Ardhantar - 19 books and stories free download online pdf in Marathi

अधांतर - १९

"इतना आसान नही, अपणे तरीकेसे जिना,
अपनोको ही, खटकती है मनमर्जी हमारी।"


कुठे तरी वाचलं होतं हे, कोणी लिहिलंय माहीत नाही...पण, नुसतं वाचायला छान वाटलेलं वाक्य खर ही होऊ शकते याची अनुभूती मला आता माझ्या आयुष्यात येत होती...जोपर्यंत मी सगळ्यांच्या गोष्टी काळ्या दगडावरची रेष म्हणून डोळे झाकून मान्य करत होती तोपर्यंत सगळं ठीक होतं, घरचे आणि नवरा बोलेल ती पूर्व दिशा असं समजत होती तेंव्हा मी अगदी आदर्शवादी होती...पण स्वतःच्या माकलीच गहाण ठेवलेलं आयुष्य जेंव्हा स्वतःच्या मर्जीने जगण्याचा प्रयत्न केला तेंव्हा मात्र मी सगळ्यांच्या नजरेत वाईट झाली, अचानकपणे माझे संस्कार, माझे आदर्श, इतकंच काय तर माझं चरित्र ही चुकीचं झालं...वाह रे दुनिया...! आणि हे सगळं ठरवण्यात माझे स्वतःचेच लोकं अग्रस्थानी होते ते पाहून जास्त दुःख झालं....

मी आणि बाबा निघून आलो नागपूरला, आल्यानंतर दोन दिवस घरात कोणीच माझ्या आणि विक्रमच्या विषयावर बोललं नाही, आणि मलाही ईच्छा नव्हती विक्रम बद्दल काही बोलायची, त्याने जे आरोप प्रत्यारोप माझ्या वर केले होते ते मला फार दुःख देऊन गेले होते...पण जीव तर होता माझा विक्रम मध्ये, तो जेवला असेल का, त्याची नाईट शिफ्ट असेल तर झोप झाली असेल का ? असे अनेक प्रश्न माझ्या मनात घोळत होते, खूप विचार केला त्याला फोन करू की नको, कारण तो उचलणार नव्हता हे माहीत होतं, मन इतकं अशांत असल्यावर एकदा हे ही वाटलं की अभय सरांना बोलू का? पण नाही बोलली, कारण मला त्यांनी आधीच खूप मदत केली होती, आणि त्यांनी केलेल्या शुद्ध मैत्रीत मी त्यांना काहीच देऊ शकणार नव्हती, त्यामुळे माझ्या वैयक्तिक अडचणींमध्ये त्यांना मला शामिल करायचं नव्हतं...आणि तसही आता ही मैत्रीही संपुष्टात आली होती...

या विचारांमध्ये एक आठवडा निघून गेला, एव्हाना बाबांनी आईला सगळं सांगितलं होतं भंडाऱ्याला काय झालं ते...बाबांनी विक्रमला फोन केले त्याने उचलले नाही, मला बोलून दाखवत नव्हते तरी मला बाबांच्या चेहऱ्यावरची चिंता स्पष्ट दिसत होती...मला याची जाणीव होतं होती की फक्त माझ्यामुळे बाबा इतके हताश आहेत, आणि फक्त बाबांचा विचार करून मी विक्रमला फोन केला आणि यावेळी अनपेक्षितपणे यावेळी त्याने माझा फोन उचलला,

"बोला नैना मॅडम?? कशी आठवण काढली आमची? की अभयला फोन करायचा होता आणि चुकून मला लागला??"

"मला तुमच्या कोणत्याच प्रश्नांची उत्तरं नाही द्यायची, पण तुम्ही बाबांचे फोन का उचलत नाहीयेत? ते काळजीत आहेत, त्यामुळे मी केला फोन...."

"तेच ना, तुला सगळ्यांची काळजी आहे, फक्त नवऱ्याची नाही..सांग तुझ्या बाबांना काही काळजी नका करू, उद्या मी येतोय तिथे, माझ्या प्रश्नांची उत्तरं नाही द्यायची ना तुला, ठीक आहे आता सगळ्यांसमोर बोलायला तयार हो मग..."

