Vibhajan - 14 books and stories free download online pdf in Marathi

विभाजन - 14

विभाजन

(कादंबरी)

(14)

तो काळ १९९२ ते १९९७ चा होता. त्या काळातच युसूफ खासदार म्हणून निवडून गेला होता. पहिल्या वेळी जेव्हा संसद भवनात अधिवेशन भरलं. त्यात युसूफलाही बाजू मांडायला लावली. तेव्हा त्यानं जनसंख्या वृद्धीवर जोरदार भाषण केलं आणि हेही सांगीतलं की जर याचवेळी जनसंख्येवर नियंत्रण आणलं गेलं नाही. तर उद्या लोकसंख्येचा विस्फोट आपल्या देशात झाल्याशिवाय राहणार नाही.

युसूफचं भाषण संपलं. तशा जोरदार टाळ्या संसदभवनात वाजल्या. युसूफचं बोलणं सर्वांना पटलं होतं. त्यातच लोकसंख्या नियंत्रणाचा युसूफचा मुद्दा सर्वांना पटला. त्यांनी ह्याच मुद्दयाचा गांभीर्यानं विचार करुन पुढे ज्या पंचवार्षीक योजनेची कलमं तयार केली. त्या कलमात जनसंख्या वृद्धी नियंत्रणावर जोर देवून लोकसंख्या नियंत्रण कायदा अस्तित्वात आणला. तरीही लोकं देवाची देण म्हणून मुलं पैदा करीत असत. परंतू समाजात याबाबत पुढे जनजागृती करण्यात आली. त्यानुसार दोनच मुलं पैदा करण्यावर भर देण्यात आला.

शहरात तसेच गावात लोकसंख्या वाढ रोकण्यासाठी रुग्णालयांना लक्ष देण्यात आलं. त्यानुसार लोकांच्या नसबंदी शस्रक्रिया करण्यात आल्या. या शस्रक्रियाही काहीजण स्वखुशीनं करीत असत. तर काहीजणांना जबरदस्तीनं तयार करावं लागत असे. तरीही ते तयार होत नसत. ही जनजागृती करण्यासाठी बसवर व जागोजागी सार्वजनिक ठिकाणी हम दो हमारे दो अशा प्रकारचे फलक रंगविलेले होते.

लोकसंख्या वाढीवर नियंत्रण असावं असं युसूफला वाटत होतं. त्यासाठीच त्यानं लोकसंख्या नियंत्रणाबाबत बाजू मांडली होती. सध्या विवाह सोहळ्यावर जास्त भर होता. वातावरण उष्ण स्वरुपाचं असल्याने तरुण मुलं मुली लवकर वयात येत. मग ते सवड मिळण्यापुर्वी आईवडीलांनी परवानगी न दिल्यास चक्क पळून जावून लग्न करत. त्यानंतर मुलं निर्माण करण्याचं चक्र सुरु व्हायचं. ऐपत नसतांनाही मुलं पैदा केली जात.

देशात आज मुलं मुली शिकत असली तरी ते आजही अज्ञानासारखी वागत होती. आजही सुज्ञ मंडळी मुलं पैदा करतांना तारतम्य बाळगत नव्हती. स्रीयांना तर आजही दुय्यम पद्धतीने वागवत. जशी ती मुलं पैदा करण्याची मशीनच आहे. एवढी मुलं पैदा केली जात. धड सांभाळंही करता येत नव्हता. त्यात कोणत्या मुलाला घालायला जेवण मिळत नव्हतं. कोणाला पोटभर अन्न, तर कोणाला धड औषध मिळत नव्हतं. कोणाला कपडेही बरोबर मिळत नव्हते. शिक्षण तर नाहीच नाही. अशी मुले आजही पाचवीपासूनच शाळा सोडत होती. मुलं नाही शिकली तरी मायबापांना फरक पडत नव्हता. आपल्या या प्रजोत्पादनामुळे आपलेच नाही तर आपल्या देशाचेही नुकसान होते याचा विचारच ही मंडळी करीत नसत.

आज देशाची लोकसंख्या अती वाढलेली होती. पण या वाढीवर काही मंडळी सातत्याने भर टाकत होती.

