gotya - 3 books and stories free download online pdf in Marathi

गोट्या - भाग 3

कॉलेजचे जीवन

शालांत परीक्षेत चांगले गुण मिळाल्याने गोट्याने जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षण घेण्याचे निश्चित केले. त्याला विज्ञान शाखेत प्रवेश मिळाला. अगदी छोट्याशा खेडेगावातून गोट्या एकदम मोठ्या शहरात गेल्यावर त्याची धांदल उडाली. तेथील घरे, वाहने आणि लोकं पाहून तो चक्रावून गेला. कॉलेजच्या जीवनाचे औत्सुक्य त्याला अगोदर पासून होते. पण तो त्या कॉलेजमध्ये अगदी नवखा होता. सारी मुले अगदी टीप टॉप मध्ये दिसत होते, त्यांचे राहणीमान देखील खूप छान होते. त्या कॉलेजमध्ये त्याला ओळखणारा एकच मित्र होता, तो म्हणजे चिंटू. त्यांचे खरे नाव चिंतामण असे जरी असले तरी त्याला सर्वजण चिंटू असेच म्हणायचे. कॉलेजच्या पहिल्याच दिवशी त्याची ओळख झाली आणि चांगली मैत्री जमली. चिंटूची फ्रेंड सर्कल खूप भारी होती. जवळपास एक क्रिकेटची टीम व्हावी एवढी त्याच्या मित्रांची संख्या होती. चिंटूमुळे मग सारेचे सारे गोट्याचे मित्र बनले. गोट्याच्या स्वभावामुळे तो लवकरच त्या शहरी मुलांमध्ये मिसळून गेला. सकाळी आठ वाजता कॉलेजला सुरुवात व्हायची आणि दोन वाजता संपायची. गोट्याला भूक अजिबात सहन होत नसे त्यामुळे तो आपल्या सोबत जेवणाचा डबा ठेवत असे. एखादा पिरियड ऑफ मिळालं की तो कॉलेजमधील बागेत जाऊन गुपचूप खायचा तर बाकीचे मित्र कँटीनमध्ये जायचे. तो मात्र कधीच कँटीनमध्ये जात नसे, त्याच्याकडे तेवढे पैसे देखील नसायचे. त्याच्या मित्रांनी त्याला कधी तसा फोर्स देखील केला नाही. गोट्या ग्रामीण भागातील मराठी शाळेतून आलेला होता, त्याची इंग्रजी कच्ची होती, त्यामुळे विज्ञान शाखेतील अभ्यास त्याला खूप जड जात होते. कोणतेच शब्द लक्षात राहत नव्हते. एके दिवशी तर त्याने रात्रभर रडून काढली कारण पहिल्याच टेस्टमध्ये त्याला खूप कमी मार्क मिळाले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी तो आपल्या गावी आला. पुढील शिक्षण शिकणार नाही, मला ते इंग्रजी काही केल्या समजत नाही, मी जाणार नाही म्हणून तो घरात दार लावून बसला. गोट्याचे वडील शिक्षक होते, मुलांना कश्याप्रकारे समजवून सांगायचे हे त्यांना पक्के ठाऊक होते. त्यांनी गोट्याला समजवून सांगितले, कोणतीही गोष्ट एका प्रयत्नात येत नसते, झाडाला गोड फळे लागायला किती वर्षे लागतात ? हे ही तसेच आहे. तुला लगेच सारे काही जमणार नाही, पण रोज तू प्रयत्न कर, सराव कर, समजून घे नक्की कळेल. कमी मार्क मिळाले तरी आम्ही काही म्हणणार नाही. शेवटी गोट्या तयार झाला आणि दुसऱ्या दिवशी वडिलांनी त्याला कॉलेजला सोडले.
जो विषय त्याला कठीण वाटत होता, त्याविषयीचे त्याने खाजगी शिकवणी लावली, मित्रांच्या मदतीने तो अभ्यास करायला शिकला. अकरावीच्या परीक्षेत त्याला बऱ्यापैकी मार्क मिळाले तेंव्हा त्याचा आत्मविश्वास वाढला. बारावीच्या परीक्षेची धास्ती सर्वानाच होती. तयारी ही चांगल्या प्रकारे चालू होती. निव्वळ अभ्यास केल्याने काही होत नाही, मन प्रसन्न ठेवण्यासाठी थोडा वेळ मनोरंजन व खेळ देखील अत्यावश्यक आहे. म्हणून गोट्या, चिंटू आणि त्यांचे मित्र रोज सायंकाळी एक तास क्रिकेट खेळत असत. रविवारी मनसोक्त खेळ खेळत. गोट्याला अजून एका गोष्टीचा छंद होता ते म्हणजे लेखन करणे. दहावीला शिकत असल्यापासून त्याला लेखनाचा छंद लागला होता. स्थानिक वृत्तपत्रात छोट्या छोट्या विषयावर लिहीत असे आणि ते पेपरमध्ये छापून देखील येत असत. कॉलेजमध्ये प्रविष्ट झाल्यावर या गोष्टीकडे त्याने दुर्लक्ष केले नाही. तर एका वृत्तपत्रासाठी त्याने कॉलेज प्रतिनिधी म्हणून काम पाहत राहिला. त्याची मराठी भाषा लेखन खूप चांगली होती, तो आपल्या मनातील विचार लेख आणि काव्याच्या माध्यमातून व्यक्त करत असे. त्याचे सर्व मित्र त्याला संपादक साहेब या नावाने हाक मारत असे. त्याने एकदा पेपरमध्ये कॉलेजमधील काही प्रकाराबद्दल लेखन केला होता, तेंव्हा काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी गोट्याला शिव्या शाप देऊन धमकी दिली होती. ही गोष्ट गोट्याच्या मित्रांना कळाल्यावर त्यांनी त्या गुंड लोकांपासून संरक्षण दिले. तेंव्हापासून त्याला लिहिण्याचा अजून हुरूप वाढत गेला. लेखनासोबत तो आपल्या अभ्यासाकडे ही लक्ष देत होता. अभ्यास कंटाळवाणे वाटू लागले की तो लेख किंवा कविता लिहायचा. दोन वर्षांच्या काळात त्याच्याकडे बऱ्यापैकी साहित्य जमा झाले होते. भविष्यात गोट्या काय होणार हे त्याला देखील माहीत नव्हते. त्याला याविषयी प्रश्न विचारल्यास तो म्हणत असे मी कोण होणार ? हे मार्क कसे मिळतात त्यावर अवलंबून आहे. बारावीचा चांगला अभ्यास झाला होता, सर्व पेपर चांगले गेले होते, परीक्षा संपल्यावर सारे मित्र दुरावले गेले. आता प्रतीक्षा निकालाची होती.

- नासा येवतीकर, धर्माबाद, 9423625769