आणि असं बोलून त्याने फोन ठेवला, त्याला कळलंच नाही कधी की मी त्याची किती काळजी करते, पण जे नाही ते बरोबर त्याने सगळ्यांना पटवून सांगितलं...आता तो येणार म्हणजे माझ्यासाठी काहीतरी नवीन अडचण येणार हे मला माहीत होतं, आणि झालंही तसंच...त्याच दिवशी बाबांना त्याच्या घरून फोन आला की ते सगळे येणार आहेत भेटायला, आता ते फक्त भेटायला नाही तर माझ्या चुकांच पुराण वाचायला येणार आहेत हे मला कळत होतं...

विक्रम आणि माझे सासू सासरे यायच्या आधी आई बाबांनी मला माझ्या वाणीवर नियंत्रण ठेवण्याचा लाख मोलाचा सल्ला दिला नेहमीप्रमाणे... बाबांचं मत होतं की ते विक्रमला बोलत असतांना मी मधातच राग व्यक्त केला आणि त्यामुळे विक्रम आणखी चिडला आणि त्यांना मला घेऊन नागपूर ला यावं लागलं, नाहीतर सगळं काही तिथेच सुटलं असतं... असो, बाबांना काहीही सांगण्याचा फायदा नव्हता..

विक्रम आणि त्याच्या घरचे आल्यावर मी जेव्हा त्यांच्या समोर गेली त्यांनी माझ्याकडे एक नजर टाकून पाहिलं ही नाही, मला आता याची जाणीव होत होती की विक्रम सगळं काही करून बरोबर सगळा दोष माझ्यावर आणून ठेवणार...विक्रम ने आधी बोलायला सुरुवात केली, प्रत्येक गोष्ट खरी असूनही त्याला खोट्याचं स्वरूप कसं द्यावं यात विक्रम कदाचित तरबेज झाला होता, बाकी स्वतःचा मोठेपणा आणि अहंकाराचा गवगवा करण्यात तर त्याचा हात कोणीच पकडू शकत नव्हता...एक बायको म्हणून मी किती अयशस्वी ठरली याची वकिली त्याने खूप चांगली केली होती...जसं की, मला स्वयंपाक येत नाही तरी तो कसा ऍडजस्ट करतो, त्याला वेळेवर जेवण नाही दिलं तरी कसा समजून घेतो, मला NGO मध्ये काम करायला परवानगी देऊन तो किती आधुनिक विचारांचा नवरा आहे, मला परीक्षा द्यायला ही काही मनाई केली नव्हती त्याने, मला कधीच कोणत्याच गोष्टींची कमी भासू दिली नाही, वैगरे वैगरे.... मी ऐकत होती गुपचूप, पण आता त्याने जे बोलायला सुरुवात केली होती ते ऐकून मात्र मला आश्चर्य, राग, त्याचा द्वेष सगळंच वाटत होतं......घरच्यांसमोर ज्या गोष्टी मांडल्या त्या अर्धसत्य होत्या...

विक्रमने खूप सफाईने माझं आणि अभय सरांचं नातं किती मलिन आहे हे सगळ्यांना पटवण्यात काहीच कमी ठेवली नव्हती...मी अभय सरांना कॉलेजपासून ओळखते हे पण सांगून मोकळा झाला तो, जेंव्हा की मी त्याला स्पष्ट सांगितलं होतं की आम्ही एका कॉलेजमध्ये जरी शिकलो असलो तरी त्यांची आणि माझी ओळख तेंव्हा नव्हतीच, ते मला खूप सिनिअर होते...पण विक्रमने तर माझ्या सत्याला कहाणीच्या रुपात रंगवलं होत, त्याने तर खोट्यालाही लाजवेल इतकं खोटं सगळं सांगितलं...त्याला बदनाम करण्यासाठी अभय सर सतत प्रयत्नशील असतात आणि त्यामुळेच त्याला नक्षलवादी प्रकरणात फसवत आहेत, त्यामागचं महत्त्वाच कारण हे की त्यांना माझ्यात जास्त रस आहे आणि मी पण त्यांना यात मदत केली...आणि माहीत नाही काय काय बोलून तो मोकळा झाला...

