Sparsh - 23 books and stories free download online pdf in Marathi

स्पर्श - भाग 23

मी डोळे पुसून घेतले आणि तिच्याकडे पाहू लागलो ..ती माझ्याकडे पलटून पाहू लागली आणि मला तिला फेस करणं अशक्य झालं ..मी तिथून लगेच पळ काढत गॅलरीला पोहोचलो ..मानसिसमोर मी स्वतःच्या अश्रूंना सावरुन घेतलं असलं तरीही गॅलरीत मात्र मी अश्रूंना वाट करून दिली आणि तेही शांत नदीप्रमाणे डोळ्यातून वाहू लागले ..मागून मानसी माझ्या बाजूला येऊन उभी राहीली आणि मी अश्रू पुसून काही झालंच नाही अस वागू लागलो ..ती मला म्हणाली , " अभि माझा राग आलाय का ? ..हो येईलच ..रागाव रे पण शांत नको राहू " आणि त्याक्षणी माझ्या तोंडून निघालं , " मानसी प्लिज आज मला एकट सोडशील .." तिने माझे शब्द ऐकले आणि बेडरूमला गेली .रात्रीचे 1 वाजले होते पण मी गॅलरीतून हललो नव्हतो शेवटी पाय दुखू लागले ..आणि मी हॉलमध्येच सोफ्यावर पडलो ..आज मानसीचा प्रत्येक शब्द मला यातना पोहोचवत होता ..आजपर्यंत मला तीच सत्य एकूण घ्यायचं होत पण आज त्याच सत्याने माझं जीवन माझापासून हिरावून घेतलं ..आज रात्रभर काही मला झोप लागणार नव्हती ..रात्रीचे 3 वाजले होते ..मानसीही आज झोपली नव्हती ..मी बेडरूमला आलो नाही म्हणून ती बाहेर पाहायला आली ..मला झोप येत नव्हती तरीही ती दिसल्यावर झोपेच नाटक करू लागलो ..आणि तिला पटलं की मी झोपलो आहे ..रात्र तर कशीबशी निघून गेली ..

मला रात्रभर झोप लागली नव्हती तर मानसीला सकाळी झोप लागली त्यामुळे सकाळचे आठ वाजून गेले तरीही ती उठली नव्हती ..रात्रभर झोप न झाल्याने माझे डोळे लाल - लाल झाले होते ..त्यामुळे पहाटे - पहाटेच बाहेर सैर करून आलो ..बाहेरून आलो तरी मानसी काही उठली नव्हती ..म्हणून स्वताच फ्रेश होऊन लवकरच ऑफिसला निघालो ..शिवाय एक कारण होत की मला तिला फेस करणं खरच अवघड गेलं असत म्हणून लवकरच ऑफिसला निघालो .ऑफिसला पोहोचलो पण कामात मन लागत नव्हत ..बॉसने आज भरपूर फाइल सोपवल्या होत्या .. त्यामुळे कामात मन लावण्याचा प्रयत्न करीत होतो तरीही मन मात्र आज वेगळ्याच धुंदीत होत ..इकडे मानसी मला फोन करू लागली होती ..तिचा नंबर दिसला की मी फोन बाजूला ठेवून स्वताला कामात व्यस्त करून घ्यायचो ..आज पहिल्यांदा काम पूर्ण झालं नाही म्हणून बॉस माझ्यावर ओरडले होते ..तरीही मी शांतपणे ते सर्व एकूण घेत होतो .जिथे माझ्यावर दुखाच पहाड कोसळल होत तिथे हे काहीच नव्हतं ..बॉसच्या केबिनमधून परत आलो आणि पुन्हा एकदा कामाला लागलो ..बॉसने आज काम झाल्याशिवाय जायचं नाही म्हणून सांगितलं होतं ..त्यामुळे रात्रीचे 9 वाजले होते तरी मी कामच करीत होतो ..सकाळपासून मानसीचे तीस मिस कॉल झाले होते पण मी फोन काही रिसिव्ह केला नव्हता ..आज मला खूप रडावस वाटत होतं पण त्याक्षणी आपलं म्हणावं अस कुणीच नव्हतं ..शांत राहून ते सर्व सहन करू लागलो ..काम पूर्ण करून निघायला रात्रीचे दहा वाजले होते पण मला आज घरीही जायची इच्छा नव्हती ..जॅकला मी आधीच फोन करून बोलवून घेतलं होतं ..आज ड्रिंक करायला जाऊ म्हणून त्याला सांगितलं आणि तो आनंदाने मला रिसिव्ह करायला आला ..मी माझी गाडी ऑफिसलाच ठेवली आणि त्याच्या गाडीत निघालो ..आज।मला सतत शाश्वत आठवत होता .त्याच्या हातात असलेली ती दारूची बाटली आणि डोळ्यात असलेले ते अश्रू हे दोन्हीही मी स्वतः अनुभवत होतो ..आपण ज्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम करतो आणि ती व्यक्ती आपली होऊच शकत नाही हे स्वीकारणं खरच खूप कठीण असत ..त्याच्या वेळेला मी सोबत होतो पण माझ्यासोबत कुणीच नव्हतं त्यामुळे आज मला फक्त मद्यच या सर्वातून बाहेर काढू शकणार होत ..जॅकने बार समोर गाडी पार्क केली आणि आम्ही पिऊ लागलो ..बार रात्रभर चालू राहणार असल्यामुळे मी तिथेच होतो ..एक बॉटल संपली की दुसरी , दुसरी संपली की तिसरी असा माझा बेत सुरू होता ..मला जॅक जास्त पिऊ नको म्हणून समजावत होता आणि मी मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष करू लागलो ..इकडे मानसी मला फोन करून करून थकली होती आणि माझा सेलही बंद झाला होता ...माझा फोन लागत नव्हता म्हणून तिने सर्वाना फोन करून पाहिला होता शेवटचा पर्याय म्हणून तिने केनिकडून जॅकचा नंबर घेऊन त्याला फोन केला आणि त्यानेही मी त्यांच्यासोबतच असल्याचं सांगितलं ..शिवाय तो मला ड्रॉप करणार होता ..रात्रीचे 1 वाजले होते जेव्हा आमचं पिऊन झालं ..मला चालायचासुद्धा होश नव्हता ..जॅकसोबत घरी पोहोचलो ...त्यानेच मला दारापर्यंत सोडलं आणि निघून गेला ..आज मला चालायचा होश नसल्याने मानसी स्वतः मला आधार देऊन बेडरूममध्ये घेऊन जाऊ लागली ..मधातच मी अडखळलो आणि तिने मला सावरत बेडरूममध्ये नेल ..जुते काढले आणि मी नशेच्या अवस्थेतच शांत झोपी गेलो ....

