Ardhantar - 21 books and stories free download online pdf in Marathi

अधांतर - २१

"सवाल जवाब का,
किस्सा खतम होगा।
जब वक्त मेरा आयेगा,
तरिकेसे हिसाब होगा।"


राग..!! कितीही नकारात्मक भावना असली किंवा मी म्हणेल की आपण ते नकारात्मक बनवलं आहे... पण तरीही मला वाटते राग हे आपल्या भावनात्मक परिपक्वतेचं चमत्कार आहे...राग करणं ही एक सहज प्रतिक्रिया आहे, पण त्या रागाचा वापर योग्य वेळी, योग्य माणसावर आणि योग्य कारणासाठी व्हायला हवा आणि हे संतुलन राखणं अतिशय कठीण आहे...माझाही राग खूप उफाळून येत होता आणि त्याच रागात मी स्वतःच्या तब्येतीचा विचार न करता निघाली होती न्याय मागायला मागचा पुढचा काही विचार न करता, पण ते तितकं सोप्प ही नव्हतं...विक्रमने जितकं विचार करून हे हा खेळ रचला होता, मलाही तेवढ्याच संयमाने माझा राग काढायचा होता... आणि याची जाणीव मला अभय सरांना भेटून झाली...

आज विचार केला तर प्रमाणिकपणे एकच वाटते की मी विक्रमच्या सगळ्याच चुका माफ केल्या असत्या पण त्याने धोका देऊन हे कृत्य करायचं नसतं...आणि ही त्याची चूक नव्हती, हा गुन्हा होता...आज मला खरंच जाणीव झाली होती की, श्रीकृष्णाने का अश्वत्थामाला त्याचं अमरत्व श्राप म्हणून दिलं होतं...त्यानेही असाच धोका देऊन उत्तराच्या गर्भावर वार केला आणि श्रीकृष्णाला त्याला शिक्षा द्यावी लागली...अश्वत्थामा आपल्या भळभळलेल्या जखमा घेऊन अजूनही मृत्यूचा प्रतीक्षेत आहे की नाही माहीत नाही पण विक्रम मात्र त्याच्या कर्माचे भोग नक्कीच भोगतोय आता...पण त्यावेळेस त्याला कर्माचे फळ काय असतील याची चिंता नव्हती कारण तो अहंकाराने बेफाम झाला होता, त्याने त्याला मिळलेल्या सगळ्याच अधिकारांचा दुरुपयोग केला...

अभय सरांशी बोलून जरा बरं वाटत होतं आणि बरं वाटण्याचं एक कारण हे पण होतं की मला बरोबर ट्रीटमेंट मिळत होती..संध्याकाळ व्हायला आली होती, मला आधी घरच्यांना हे कळवणं गरजेचं होतं की माझ्यासोबत काय झालंय...घरी फोन करायला घेतला तर त्यावर विक्रमचे आणि बाबांचे भरपूर मिस कॉल होते, पण मला आता त्याला काहीही बोलायची इच्छा नव्हती माझी त्यामुळे मी सरळ बाबांना फोन केला, फोन उचलताच बाबांनी प्रश्नांचा भडिमार सुरू केला,
"कुठे आहेस तू नैना, विक्रम तुला शोधत आहे कधीपासून, कुठे गेलीस या अवस्थेत?? सांग कुठे आहेस??"

संकटं आल्यावर माणूस नेहमी घरी धाव घेतो म्हणे आपल्या लोकांजवळ..मलाही तेच वाटत होतं, बाबांचा आवाज ऐकून भरून ही आलं आणि जरा हायस वाटलं की मी एकटी नाही, मलाही घर आहे, माझेही लोकं आहेत...

"बाबा...ते विक्रम...तुम्हाला माहित नाही त्यांनी काय केलं माझ्यासोबत, तुम्ही लवकर या बाबा इथे, मला खूप एकटं वाटतंय..."
आणि पुढे मला काही बोलल्या जात नव्हतं इतकं दाटून आलं होतं, माझा जड झालेला आवाज ऐकून बाबा बोलले,

"बेटा, तू आधी घरी जा बरं सुरक्षित आणि आराम कर, मी विक्रमला बोलतो आणि हो काही चुकीचं करू नको, मी उद्या सकाळीच येतो तिथे...."