आता सगळ्यांच्या, विशेषतः माझ्या सासू सासऱ्यांच्या नजरा मला गुन्हेगार म्हणूनच बघत होत्या, आणि हे सगळं घडत असतांना मी जेंव्हा बोलण्याचा किंवा माझी बाजू मांडण्याचा प्रयत्न करत होती मला गप्प बसवल्या जात होतं किंवा माझं काहीही ऐकून न घेता माझं बोलणं मधेच तोडल्या जात होतं त्यामुळे मी चिडून माझा आवाज वाढवला तर आता सगळ्यांच्या नजरेत मी तापट आणि उद्धट झाली होती...कसं कळत नाही आपल्याच लोकांना की जेंव्हा एखादी शांत व्यक्ती चिडते तर त्यामागे नक्कीच काही ठोस कारण असलं पाहिजे..माझं चिडणं सगळ्यांना दिसलं पण माझी तगमग नाही दिसली कोणाला...आणि या सगळ्यांमध्ये विक्रमच्या आईचे माझ्यावर त्यांनी किती उपकार केले हे मोजणे सुरू होते, जसं की, त्यांच्या मुलाला खूप श्रीमंत घरातून स्थळ आले होते पण त्यांनी काहीही अपेक्षा न ठेवता (जो हुंडा घेतला होता ते त्या विसरल्या होत्या) त्यांनी मला सून करून घेतलं, आणि आता माझ्या हातून एवढी मोठी चूक घडून ही ते मला दुसरी संधी द्यायला तयार आहेत वैगरे...आणि माझ्या बाबांनी काय केलं, त्यांनी गुपचूप त्यांच्या प्रत्येक गोष्टीला मंजुरी देऊन मला अक्कल नाही हे सिद्ध केलं, जेंव्हा की त्यांना काय चूक काय बरोबर हे माहीत होतं...आणि यामागचं एकंच कारण, ते म्हणजे, ते एका मुलीचे वडील आहेत...आज या सगळ्यांचा विचार केला की असं वाटते, कोणत्या शतकात जगतोय आपण??

मी आई बाबांना सांगण्याचा प्रयत्न केला की सध्या तरी माझी मनस्थिती नाही विक्रम सोबत जाण्याची तर मला समजवण्यात आलं की अश्या छोट्या मोठ्या गोष्टी होतच असतात नवरा बायको मध्ये, असं ताणून धरल्याने नातं तुटते, आणि बाईच्या जातीला एवढा घमंड नसायला पाहिजे, शेवटी मुलीचं आयुष्य माहेरी किती दिवस निघणार..हे सगळं ऐकून मला एकच जाणीव झाली, मुलीचा जन्मच मुळात आयुष्यभर परकं म्हणून राहायला असतो...नवऱ्याच्या घराला ती आपलं मानते पण ते मात्र तिला आपलं मानत नाही आणि लग्न लावून वाटी लावल्यावर तर तिच्या घरच्यांनी आधीच तिला परकं केलेलं असते, मग अश्या परिस्थितीत नक्की तिचं घर कोणतं हेच तिला कळत नाही, माझीही अवस्था तीच होती...

सगळ्यांच बोलून झाल्यावर मला विचारण्यात आलं की माझा निर्णय काय आहे विक्रमबाबतचा?? विचारल्या गेलं खरं, पण माझं उत्तर ऐकण्यात कोणीही रस घेतला नाही, शेवटी एक फर्माण सोडण्यात आलं की पंधरा दिवसांत विक्रम त्याच्या काही महत्त्वाच्या ड्युटीतून मुक्त होईल आणि मला घेऊन जाईल, अर्थात मी न केलेल्या चुकी साठी मला दोषी ठरवून, दुसरी संधी देण्यात आली होती...हसू येत होतं या विडंबनेवर.. आता मला पंधरा दिवस देण्यात आले होते माझी वागणूक सुधारण्यासाठी.. जाता जाता सगळ्यांसमोर विक्रम मला बोलून गेला खरं की झालं गेलं ते विसरून आता नवीन सुरुवात करायची आहे पण त्याच्या शब्दांत दडलेला अर्थ मी ओळखू शकत होती, कारण विक्रमचे बदलते रंग मला चांगल्याने ठाऊक होते, त्याच्या शब्दांचा अर्थ एकच होता की त्याने मला शेवटी वठणीवर आणलंच, पण माझ्याकडे कोणालाही काहीही सांगण्यासाठी काहीही नव्हतं, आता पुन्हा माझा विक्रमच्या आयुष्यात परतीचा प्रवास सुरु झाला होता...
-------------------------------------------------
ठरल्याप्रमाणे दोन आठवड्यात विक्रम मला घेऊन गेला, तिथे गेल्यावर कळलं की विक्रम साठी काहीच बद्दललं नाहीये, त्याचे तेवर, त्याची मग्रुरी तशीच्या तशीच आहे किंवा असं म्हणेल की त्याने मला आणि माझ्या घरच्यांना त्याच्या समोर झुकायला लावलं होतं त्यामुळे त्याचा अहंकार अजून प्रबळ झाला होता...आणि माझ्यासाठी.. माझ्यासाठी भरपूर काही बदललं होतं, माझं NGO मध्ये जाणं बंद झालं होतं, विक्रमने घरातले सगळे पुस्तकं गायब केले होते जेणेकरून मला अभ्यास न करता यावा, आणि मी आयुष्यात काही करू शकते ही प्रेरणा माझ्यापासून दूर झाली होती...अभय सर.. हो, त्यांची तडकाफडकी बदली झाली होती भंडाऱ्यातून, आणि हे पण मला विक्रमच्या वागणुकीतून कळलं, ते कुठे गेले ते नाही कळलं, पण माझ्या आयुष्यातला शेवटचा आशेचा किरण ही त्यांच्या जाण्याने मावळला होता....

