचा अवतार आहे.
मग गोरक्षानेही काय काय प्रकार झाला होता तो तपशीलवार सांगितला.
ते सर्व ऐकून मच्छिंद्रनाथास आनंद झाला जसा तु गोबरामध्ये झालास तसाच तु स्वतः संजीवनी मंत्र म्हणून हा पुतळा केलास.
त्यात करभंजन नारायणाने संचार केला आहे.
तो भूत नसून मनुष्य झाला आहे.
अशी साद्यंत हकीगत सांगून मच्छिंद्रनाथाने गोरक्षाची भीती दूर केली .
मग त्यासहवर्तमान मुलास घेऊन मच्छिंद्रनाथ आपल्या आश्रमात गेले तेथे त्यांनी गाईचे दूध आणून मुलास पाजले व त्यास झोळीत घालुन झोके देऊन निजवले.

हा प्रकार घडल्याची बातमी गावभर झाली.
तेव्हा गावचे लोक भेटीस जाऊन मुलाची चौकशी करू लागले तेव्हा नाथही सर्व वृत्तांत सांगत.
तो ऐकून त्यांना नवल वाटले .
मच्छिंद्रनाथांनी आपल्या शिष्याकडून मातीचा पुतळा जिवंत करवला,यामुळे ब्रह्मदेवापेक्षा मच्छिंद्रनाथांची योग्यता विशेष आहे , असे जो तो बोलू लागला.

तेथून पुढे तीर्थयात्रा करीत फीरताना त्या मुलालाही बरोबर नेणार असा मच्छिंद्रनाथांचा मानस होता .
त्यामुळे त्या लहान मुलाची आबाळ होईल व मुलाचे आईवाचुन संरक्षण व्हावयाचे नाही, म्हणून मुलास कोणाच्या तरी हवाली करा, असे सर्वांनी मच्छिंद्रनाथास सुचविले.
ते ऐकून, तसे होईल तर फारच चांगले होईल असे नाथांनी उत्तर दिले.
अशा तऱ्हेने मच्छिंद्रनाथाचा होकार मिळाल्यानंतर मुलास कोणाच्या तरी जवळ सांभाळायला द्यावे असा गावकऱ्यांनी ठरवले .
मधुनाभा या नावाचा एक ब्राह्मण त्या गावात रहात होता.
त्याची गंगा ह्या नावाची पत्नी महापतिव्रता होती.
उभयता संतती नसल्याने नेहमी दुख्खी: असत व त्यांना कोणत्याच गोष्टीत हौस वाटत नसे.
ते दोघे ह्या मुलाचा सांभाळ आस्थेने करतील अशी खात्री असल्याने त्यांच्याबद्दल सर्वांनी मनापासुन मच्छिंद्राकडे शिफारस केली.
मग अशा लोकप्रिय जोडप्याच्या हातात गहिनीनाथासारखे रत्‍न देणे नाथांनाही योग्य वाटले.
त्यांनी मुलास गंगाबाईच्या ओटीत घातले आणि सांगितले की,” मातोश्री हा पुत्र वरदायक आहे.
करभंजन म्हणून जो नवनारायणांपैकी एक त्याचाच हा अवतार आहे.
ह्याचे उत्तम रितीने संगोपन कर, तेणेकरून तुझे कल्याण होईल व जगाने नावाजण्यासारखा हा निपजेल.
हा पुढे कसा होईल हे मातोश्री, मी तुला आता काय सांगू?
पण याचे सेवेसाठी मूर्तिमंत कैलासपती खाली उतरेल.
ज्याचे नाव निवृत्ति असेल त्यास हा अनुग्रह करील.
याचे नाव गहिनीनाथ असे ठेव.
आम्ही तीर्थयात्रेस जातो. “
पुन्हा बारा वर्षांनी हा आमचा बाळ गोरक्षनाथ येथे येईल, तेव्हा तो ह्यास अनुग्रह करील.

मग त्यांनी मोहनास्त्र मंत्र म्हणून विभूति तिच्या अंगावर टाकताच, तिच्या स्तनात दूध उत्पन्न झाले.
मग मुलास स्तनपान करविल्यानंतर तिने गावातील सुवासिनी बोलावून मुलास पाळण्यात घालुन गहिनीनाथ असे त्याचे नाव ठेविले.