मी बाबांना फक्त एवढंच सांगू शकली की मी हॉस्पिटलमध्ये आहे आणि आज तरी किमान मला इथेच राहावं लागेल... अजूनही बाबांना खूप काही सांगायचं होतं पण विचार केला तसही ते येतंच आहेत त्यामुळे सगळं प्रत्यक्षातच बोलते त्यांना, पण हीच माझी चूक झाली जी तेंव्हा लक्षात नाही आली, मला फक्त एकाच विचाराने बरं वाटत होतं की बाबा येत आहेत मला घेऊन जायला...आणि हाच विचार करून मी जरा डोळे मिटून तशीच विचार करत होती की बाबा आल्यावर मी विक्रमला कायमची सोडून जाईल, तेवढ्यात माझ्या रूममध्ये मला कोणीतरी आल्याची चाहूल झाली, डोळे उघडून पाहिलं तर समोर विक्रम होता, कदाचित बाबांनी त्याला माझा पत्ता सांगितला असावा,
मला पाहताक्षणीच तो बोलला,

"मी तुला इतके कॉल करत आहे, माझा फ़ोन का नाही उचलला?? आणि तुला घरात आराम करायला सांगितलं होतं मी, ते सोडून बाहेर कुठे भटकायला गेली होती???"

मला विक्रमला काहीही उत्तर द्यायची इच्छा झाली नाही, त्यांच बोलणं न ऐकताच मी माझी मान वळवली, पण तो विक्रम होत, इतक्या सहजासहजी गप्प बसणारा तर तोही नव्हता...

"तब्येत बरी नाही म्हणून अशी वागत आहेस की डोकं ठिकण्यावर नाही तुझं..ठीक आहे घरी चल मग सांगतो, मी डॉक्टरला बोलून येतो..."

तेव्हढ्यात डॉक्टर ही आले आणि त्यांनी विक्रमला स्पष्ट सांगितलं की ते मला आजच्या दिवशी तरी सुट्टी देऊ शकत नाही, पण विक्रमने त्याच्या अधिकारांचा धाक दाखवला आणि बोलला की त्याला डॉक्टर वर भरोसा नाही आणि चुकीचं ट्रीटमेंट दिलं म्हणून तो डॉक्टरचा परवाना रद्द करू शकतो, ते ऐकून माझी तळपायाची मस्तकात गेली, कारण विक्रम आता माझ्यावरचा राग कोणावरही काढायला तयार होता त्यामुळे मीच बोलली की मला औषधं लिहून द्यावी आणि सुट्टी द्यावी.. मी असं बोलल्यावर विक्रमला खूप जिंकल्यासारखं वाटलं पण त्याला हे कळलं नाही की मी दोन पाऊलं माघार यासाठी घेतले होते कारण पुढे मला खूप मोठी लढाई जिंकायची होती त्यामुळे हे छोटे मोठे वाद करून मला माझी शक्ती पणाला लावायची नव्हती....

हॉस्पिटलच्या बाहेर आलो तर समोरून अभय सर येताना दिसले, मला आणि विक्रमला एकत्र बघून त्यांना आश्चर्य झालं असावं आणि लगेच त्यांनी आमचा मार्ग अडवत विचारलं,

"नैना, कुठे जात आहेस, आणि तुला सुट्टी कशी मिळाली आजच??? "
विक्रम माझ्याकडे आणि अभय सरांकडे बघत होता, मी काही बोलणार इतक्यात विक्रम बोलला,

"अभय सर, नैना बायको आहे माझी, ती कुठे जात आहे कुठे नाही ते विचारण्याचा अधिकारी ही माझाच.."

"हो नक्कीच ऑफीसर, पण जीला तुम्ही बायको बोलता तिला आज मरता मरता वाचवलं आहे मी आणि मीच तिला घेऊन आलो होतो इथे आणि या शहराचा SP म्हणून माझं कर्तव्य आहे इथल्या लोकांची काळजी करणं, कसं आहे, काही ऑफीसर भ्रष्ट झाले तरी डिपार्टमेंट च्या बाकी लोकांनी आपल्या जबाबदाऱ्या निभवाव्या..."
आणि अभय सरांचं बोलणं ऐकून विक्रम हसायला लागला, आणि बोलला,

"हम्म...चांगलं आहे, निभवा...सहा महिने फक्त, त्यानंतर पून्हा मागच्या वेळ सारखी बदली होईल..."

"आता यावेळी कोणाची बदली होते ते बघूच आपण...बाकी, नैना...कोणतीही वाट चालतांना यावेळी तरी तुम्हाला काळजी घेणं जमेल ही आशा करतो..."
अभय सर माझ्याकडे बघत बोलले,

"हो सर नक्कीच, आयुष्याच्या वाटेत तरी एकच चूक नेहमी नेहमी नाही करता येतं, हे कळलंय मला..."