सकाळी उठलो तेव्हा 11 वाजले होते ..मानसीने ऑफिसमध्ये मी येणार नसल्याचं कळविल होत ..रात्री जास्त पिल्याने माझं डोकं फारच दुखू लागलं होतं ..कसातरी उठत ब्रश करायला गेलो ..मानसीला माझी स्थिती कळाली होती ..माझा हँगओव्हर उतरविण्यासाठी ती निम्बु पाणी घेऊन आली ..तिने ग्लास हातात दिला ..त्याक्षणी तिच्या डोळ्यात पाणी होत ..ती पुन्हा किचनमध्ये जाऊ लागली तेव्हा मी तिचा हात मागून पकडला आणि लक्षात आलं की तिला माझा स्पर्श आवडत नाही म्हणून सोडून दिला .." सॉरी ..काय झालं मानसी ..रडत का आहेस ? " , मी म्हणालो आणि ती आणखीनच रडू लागली ..मी तिला बाजूला बसायला सांगितलं आणि ती म्हणाली , " मी नसत सांगितलं तुला तर बरं झालं असत अभि ..बघ माझ्यामुळे किती त्रास करून घेतो आहेस स्वताला .मी कुणालाच आनंद देऊ शकत नाही ..तू मला नव्याने जीवन दिलस आणि मीच तुला दुःखात लोटल ..खरच खूप वाईट आहे मी ...समाज बरोबर म्हणतो आम्ही नेहमीच चुकीचे असतो .." ती काही समोर बोलणार तेवढ्यातच तिला म्हणालो , " सॉरी मानसी ..खर सांगू तर मला नक्कीच त्रास होतोय पण तुझा नाही स्वतःचाच ..मी समाजात बलात्कार फक्त एकत आलो होतो आणि जेव्हा।मला कळलं की मी माझ्या खास व्यक्तीवर बलात्कार करतोय तेव्हा स्वताच तुटलो ..हा राग त्याचा आहे ..तुझा नाही ..तू आज हे सत्य सांगून फार छान केलं ..मला आनंद आहे की तू हे सर्व सांगितलं नाही तर उशिरा कळालं असत तर मी स्वताला कधीच माफ करू शकलो नसतो ..आणि कोण म्हणत समाजात तुला स्थान नाही ..जर तो समाज तुला स्वीकारत नसेल तर मी त्या समजालाच मानत नाही ..मानसी नको रडू ग त्रास होतो मला ..आणि काल दिवसभर त्रास दिल्याबद्दल सॉरी ." तिच्या चेहऱ्यावर आता थोडं हसू आलं होतं आणि ती कम्फर्टेबल फील करू लागली तेव्हाच मी म्हणालो , " मानसी पण हे फक्त मला सांगून आता काहीच फायदा नाही ..तुला आता हे सर्व आपल्या घरच्यांना सांगावं लागेल ..शिवाय मला तुला आता कुठलाच त्रास नाही द्यायचा ..त्यामुळे घटस्फोट घेऊ ..मित्र सदैव राहूच पण तुला या लग्न नावाच्या बंधनातून मुक्त करतोय ..जा सिमरन जिले अपनी जिंदगी " आणि ती चेहरा पाळत म्हणाली , " अभि बाबा नाही समजून घेणार .."

