Being a girl is not easy - 1 books and stories free download online pdf in Marathi

मुलगी होणं सोपं नाही - 1

भाग एक- मुलीचा जन्म....

नर्मदा काकुचे नुकतेच लग्न झाले होते. लग्न होऊन एक वर्ष सुद्धा पुर्ण झाले नव्हते आणि लग्नानंतर अवघ्या दहा महिन्यांनीच त्यांचा ओटी भरण्याचा कार्यक्रम होता. नर्मदा काकु आई होणार म्हणुन सर्वच खुश होते, माझी आईही खुशच होती. पण ती खुश आहे, हे आमच्याच घरातल्या महिलांना बघवत नव्हते. आजी आईला सारखे टोमणे देत राहायची कारण लग्नाला तीन वर्षे व्हायला आले, तरीही आईला बाळ झाले नव्हते. मग आजी आईला उठता बसता नर्मदा काकुंबद्दल सांगायची. आजीची जाऊबाई म्हणजेच नर्मदा काकुंची सासु त्या सतत माझ्या आजीसमोर आईला नावे ठेवायच्या आणि बाबांचे दुसरे लग्न करण्यासाठी सल्ले देत होत्या. त्यांचे ऐकुन आजी घरात आईला त्रास द्यायची. त्याचवेळी कार्यक्रमाला गावातील काही स्रिया देखील आल्या होत्या. त्या सुद्धा एकमेकींच्या कानामध्ये आईबद्दल बोलत होत्या. आईला सर्व कळायचं पण ती मात्र शांतच रहायची. कार्यक्रमात आई काकुंना हळद कुंकू लावणार तर कोणितरी एक महिला मागुन म्हणाली हिला काय सांगता हळद कुंकू लावायला.. नर्मदा बघ बाई ऊगाच काही अपशकुन होईल,हीला मुलंबाळ नाही, वाजोंटी आहे तुझ्या सुखाला नजर लागेल...
आजीने लगेचच आईला ओढतच घरी आणली. आईला मारु लागली, नकोनको ते बोलु लागली. आईच्या भावना कोणिच समजुन घेण्याचा प्रयत्न करत नव्हते. बाबा ही पुर्णपणे आजीचेच बोलणे ऐकायचे आणि आईला खुप दोष द्यायचे..काही दिवसांनी आई गरोदर राहीली. आजीला खुप आनंद झाला होता, तो आनंद ती आजी होणार म्हणुन नव्हताच तर मला आता नातुच होणार म्हणुन होता. आईला लग्नानंतर तीन वर्षांनी पहिले बाळ झाले आणि ती मुलगी होती. पण आजीला नातु हवा होता पण खुुप विचार केेेल्यानंतर आजी आजोबा आणि बाबांनी देखिल तीला स्विकारली. तिला खेळवायचे तिच्यासोबत कधीकधी ते ही खेळायचे. तिच्यानंतर दोन वर्षांनी आई पुन्हा गरोदर राहिली,आता मात्र आजी आणि बाबांना मुलगाच हवा होता. जेणेकरुन त्यांचे कुटुंब 'हम दो और हमारे दो' सारखे पुर्ण होईल. पण आजी आणि बाबांचे स्वप्न अपुर्ण राहिले. आजी ने आईचे यावेळीही तेवढेच लाड पुरवले जेवढे मोठ्या मुलीच्या वेळेस पुरवले होते. काही दिवसांनी तो दिवस आला आणि आईला बाळंतपणासाठी दवाखान्यात नेले. आईला दवाखान्यात नेली खरी पण आजी आणि बाबा आईकडे लक्षच देत नव्हते. ते फक्त देवाकडे प्रार्थना करत होते की आईला मुलगा होऊ दे. आमचे कुटुंब आता पुर्ण होऊ दे..