दिवसामागून दिवस जात होते, तीन महिने झाले होते इकडे येऊन, पण माझ्यासाठी प्रत्येक दिवस सारखाच होता...विक्रमची जी हुजूरी करणं, घरातले कामं करणं आणि त्याने मारलेले टोमणे ऐकणं, हेच आयुष्य झालं होतं...अभय सर मला जितक्या चांगल्या गोष्टी शिकवून गेले होते ते मी नैराश्याच्या गर्तेत विसरत जात होती..अभय सरांची बदली कुठे व का झाली हा प्रश्न अजूनही अनुत्तरित होता..एक दिवस विक्रमला कोणाशी तरी बोलताना ऐकलं फोनवर..,

"हा नवा SP बरा आहे, कमीतकमी त्या अभय सारखं इमानदारीच भूत नाही त्याच्या डोक्यावर, नक्षली ऑपेरेशन करायला चालला होता, माओवादी कोणाचं ऐकतात जे आपलं ऐकणार आहेत, त्यांना त्यांच्या मनाने जगू द्यावं, कशाला त्यांना आत्मसमर्पण करायला लावायचं, त्यांनी आत्मसमर्पण केलं हे खोटं ही दाखवता येते ना कागदोपत्री, सरकारकडे पैसा कमी आहे का?? समुद्रातले दोन थेंब कमी झाले तर काय फरक पडतो... "

त्याच्या बोलण्यातून एक कळलं होतं नक्की, की आता विक्रम खाकी कपड्यांच्या मागे लपलेला सराईत गुन्हेगार झाला होता, आणि मी काहीही करू शकत नव्हती..वाईट अभय सरांसाठी वाटत होतं की एवढे ऑफीसर असूनही त्यांना चौथी पास अशिक्षित पुढाऱ्यांच्या राजकारणाला बळी पडावं लागते...विक्रम बोलत असतांना त्याची नजर माझ्यावर पडली आणि माझ्याजवळ येत तो मला बोलला,

"दुःख झालं ना नैना???"
मी प्रश्नार्थक भावाने त्याच्याकडे पाहिल्यावर बोलला,

"अग, अशी काय करते, तुझा मित्र गेला इथून, याचं दुःख झालं असेल ना तुला?? मलाही झालं, पण काय करणार, कर्म शेवटी..! मला त्रास दिला त्यानी, मग त्याची फळं तर भोगावीच लागतील त्याला...हो ना??"

"हो, बरोबर बोलतात, कर्मच ते..! त्यांचे कर्म म्हणूनच तर बदली होऊन ही ते एक IPS च आहेत, आणि ते कुठेही गेले तरी तुमच्यापेक्षा त्यांचा रँक वरचाच राहणार..बरोबर आहे कर्मच शेवटी...!!"

माझ्या उपरोधक बोलण्याने विक्रमचा अहंकार दुखावल्या गेला, पण मला त्याचा काही फरक पडला नाही...असं बोलतात की संगतीचा फरक पडतो आपल्यावर, मग मला प्रश्न नेहमी पडायचा की का मी विक्रमला वाईट मार्गावरून परावृत्त करू शकली नाही, माझे प्रयत्न कमी पडले होते की विक्रमचा अहंकार एवढ्या उंचीवर पोहोचला होता की माझा आवाज पोहोचलाच नाही त्याच्यापर्यंत...??

माझ्या नैराश्याने भरलेल्या आयुष्यात काहीही नवीन घडत नव्हतं, पण एक दिवस अचानक असं वाटलं की इथून पुढे सगळं काही चांगलंच होणार, तो दिवस मला माझ्या आयुष्यातला सगळ्यांत आनंदी दिवस वाटला होता जेंव्हा मला कळलं की मी आई होणार आहे..असं वाटलं कमीतकमी या नव्या जिवाच्या येण्याने विक्रमला जबाबदारी कळेल आणि तो सगळे वाईट कामं सोडून देईल...