जगात पिण्याचे पाणी २. ३ टक्क्यावर होते. काही भागात आजही पिण्याला पाणी नव्हते. तिनशे ते चारशे टँकर एकट्या एका राज्यातील एका जिल्ह्यात पाठवावे लागत होते. आजही शहरासह बरीच गावंही पाण्यापासून वंचित होती. पिण्यासाठी पाणी नसलं तर जीव कासावीस होतो. तसंच यवतमाळ उस्मानाबाद अर्थात विदर्भामध्ये शेतक-यांच्या आत्महत्येचे दृष्टचक्र आजही सुरु होते.

हे असं का घडत असावं? याचा कोणी विचारच करत नव्हता. महत्वाची गोष्ट ही की या अशा बदलामागे काही अंशी लोकसंख्या कारणीभुत होती. लोकसंख्येची गरज भागवताना उस्मानाबाद सारख्या भागात उसाचं उत्पादन घेण्यात आलं होतं. त्या उत्पादनाला पाणी अतीव प्रमाणात लागायचं. ते पाणी विहारीतून उपसले गेले. त्यातच उस कटाई करुन ते उस प्रक्रियेसाठी कारखान्यात गेलं. त्यानंतर त्यापासून बनवलेली साखर ही बाहेरच्या प्रदेशात गेली. अर्थात इथलं पाणी बाहेर गेलं. जमीनीत जिरलं नाही. मात्र पाण्याचा उपसा झाला. निचरा झाला नाही. मग कुठून राहणार पाणी!

आज देशाची लोकसंख्या अरबोच्या घरात होती. लोकांना तोंडातला घास पुरविणे कठीण झाले होते. आम्ही शिकतो होतो. पण आमची विचार करण्याची शक्ती मात्र पाहिजे ती वाढत नव्हती. सरकारनं कुटूंब नियोजन आणलं. पण तरीही आम्ही सुधारत नव्हतो. कुटूंब नियोजन करीत नव्हतो. का? याचं उत्तर नाही असंच होतं. आजही सुशिक्षीत समजल्या जाणा-या घरात दोनच्या वर मुलं दिसत होती.

कशी वाढणार नाही लोकसंख्या..... खरं तर कुटूंबनियोजनाला छेद देवून आम्ही आमच्या देशाची सेवा करण्यासाठी नव्हे तर आमच्या देशातील जनजीवनावर होणारा परीणाम लक्षात घेवून आम्ही एकाच अपत्याचं धोरण राबवायला हवं होतं. पण लक्षात कोणी घेत नव्हतं.

काही मंडळी याचा विचार जरुर करत की देशात आत्महत्या होवो की अजून काही होवो. आम्हाला त्यांच्याशी घेणं देणं नाही. देश डुबला तरी चालेल. आम्हाला देशाशीही काही घेणं देणं नाही. देशावर संकट आले तरी चालेल, आम्हाला आमचा स्वार्थ महत्वाचा. आमचं नुकसान नाही ना होत. बस याचाच विचार करुन आमची पिढी जगत होती. आमची पिढी आजचा दिवस साजरा करीत होती. ते खरेही होते. आजचा दिवस साजरा करणे गरजेचे होते. स्वार्थ पाहणेही गरजेचे होते. पण याचा परीणाम आपल्या येणा-या पिढीवर होईल. ती पिढी अपरीमीत संकटात सापडेल याचा जराही विचार आजच्या पिढीला नव्हता. जर का तसे वाटत नसेल तर आपण मागे वळून एकदा तरी पाहावे असं युसूफला वाटत होतं. भारताला स्वातंत्र्यता मिळवून देणा-या त्या हौताम्याकडे भरपूर संपत्ती होती. त्यांनाही स्वार्थ होता. मग का त्यांनी आपला जीव धोक्यात घातला. त्यांनी आंदोलन केल्यास इंग्रज सरकार त्यांना सोडणार नाही हे माहीत असूनही त्यांनी आपले प्राण संकटात घातले. कोणासाठी तर आपली येणारी पिढी सुखी व्हावी. सुख कोणाला नको असतं. सर्वांनाच हवं असतं. तरीही ती मंडळी आपलं सुख न पाहता या देशातील येणा-या पिढीसाठी त्यांनी सर्वच गोष्टीचा त्याग केला आणि आम्ही आमच्या येणा-या पिढीच्या सुखासाठी लोकसंख्यावाढीवर साधे नियंत्रण आणण्यासाठी त्याग करीत नाही. मुलांना देवाची संपत्ती मानून मुले देवाने जन्मास घातलेली देण आहे असे समजतो. खास करुन पुरुषवर्ग. कारण त्याला कोणतीच परेशानी नसते ना. असंही युसूफला वाटत होतं.