थोड्या वेळाने डॉक्टर बाहेर आले आणि आजीला म्हणाले तुम्हांला नात झाली आजी.. हे ऐकल्यानंतर आजी बाबांकडे बघुन कपाळावर हात मारुन, नशिबाला दोष देत आईच्या बाजुला गेली. यावेळीही आजीने मुलीला स्विकारले पण आईचे मात्र जगणे नकोसे केले. आईला सतत टोमणे देऊन आजी बोलत राहायची की या मुली काय करणार? फुकट त्यांच्यावर खर्च करत बसा, पुन्हा त्यांचे लग्न करुन तिथेपण पैसे घालवा, उपयोग तर काही नाही... आपण पैसा घालवायचा आणि त्या आयत्या बसुन खाऊन, निघुन जातील. आईला आजीच्या बोलण्याचा त्रास होत होता. मोठी मुलगी आता तीन वर्षांची होती, तिच्यासोबत आजी ठिक वागायची पण छोटीला मात्र आजी कधीतरीच उचलुन घ्यायची.
दिवसामागून दिवस जात होते. घरात आजी ही मुलींसोबत चांगली वागत होती. पण आजीने बाबांना सांगुन ठेवले होते, मला नातु पाहीजेच. नातु नाही बघायला मिळाला तर मी मेल्यानंतर माझ्या आत्म्याला शांती नाही मिळणार.. तसं ही बाबांना ही मुलींवर विश्वासच नव्हता. त्यांना घर पुढे चालवण्यासाठी किंवा त्यांना म्हातारपणी सांभाळण्यासाठी मुलगाच हवा होता. मग त्यांनी ही आईच्यामागे कटकट सुरु केली. आईला त्रास द्यायला सुरुवात केली, आईला मारु लागले. मुली आता मोठ्या होत होत्या, एक सहा वर्षाची तर चार वर्षांची झाली होती. आईला पुन्हा दिवस गेले, आई गरोदर आहे, हे समजल्यानंतर बाबांना फक्त मुलगाच समोर येत होता. त्यांनी आईकडे त्यांच्यासोबत दवाखान्यात जाण्यासाठी हट्ट केला. आई काहीच बोलु शकत नव्हती, तसं ही बाबांनी तिचे म्हणणे ऐकलेच नसते. आईने नाईलाजास्तव होकार दिला आणि बाबांसोबत दवाखान्यात गेली. आता मात्र बाबांनी कहर केला. दवाखान्यात गेल्यानंतर आईच्या पोटात मुलगी आहे की मुलगा हे बघण्यासाठी डॉक्टरांना विनवणी केली. डॉक्टरांसाठी किंवा दवाखान्यासाठी तपासणी करणे हा गुन्हाच होता म्हणुन त्यांनी स्पष्ट नकार दिला. बाबा तरीही ऐकायला तयार नव्हते समोर असलेली डॉक्टर लेडीज असल्यामुळे बाबांनी क्षणाचाही विचार न करता शिवीगाळ करायला सुरुवात केली, त्याने तरी डॉक्टर तपासणी करण्यासाठी तयार होईल. पण बाबांच्या मनासारखे काहीच झाले नाही. उलट दवाखान्यातील डॉक्टरांनी बाबां विरुद्ध तक्रार केली आणि बाबांना अटक झाली. हा माझ्यामुळे म्हणजेच मी आईच्या पोटात असल्यामुळे त्यांच्या आयुष्यात घडलेला अपशकुन...