माझ्यासाठी खरंच आनंदाचा दिवस होता तो, एकही वाईट विचार त्यादिवशी डोक्यात आला नाही.. विक्रम कधी घरी येतो आणि कधी मी त्याला सांगते असं झालं होतं, इतकी वाट मी विक्रमची कधीच पाहिली नव्हती...विक्रमच्या गाडीचा आवाज आला आणि मी पळत बाहेर गेली, माझ्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून त्याला आश्चर्य वाटलं,

"काय झालं?? आज इतक्या आनंदाने स्वागत माझं?? माझा जीव घेण्याचा काही प्लॅन आहे का?? इतकी आनंदी माझ्यासोबत तर कधी नाही दिसली तू मला.."

"काहीही नका बोलू, मला काहीतरी सांगायचं होतं खूप वेळेपासून तुम्हाला त्यामुळे तुमची आतुरतेने वाट पाहत होती घरी येण्याची...."

"का, असं काय घडलंय आज??"
विक्रम त्याचे शूज काढून घरात येत बोलला,

"मी आज टेस्ट केली, पोसिटीव्ह आलीये..."

"काय टेस्ट कशाची टेस्ट, जास्त डोकं नको खाऊ नैना, सरळ सरळ बोल, आधी थकलोय मी खूप.."
विक्रम कपाळावर आठ्या आणत बोलला...

"अरे..कसं कळत नाही तुम्हाला?? मी प्रेग्नंट आहे..."
आणि मी हे बोलल्यावर विक्रमच्या कपाळावरच्या आठ्या गायब होऊन त्याचा चेहरा ही हर्षोल्लित झाला,

"काय बोलते??? खरंच...मग तर आपण लगेच डॉक्टर कडे गेलं पाहिजे.. लवकर कळून जाईल..."
त्याला आनंदी पाहून आज मी खरंच मनातून खूप खुश होती, मी बोलली,

"हो,जायला पाहिजे, कळून जाईल लवकरच नक्की काय ट्रीटमेंट असते, कशी असते..पहिलं बाळ आहे ना आपलं.."

"हो, तेच ना, कळून जाईल लवकरच, मुलगा आहे की मुलगी..."

"काही काय बोलताय, असं कळत नसते, डॉक्टर सांगत नाहीत हे सगळं, तुम्हाला माहीत नाही का हे, गुन्हा असतो हा??" विक्रमचं बोलणं ऐकून मला थोडी भीती वाटली...

"अग हो हो, माहीत आहे, ते ना मी उत्साहत बोलून गेलो, बाळ ते बाळ असते, मुलगा किंवा मुलगी काय फरक पडतो... बरं ते सोड, तू आवर पटकन आपण जाऊन येऊ हॉस्पिटलमध्ये..."
आता विक्रमचे शब्द ऐकून माझा जीव भांड्यात पडला..

त्या दिवसांनंतर विक्रमच्या वागणुकीत कमालीचा बदल पडला, जास्तीतजास्त वेळ आता त्याचा माझी काळजी करण्यात जायचा..त्याचं माझ्यावरच रागावणं ही बंद झालं होतं, छोट्या छोट्या गोष्टीवर चिडणं, मला टोमणे मारणं.. सगळं काही बदललं होतं...आता मलाही विश्वास होत जातं होता की मी विक्रमसोबत परतण्याचा निर्णय योग्य होता, सगळ्यांना दुसरी संधी मिळायला पाहिजे आणि विक्रमला दुसरी संधी या बाळाच्या रुपात मिळाली असावी बदलण्याची...माझे काही स्वप्न होते किंवा मला काही बनायचं आहे हा विचार माझ्या मनातून निवळत चालला होता... आता विक्रमसोबतच मी माझा प्रत्येक आनंद शोधत होती, विक्रम आणि हे येणार बाळ, हेच माझं विश्व बनलं होतं...

एक दिवस विक्रम मला अचानक बोलला,
"नैना, मी काय म्हणतो, आपण एकदा यवतमाळला जाऊन येऊ, तिथे माझा एक मित्र आहे, तो बोलला की डॉक्टर चांगले आहेत तिथे, एकदा दाखवून येऊ तुला..."