पुर्वी ठीक होतं की औषधांचा शोध नव्हता. साथीचे आजार यायचे. त्यात शेकडो लोकं मरण पावायचे. तसेच वारंवार युद्ध होत. त्या युद्धातही लोकं मरत. म्हणून मुले जास्त प्रमाणात जन्माला घालत. कारण लोकसंख्या कमी होती. आज मात्र तसे नाही. युद्ध कमी प्रमाणात होते. मृत्यूचे प्रमाण आजारामुळे कमी आहे. साथीचे पाहिजे तेवढे रोग येत नाहीत. पण काही समाजात जनन दर आजही जास्त आहे नव्हे तर धर्मातही. म्हणून आधी लोकसंख्या वाढीवर नियंत्रण आणावं. हम दो. हमारा एक हे धोरण निदान काही काळासाठी राबवावं. देशाला संकटावर मात करण्यासाठी.

आज देशात सा-याच समस्या आहेत. पाणी समस्या ही गंभीर समस्या आहे. देशात अन्नधान्य पिकत नाही. बेरोजगारी वाढली आहे. आत्महत्येचे सत्र जोरात सुरु आहे अशावेळी जर लोकसंख्यावाढीवर नियंत्रण आणलंच तर खरंच वरील सर्व समस्यांवर उपाय करता येईल तसेच देशाचा सर्वतोपरी विकासही करता येईल. यासाठी युसूफ सर्वतोपरी प्रयत्न करीत होता.

आम्ही भारतीय आहोत हे मानण्याची गरज आहे असे युसूफला वाटत होते. त्याला वाटत असे की मी भारतीय आहे असे म्हटल्यास आतिशयोक्ती ठरु नये. प्रत्येक नागरीक जो या भारतीय सीमेत राहतो. भारताचं खातो. त्या सर्वांनी स्वतःला भारतीय समजलंच पाहिजे. जो मानत नाही. त्यांनी रितसर अर्ज करुन या देशाचं नागरिकत्व सोडावं नव्हे तर त्यांना ज्या देशात जायचे आहे, त्या देशात जावं. कोणतीही मनाई नाही.

आम्ही भारतीय आहोत. आमची जात धर्मही भारतीय आहे. तसंच आमचं रक्तही भारतीय आहे. असं असतांना आपल्या भारतात राहून आपण कसं वागायला पाहिजे? कसे बोलायला पाहिजे? हा विचार करण्याची गरज आहे. पण आम्ही ज्या देशात राहतो. ज्या देशाचं खातो, पितो. त्याच देशाशी गद्दारीने पेश येतो. हे आमचे वागणे बरोबर नाही. आजही आम्ही आमच्याच देशात सौतेले भाऊबहिण असल्यासारखे वागतो. एकमेकांचा सावत्र असल्यासारखा मुडदा पाडतो. आपल्याच बहिणीवर बलत्कार करतो. नव्हे तर भारत देश मुर्दाबाद आणि पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देतो. तसंच इथला भारतीय बंधू या भारताची शान असणारा आमचा राष्ट्रध्वज तिरंगा फाडतो. तोही पाकिस्तान जिंदाबाद म्हणून. नव्हे तर तो फाडतांना व्हिडीओही व्हायरल करतो. याच देशात राहून, याच देशातलं खावून... ... त्यांना त्यांनी करत असलेल्या कृत्याची लाजही वाटत नाही. इथेच राहून पाकिस्तान जिंदाबाद म्हणण्याचीही लाज वाटत नाही. त्यांची जीभही कचरत नाही. एवढा बेडरपणा... ... ही सत्यता आहे. याच देशात राहणारा भारतीय नागरिक..... मग तो कोणत्याही धर्माचा का असेना, त्याला भारताबाबत प्रेम असायलाच हवं. पण इथल्या भारतीय बंधूनं तसं प्रेम न दाखवता या भारताचा राष्ट्रध्वज फाडणे वा पाकिस्तान जिंदाबादचे नारे लावणे ही शोकांतिका आहे.