पुढे मच्छिंद्रनाथ काही दिवस तेथे राहिले व गावकऱ्यांचा निरोप घेऊन गोरक्षासहवर्तमान ते तीर्थयात्रेस गेले . जाताना गोरक्ष अजून कच्चा आहे असे मच्छिंद्रनाथास दिसून आले.
मग त्यास बदरिकेद्वार स्वामींच्या हवाली करून तपास लावावे असे मनात जाणून अनेक तीर्थयात्रा करीत करीत ते बदरिकाश्रमास गेले.
एकदा मच्छिंद्र व गोरक्षनाथ सौराष्ट्र गावांहून निघाले ते मार्ग क्रमीत तैलंगणांत गेले.
तेथें त्यांनीं गोदेच्या संगमी स्नान करून श्रीशिवाचे पूजन केले.
पुढे ओंढ्या नागनाथ, परळीवैजनाथ इत्यादी तीर्थक्षेत्रे केल्यावर महाअरण्यात गर्भगिरी पर्वतावर जे वाल्मीकिऋषीचे स्थान आहे, तेथे ते आले.
ते अरण्य महाभयंकर, वाट देखील धड उमगेना.
अशा त्या घोर अरण्यांतून प्रवास करण्याचा प्रसंग आल्यामुळे मच्छिंद्रनाथ भिऊन गेले .
त्याचे कारण वेगळे होते ते असे की स्त्रीराज्यातून निघतांना त्यास मैनाकिनी राणीने जी सोन्याची वीट दिली होती ती कोणास न समजू देता त्यांनी झोळीत ठेवली होती.
ती वीट चोर नेतील ही धास्ती त्यांना वाटत होती .
खरे तर ही सर्व भीति गोरक्षनाथाच्या लोभाबद्दल परीक्षा पाहण्यासाठीच होती.
नाहीतर मच्छिंद्रनाथास भीति कशाची असणार?
ते मार्गात चालत असताना मुद्दाम गोरक्षास विचारत होते की, ह्या घोर अरण्यात चोरांची धास्ती तर नाहीं ना ?
हे ऐकून गुरूला चोराचे भय कशासाठी असावे, ही कल्पना गोरक्षनाथाच्या मनात उत्पन्न झाली.
गुरूजवळ काही तरी वित्त असले पाहिजे व ते चोर लुटून नेतील ही भीति त्यांना आहे, असा त्याने तर्क केला व ते भय निरसन होण्याचा उपाय योजावा, असा मनात विचार करून तो काही उत्तर न देतां तसाच मुकाटयाने चालत होता.
इतक्यात त्याना एक पाण्याचे ठिकाण लागले तेथे मच्छिंद्रनाथाने गोरक्षास अंमळ थांबावयास सांगितले व आपली झोळी त्याच्याजवळ देऊन तो शौचास गेला.
त्या वेळेस गोरक्षनाथाने गुरूच्या झोळीत पाहिले तेव्हा त्याला सोन्याची वीट दिसली.
हेच गुरूंच्या भीतीचे मुळ असे जाणून त्याने ती वीट फेकून देऊन तितक्याच वजनाचा एक दगड झोळीत भरून ठेवला व आपण चालू लागला.
मच्छिंद्रनाथही मागुन चालू लागले .
गोरक्ष बराच लांब गेल्यावरही गुरू मागून येतच होते .
त्यांची वाट पहात तो विसावा घेत बसला.
तितक्यात एक विहीर त्याचे नजरेस पडली.
त्याने विहिरीत स्नान केले, व नित्यकर्म उरकून घेत आहे तोच मच्छिंद्रनाथ जवळ आले आणि पूर्ववत् ’येथून पुढे काही भय वगैरे नाही ना ?’ असे विचारू लागले .
त्यावर,” भय होते ते मागे राहिले, आता काळजी न करता स्वस्थ असावेअसे गोरक्षनाथाने उत्तर दिले.”

क्रमशः