" मॅडम एवढी हिम्मत करून मला सांगितलं आहे तेव्हा त्यांनाही सांगा ...मानतील किंवा नाही मानतील तो नंतरचा प्रश्न ..आणि कुणी नाहीच स्वीकारलं तर अभि नावाचा मित्र सदैव तुझ्या पाठीशी आहे ..जो विश्वास तू लग्न करताना दाखवला होता तोच विश्वास आताही ठेव .." माझ्या शब्दांचा तिच्यावर प्रभाव पडला आणि ती सर्व काही सांगायला तयार झाली ..

मानसीला कॅनडामध्ये एक महिना पूर्ण होत आला होता .मी तिचे माझ्यासोबतचे हे दिवस खास व्हावे म्हणून प्रयत्न करू लागलो ..ती दिवसभर पुस्तकात व्यस्त असायची तर दर सायंकाळी आम्ही कुठेतरी फिरायला बाहेर जाऊ लागलो ..सात जन्माच प्रेम मला फक्त सात दिवसात द्यायचं होत ..त्यामुळे प्रत्येक क्षण तिला देऊ लागलो ..बाहेर जेवायला जाण असो की मूवी पाहायला जाण , आइस क्रीम खात रात्री सैरसपाटा करण तिला ते सर्व आनंद देत होत ..आणि मी तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून स्वताच खुश होऊ लागलो ..आणि मला कळून चुकलं प्रेम म्हणजे मिळविण नाही तर प्रेम म्हणजे खुलवीन ..एखाद्य फुल जेव्हा झाडावर असते तेव्हाच त्याला शोभा असते शेवटी निसर्ग नियम तो ..आणि ते तोडण्याचा प्रयत्न केला की काटे बोचनारच ..मानसीही त्यातलीच एक ..शेवटी तिचा कॅनडामधला वेळ संपला ..आज ती सकाळी - सकाळीच आपल्या घरी जाणार होती ..मी तिच्यासोबत घालवलेले हे क्षण कधीच विसरू शकणार नव्हतो .तिलाही आपला पाय घरातून काढायला कठीण जाऊ लागलं ..तरीही तिला इथून निघन भाग होत ..मी गाडीत तिची वाट पाहू लागलो आणि ती मला फ्लॅटची चावी देऊन गाडीत बसली ..बहुतेक तिने हे स्वीकारलंच होत की पुन्हा एकदा तिला इथे येता येणार नव्हतं ..गाडीत दोघेही शांतच होतो ..ती शांतता आता नकोशी होऊ लागली आणि गाडीत ऑडिओ प्लेयर लावली ..आणि पहिलंच गाणं प्ले झालं ..

ये दिलं तुम बिन कही लगता नही हम क्या करे
तुम्ही कह दो ए जाणे वफा हम क्या करे ..
ये दिलं तुम बिन कही लगता नही हम क्या करे ..