बाबांच्या असलेल्या मोठमोठ्या ओळखींमुळे बाबा जेलमधुन सुटुन आले. पण बाबांनी मात्र ठरवले.. आता पुन्हा जर मुलगी झाली, तर तिला सरळ अनाथ आश्रमामध्ये सोडुन द्यायची. आजी देखील आईला सतत आठवण करुन देत होती. आईलाही वाटत होते की आता मुलगाच व्हावा. जेणेकरुन तिला आणि तीच्या मुलींना होणारा त्रास तरी कमी होईल. घरात सर्व ठिक होईल आणि मुलाच्या पावलांनी आनंद येईल. तरीही मनात भिती सोबत चिंता ही होती, पुन्हा मुलगीच झाली तर... काय करु मी.. कशी तिला यांच्या रागापासुन वाचवु.. खरंच मुलगी झाली तर हे तिला अनाथआश्रमात सोडतील का?? बघता बघता आईला सातवा महिना लागला आणि आईचे टेन्शन वाढत चालले होते. तिच्या मनात सतत मुलींचेच विचार येत होते. दिवसेंदिवस तिची चिंता वाढतच चालली होती, ती कोणाला मनातले सांगु ही शकत नव्हती. आईची तब्ब्येत अचानक बिघडली, तिला कदाचित जास्त प्रमाणात घेतलेल्या टेन्शनचा त्रास झाला आणि आईला दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी सांगितले आईला आरामाची गरज आहे आणि आजुबाजुला सतत आनंदाचे वातावरण हवे तरंच बरं वाटेल. म्हणुन मग आईला, आईच्या आईकडे म्हणजेच मामाच्या गावाला आजीकडे नेली.
तिकडे आई आनंदात राहुच शकत नव्हती, आजी आणि मामानी देखील खुप प्रयत्न केले, पण आई काही आनंदात नव्हती. तिथेपण तिच्या मनात मुलींबद्दलच विचार यायचे.. काही दिवसांपासुन तीचा आणि आनंद या शब्दाचा संबंधच येत नव्हता. तसं पण तिच्या आयुष्यात ती कशी आहे? असं विचारणारा किंवा तिला आनंदात ठेवणारा असा नवरा नव्हताच आणि मन समजुन घेणारी सासुही नव्हती. या टेन्शनमध्येच आई पायरीवरून पाय घसरून पडली. ती आपण पडत आहोत अशी जाणिव होणार तेवढ्यात ती डोक्यावरच पडली. मामा आणि आजीने ताबडतोब आईला दवाखान्यात नेले, ती खुप वेळ बेशुद्धच होती. मामानी बाबांना बोलावुन घेतले. आईला जास्त मार लागल्यामुळे आणि बेशुद्ध असल्यामुळे ताबडतोब आताच आठव्या महिन्यात डिलेव्हरी करावी लागेल असे डॉक्टरांनी सांगितले. मामा आणि बाबा काहीच बोलु शकत नव्हते. म्हणुन त्यांनी होकारार्थी मान हलवली. बाबा इकडे मनात विचार करत होते मुलगा होईल की मुलगी.. पण त्यांना मुलगाच हवा होता म्हणुन ते मुलगाच होणार असे बोलत होते. आजी आणि मामा काळजी करत होते, आई ठिक होईल का? याची काळजी त्यांना सतावत होती. थोड्या वेळाने डॉक्टर बाहेर येणार तर बाबा लगेचच आतमध्ये मुलगा आहे की मुलगी बघण्यासाठी गेले. इकडे डॉक्टर बाहेर आले आणि त्यांनी सांगितले मुलगी झाली आहे. पण ... मुलीची आई मात्र नाही वाचली.. बाबांनाही समजलं ही मुलगीच आहे, त्यांना त्यांची बायको सोडुन गेल्याचा दुःख झालाच नाही तर तिसरी पण मुलगीच झाली याचा राग आला. आणि फक्त याच मुलीच्यामुळे माझी बायको मला सोडुन गेली असा रागच नाही तर संताप त्यांच्या मनात निर्माण झाला.
त्याच संतापाने माझ्या दोन बहिणीही माझ्या जोडीला आणुन सोडल्या. बाबांनी त्या दोघींना दवाखान्यात आजी आणि मामाजवळ आणुन सोडले आणि सांगितले आज पासुन या तिन्ही मुलींना मी ओळखत नाही. तुम्ही त्यांच काहीही करा....
हा माझा पहिला पाऊल आणि त्यांच्यासाठी पुन्हा अपशकुनच..


नाव- वृषाली अर्जुन गायकवाड.