"यवतमाळ?? इतक्या लांब, माझा तिसरा महिना सरत आलंय, इतक्या लांबचा प्रवास नको वाटतो मला, आणि डॉक्टर तर इथे जे आहे ते पण चांगलेच आहेत ना..तसही मी आई होणार आहे, आजारी नाही जे दहा डॉक्टराना दाखवत फिरायचं...."

"हो, पण मला काळजी वाटते ग, आणि तो खरंच चांगला डॉक्टर आहे, प्लिज जाऊयात ना, तुला काहीही होणार नाही, विश्वास आहे ना माझ्यावर...."

"हो खूप आहे, तुम्ही पण ना...इतकी काय काळजी, मी काय एकटी आई होत आहे या दुनियेत, नॉर्मल असते हे.."

"हो पण मला रिस्क नाही घ्यायची...बरं मग दोन दिवसानंतरची अपॉइंटमेंट घ्यायला लावू ना?? जाऊयात ना आपण??"

"ठीक आहे, जशी तुमची इच्छा, मला माहित आहे तुम्ही काही चुकीचं होऊ देणार नाही..."

दोन दिवसांनी आम्ही यवतमाळला पोहोचलो, मला आधीच उलट्या आणि त्यात प्रवासामुळे थकवा आला होता पण विक्रम सोबत असल्यामुळे मला ते काहीही जाणवलं नाही...आणि आधीच अपॉइंटमेंट घेतली होती त्यामुळे लवकरच नंबर आला आमचा..आम्ही डॉक्टर कडे गेल्यावर त्यांनी डायरेक्ट आम्हाला सोनोग्राफी करायला लावली, मला थोडं वेगळं वाटलं, कारण काहीही न तपासता सोनोग्राफी कोणताच डॉक्टर सांगत नाही पण तरीही विक्रमच्या विश्वसावर मी विश्वास ठेवून होती..सोनोग्राफीचा रिपोर्ट आल्यावर त्यांनी मला ग्लूकोज चढवायला लावलं..पण आता मात्र मी विक्रमला बोलली,

"विक्रम, हे काय सुरुये, आपले डॉक्टर बोलले ना आपल्याला की मी एकदम ठणठणीत आहे, मग हे का आपल्याला हे सलाईन वैगरे लावायला सांगत आहे.??"

"नैना, अग सोनोग्राफी तर करावीच लागते ना, हे तर तुला मान्य आहे ना, आणि राहिला प्रश्न या सलाईन चा तर तुला किती त्रास झाला प्रवासात, उलट्या झाल्या त्यामुळेच आहे, उगाच डीहायड्रेशन व्हायला नको ना, काळजी नको करू, एका तासात फ्री होऊ आपण..."
आणि असं बोलून विक्रम रूम मधून बाहेर जायला निघाला तर मी त्याचा हात पकडून थांबवलं त्याला,

"आता काय झालं नैना..."

"मला भीती वाटत आहे, सोनोग्राफीचा रिपोर्ट नॉर्मल होता ना??"

"हो, ठीक आहे सगळं आता तू आराम कर थोडा, विश्वास आहे ना माझ्यावर.."

"हम्म..."

पण यावेळी विक्रमच्या आवाजात एक रुक्षपणा जाणवला मला, पण हे माझ्याच मनाचे खेळ असतील म्हणून मी तो विचार सोडला...आणि हा विचार करता करता मला गुंगी येऊन झोप कधी लागली काही कळलंच नाही...जेंव्हा जाग आली तेंव्हा डोळे जड झाले होते, कमरेच्या खालचा भाग बधिर वाटत होता, खूप प्रयत्न करूनही पाय उचलल्या जात नव्हते, पण पोटात मात्र आग लागली असेल किंवा कोणी जोरदार मारा केला असेल एवढ्या प्रचंड वेदना जाणवत होत्या... हे काय घडतंय माझ्यासोबत काही कळायला मार्ग नव्हता, उजव्या हातात सलाईन असल्याने जास्त हालचाल जमली नाही आणि डाव्या हाताने माझा फोन बेडवर चाचपडण्याचा प्रयत्न केला तर तोही सापडला नाही, माझे डोळे विक्रमला शोधत होते, तर तोही नव्हता...पण तरीही मनातून निघत होतं की हे स्वप्न आहे आणि जेंव्हा पूर्णपणे डोळे उघडतील तेंव्हा सगळं व्यवस्थित असेल.... खरचं असं असणार होतं की विक्रमच्या विश्वासावर मी जो आंधळा विश्वास ठेवला होता, त्याचे हे परिणाम होते......
------------------------------------------------------------
क्रमशः