मी गाणं सुरू होताच बंद करू लागलो आणि ती म्हणाली , " अभि नको बंद करू ..राहू दे असच .." गाणं सुरू होत आणि आम्ही शांतपणे त्या गाण्याच्या शब्दात हरवत गेलो ..एकच गाण दोन तीन वेळा प्ले करून मी एकत होतो ..आणि शेवटी एअरपोर्ट आलं ..मानसीच सामान सोबत घेऊन आतमध्ये पोहोचलो ..तिकीट आधीच बुक केल्या होत्या ..त्या कलेकट केल्या आणि फ्लाइटची घोषणा होण्याची वाट पाहू लागलो ..काहीच क्षणात फ्लाइटची घोषणा झाली आणि ती निघू लागली ..मी आताही तिच्याकडे पाहू लागलो होतो ...ती समोर जात होती आणि अचानक धावत येऊन तिने मला मिठी मारली आणि म्हणाली , " अभि सर्व ठीक होईल ना ? " मी तिच्या केसांवरून हात फेरत म्हणालो , " सर्व काही ठीक होईल काळजी नको करू .." मी मिठी सैल केली आणि ती समोर जाऊ लागली मी तिला आवाज दिला आणि म्हणालो , " मानसी एक ना मी येऊ सोबत तुला घरच्यांशी बोलायला सोपं जाईल " आणि ती कणखर होत म्हणालो , " अभि यापुढे मला स्वताच सर्व काही सांभाळायचं आहे ..तू आपल्याकडे लक्ष दे .." ती समोर जाऊ लागलो आणि त्यानंतर तिने मागे वळून सुद्धा पाहिलं नाही ..ही तीच जागा होती जेव्हा मला कुठल्यातरी मुलीचा स्पर्श झाला होता आणि खरच वाटलं नव्हतं की याच जागी ती मला सोडून जाईल ..थोड्याच वेळात विमानाने उडान घेतली आणि कदाचित आमची शेवटची भेट इथेच संपुष्टात आली ..

मानसी तर माझ्या आयुष्यातून कायमची गेली होती ..ती परत येण्याची चिन्हेही आता दिसत नव्हती ..स्वताला सावरुन नव्याने सुरुवात करण्याची ही वेळ होती ..दररोज ऑफिसला जाऊ लागलो ..ऑफिसच्या कामात लक्ष लावू लागलो ..पुन्हा एकदा मी शांत झालो होतो ..फक्त कामापूरतच बोलत बसायचो ..भारतात असताना दररोज येणारा तिचा कॉल आता कधीच येणार नव्हता .तरीही वेडी आशा म्हणून दररोज एकदा मोबाइल चेक नक्कीच करायचो ...कधी अनावर झाल की तिची बनवलेली पेंटिंग कवटाळून झोपून घ्यायचों ..खूप कठीण होत मला तिच्याविना आयुष्य जगणं ..पण आता जगायच तर होतच ..तिने स्वतःच्या घरच्यांना एकदा सांगितलं की मग मलाही घरी बोलावं लागणार होतं ..तस माझ्या घरच्यांनी नक्कीच समजून घेतलं असत पण प्रश्न होता मानसीच्या घरच्यांचा ..मानसी घरी जाऊन सात दिवस झाले होते ..माझं ऑफिसही नियमित सुरू झालं होतं पण तिचा एकही कॉल आला नव्हता ..त्यामुळे भीती वाटत होती ..इच्छा तर होती तिला कॉल करायची पण या सात दिवसात एकदाही मी कॉल केला नव्हता ..आणि तिचा फोन येत नाही म्हणून करून बघितला तर मोबाइल बंद दाखवत होता ..आता फक्त वाट होती तिच्या फोनची ..


मानसीच घर ...


इकडे मानसी घरी पोहोचली होती ..आपली मुलगी परत आली म्हणून सर्वच खुश होते ..पण मानसीच्या चेहऱ्यावर एक शिकंज होती जी कुणालाच दिसली नव्हती .तीही त्यांच्या आनंदात समरस होऊ लागली ..मानसीच लग्न झालं तेव्हपासून ती फार जास्त दिवस आपल्या माहेरी राहिली नव्हती त्यामुळे घरच्यांनी जास्त दिवस राहण्यासाठी हट्ट केला होता ..तिलाही आपल्या मनातलं सांगायचं असल्याने जास्त दिवस हवेच होते ..आई - वडील तिचा मस्त पाहुणचार करू लागले ..आणि तीही आनंदी असण्याच नाटक करू लागली ..एक - एक दिवस जात होता आणि तिच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच बसून होत ..ती सर्व काही सांगण्यासाठी हिम्मत करायची आणि वडिलांचा चेहरा पाहून पुन्हा घाबरून शांत बसायची ..पाहता - पाहता सात दिवस गेले होते ..तिला कॉलेज पुन्हा जॉइन करायचं असल्याने आज तिने सांगण्याच पक्क केलं होतं ..रात्रीचे 9 वाजले असतील ..घरचे टीव्ही पाहण्यात व्यस्त होते ..तेवढ्यात मानसीने जाऊन टीव्ही बंद केली आणि म्हणाली , " बाबा मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे .
खूप महत्त्वाचं आहे ..सांगू शकते ? " बाबांनी परवानगी दिली आणि ती आपली संपूर्ण ताकद एकवटून म्हणाली , " बाबा मी आणि अभि घटस्फोट घेणार आहोत " हे ऐकताच घरात बसलेली सर्व मंडळी अचानक उभी झाली आणि आई तर धावतच येऊन तिच्यावर ओरडू लागली .." वेडी झाली आहेस का मानसी ..तुमच्यात तर सर्व काही चांगलंच सुरू होत मग हा निर्णय का ? " बाबा तिच्याकडे फारच रागाने पाहत होते ..आणि ती शांत होत म्हणाली , " मी त्याला हवा तो स्पर्श नाही देऊ शकत आणि म्हणून त्यानेच सुचवलं मला हे सर्व .." आतापर्यंत शांत असलेले बाबा म्हणाले , " हवा तो स्पर्श म्हणजे काय ? ..प्रत्येक स्त्रीला ते सहन करावंच लागत आणि तो नवऱ्याचा हक्क आहे ..त्याला वाटेल तस वापरेल तो त्यात काय एवढं .." आणि मानसी म्हणाली , " बाबा तुमचं सर्व मान्य आहे पण तुम्हाला कस सांगू कळत नाही आहे ..मी लेस्बियन आहे म्हणजे माझ शरीर स्त्रीकडे आकर्षित होत ना की पुरुषाकडे ..मला नाही आवडत तो पुरुषांचा स्पर्श .."