ज्यावेळी भारत स्वतंत्र झाला. त्यावेळी महात्मा गांधीना वाटत होतं की हा भारत एकसंध राहायला हवा. पण बँरीस्टर जीनाने पदाच्या लालसेने पाकिस्तानची मांग केल्यामुळे आज पाकिस्तान बनला हे जरी खरं असलं तरी निर्वासीताचा प्रश्न मिटायचा होता. येथील काही संस्थानिक कोणी स्वतःला स्वतंत्र समजत होते. तर कोणी पाकिस्तानात सामील होण्याची वाट पाहात होते. मग असे असतांना जेव्हा तो निर्वासीताचा प्रश्न मिटला. तेव्हा पाकिस्तान जिंदाबाद आलेच कुठून? आज पाकिस्तान भारताची फाळणी होवून एवढी वर्ष झाली तरीही पाकिस्तान जिंदाबादचे नारे! ही आश्चर्य करणारी बाब आहे आणि आता जर असा राष्ट्रध्वज फाडायचा प्रयत्न केल्यास कायदा शिक्षा देईल तेव्हा देईल. पण त्यापुर्वी आमचा येथीलच भारतीय बंधू त्या राष्ट्रध्वज फाडणा-याला जाब विचारल्याशिवाय राहात नाही. शिवाय त्याचा समाचार घेतांनाही व्हिडीओ व्हायरल करतो.

युसूफ जेव्हा विचार करायचा. आणखी वाटत असे की आताही वेळ गेलेली नाही. आजही जर वाटत असेल की पाकिस्तान बरा आहे. तर पाकिस्तान जिंदाबाद म्हणण्याची गरज नाही. स्पष्टपणे सांगावे. आम्हाला पाकिस्तानात जायचे आहे. आम्ही तुम्हाला अडवणार नाही. खुशाल जावू देणार. तसेच हेही सांगू की 'तुम्हाला येथील राष्ट्रध्वज फाडायची गरज नाही. पण आमची जी राष्ट्रीय बिरुदे आहेत. राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत आणि राजमुद्रा... ... यावर घाव घालू नका. आम्ही ते खपवून घेणार नाही. कारण आम्ही भारतीय आहोत. भारतीय होतो आणि भारतीय राहणार. '

युसूफ जेव्हा त्या काश्मीरचं दृश्य ऐकायचा. तेव्हा तो लोकांना सांगतांना म्हणायचा, 'आज आमचा काश्मीर धगधगत आहे. तिथे रोजच असे पाकिस्तान जिंदाबादचे नारे लागतात. तसेच तेथील महिलेला सुरक्षा नाही. त्यांना खुलेआम घराबाहेर पडता येत नाही. तिथे रोजच राष्ट्रध्वज फाडले जातात. नव्हे तर भारताला शिव्याही दररोजच हासडल्या जातात. आम्ही भारतीय नाही असे जबरदस्तीनं वदवलं जातं. अर्धा काश्मीर पाकव्याप्त असल्याचं बोललं जातं. काय तो काश्मीर त्या पाकिस्तानच्या बापाचा अाहे काय? तरीही असे असतांना आम्ही शांततावादी धोरणाचा पुनरुच्चार करतो. तो पाकिस्तान आमच्या दररोज शेपटावर पाय देतो. आमचे सैनिक मारतो. अन् आम्ही त्यांच्याशी मित्रत्वाचे संबंध ठेवतो. आमचे काश्मीरचे राजनेतेच स्वतःचे व्हिडीओ व्हायरल करतात. म्हणतात की आंतकवाद्याला आम्ही सत्तेवर आल्यावर सोडू. कशाला सोडू. ज्यांनी भारताची अस्मिता बिघडविण्याचा प्रयत्न केला. त्यांना अभय देणे बरोबर आहे का? तरीही आम्ही हे सगळं सहन करतो. त्यांच्या चुका पदरात घेतो. कारण आम्ही भारतीय आहोत. हे त्यांनी तरी समजून घ्यावं. वायफळ वादाचे विषय बनवू नये. वाद करु नयेत.