बाबा तिच्यावर ओरडतच म्हणाले , " आम्हाला नाही कळत आहे काहीच आणि कळून पण घ्यायचं नाही .समाजाचे बोलने आम्हाला खावे लागतील तुझं काय निघून जाशील एकटीच...मला फक्त एवढं माहिती आहे की तू घटस्फोट घेणार नाहीस .." आणि ते आपल्या रूममध्ये जाऊ लागले ..मानसी खंबीर होत म्हणाली , " बाबा माझा निर्णय झाला आहे आणि मी मागे हटणार नाही ..मग तुम्हाला आवडो की नाही मला फरक पडत नाही .." बाबांनी तिच्यावर एक तिरकस नजर टाकली आणि सरळ मानसीच्या रूममध्यें गेले ..मानसी त्यांची बाहेर येण्याची वाट पाहू लागली ..काहीच क्षणात बाबा बाहेर आले ..त्यांच्या हातात मानसीची बॅग होती आणि बॅग समोर फेकत ते म्हणाले , " शेवटची संधी देतोय मानसी घटस्फोट हवाय की कुटुंब .." तिने एकदा सर्वांकडे मनभरून बघून घेतलं आणि बिचारी रात्रीच घर सोडून निघून गेली..

एवढ्या रात्री बाहेर तर निघाली होती पण स्वतःजवळ काहीच पैसे नव्हते ..एटीएम मध्ये फक्त 5000 रुपये होते ..तेच पैसे तिने काढले आणि एका स्वस्त लॉजमध्ये एक रूम घेतली ..आज तीही एकटीच होती ..आणि तिच्या मनात विचार येऊन गेला .." काय आहे न समाज इकडे स्वतःचे वडील समजून घ्यायला तयार नाहीत आणि तिकडे ज्याला भेटून फक्त एक वर्ष झालं तो माझी किती काळजी घेतो ..जेव्हा त्याला याबद्दल कळेल तेव्हा किती वाईट वाटेल ..सॉरी अभि तू म्हणाला होतास की मी मित्र म्हणून तुझ्यासोबत सदैव असेन पण मी नाही देऊ शकत पुन्हा त्रास तुला ..तू मला जे क्षण दिले तेच माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत ..आणि धन्यवाद माझी साथ निभावण्यासाठी .." मानसीने लॉज तर केला होता पण जेवण- खान यातच सर्व पैसे संपले होते ..मदत कुणाला मागावी तर त्याना सर्व काही सांगावं लागलं असत आणि मग पुन्हा एकदा समाजाची उगाच बोलणी खावी लागली असती म्हणून तीने कुणालाच मदत मागितली नव्हती..पण झालं असं की आता फक्त एकच दिवस उरतील इतके पैसे उरले होते ..आता तिच्याकडे कुठलाच पर्याय उरला नव्हता ..समाजात तिला स्थान मिळणार नाही हेही ती जाणून होती ..शिवाय घरच्यांनीच नाकारलं त्यामुळे जगण्याला दुसर कारणही नव्हतं आणि तिचा आत्महत्या करण्याचा विचार पक्का होत गेला...कदाचित उद्याचा दिवस तिच्या आयुष्यातील शेवटचा दिवस होता ??

क्रमशः ..