रोज एक चूक करावी पण एकच चूक रोज रोज करू नये असं म्हणतात...खरंय, जर ही गोष्ट कळली तर तुमचा शहाणपणा जागृत आहे आणि कळत नसेल तर तुम्ही निर्लज्ज आहेत किंवा तुमचा स्वाभिमान मेलेला आहे असं मला वाटतं.. पण माझा तर स्वाभिमान आता जागृत झाला होता त्यामुळे विक्रमला संधी देण्याची चूक आता तरी मी करणार नव्हती...घरी पोहचे पर्यंत विक्रम काही बोलला नाही, मला माहित होतं ही वादळापूर्वीची शांतता आहे पण आता मी कोणत्याच वादळाला घाबरणार नव्हती, घरी पोहोचल्यावर नेहमीप्रमाणे विक्रमने माझ्यावर आरोप केले,

"सकाळी तर जीव जात होता तुझा एवढा त्रास होत होता म्हणे तुला, आणि मी गेल्यावर गेली लगेच अभयला भेटायला...खोटं बोलली तू आणि तो ही की तुम्ही अचानक भेटले आणि त्याने तुला वाचवलं आज, सगळं आधीच प्लॅन करून ठेवलं होतं ना तुम्ही...?"

"प्लॅनिंग करून धोका द्यायला अजून तुमच्या इतकं डोकं काम करत नाही माझं, पण इतक्या दिवस तुमच्या सोबत राहिली आहे त्यामुळे तुम्हाला बघून थोडे डावपेच तर मलाही यायला लागलेत..पण तुमच्या इतकी खालच्या दर्जावर नक्कीच नाही जाणार मी..."

आणि असं बोलून मी झोपायला निघून गेली, तो मागे ओरडत राहिला पण मला त्याला उत्तर देणं निरर्थक वाटत होतं, तसही दुसऱ्या दिवशी बाबा येणार होते आणि आता विक्रमला उत्तर बाबाच देणार होते....
-----------------------------------------------------
आजचा दिवस माझ्यासाठी खरंच महत्त्वाचा होता, कारण आता मी बाबांना घेऊनच जाणार होती पोलीस स्टेशन मध्ये, आणि त्यासाठी टक लावून मी बाबांची वाट पाहत होती...विक्रमला मात्र मी काहीच बोलली नाही किंवा त्याच्या कोणत्याच आरोल प्रत्यारोपावर कोणतेच स्पष्टीकरण दिले नाही, माझा मौन बघून आणि माझ्या चेहऱ्यावरची शांती बघून त्याला कस चैन पडलं असेल?? त्यामुळे माझं मन विचलित करायला तो बोलला,

" नैना दरवाज्यावर एवढ्या येरझार्या का घालत आहेस?? कोणाची वाट पाहणं सुरू आहे?? पुन्हा माझी तक्रार केली का तुझ्या बाबांकडे? मला सोडून नागपूरला जाशील का पुन्हा?? स्वतःची काहीच लायकी नसताना का एवढे कष्ट घेते काय माहित? काय कमतरता आहे ग तुला इथे? सगळीच तर सुखं आहेत पण तुला उपभोगता येत नाहीयेत आणि मला माझ्या चुका दाखवते..."

"नाही...अजिबात दाखवणार नाही कारण तुमचा अहंकार तुम्हाला तुमच्या चूका बघूच देणार नाही त्यामुळे मी माझा वेळ आणि माझी ताकत तिथे खर्च करणार नाही...त्याव्यतिरिक्त ही भरपूर काही करायचंय मला.. "

ज्याच्या मेंदूवरच अहंकाराचा पडदा पडला असेल त्याला काय सांगू मी, त्यामुळे मी गुपचूप बाबांची वाट पाहत बसली...पण आज विक्रम का घरी होता हे मला कळलं नाही, एरवी ऑफिस च्या नावाने घरात कधीही न थांबणार विक्रम घरी का हा विचार एका क्षणांसाठी माझ्या डोक्यात आला पण मी तो दुर्लक्षित केला...आणि आले बाबा एकदाचे, त्यांना पाहून माझ्या जीवात जीव पडला आणि मला माझे हुंदके आवरणे कठीण झाले...बाबांनी जेंव्हा मायेने डोक्यावरून हात फिरवला मी माझे सगळे दुःख विसरुन गेली..शेवटी माझंही हक्काचं कोणीतरी आहे ही जाणीव झाली...पण ही जाणीव जास्त वेळ टिकू शकली नाही, कारण विक्रमने त्याचा खेळ आधीच खेळून झाला होता...मी जेव्हा बाबांना विक्रम बद्दल सांगण्याचा प्रयत्न केला तर बाबा बोलले त्यांना आधीच माहीत आहे सगळं...मला आश्चर्य वाटलं की विक्रमने स्वतःच्या तोंडाने स्वतःची कर्तुत सांगितली कशी?? मी बाबांना विचारलं,

"काय सांगितलं विक्रमने तुम्हाला बाबा?"

"हे बघ नैना, बाळाची वाढ होत नव्हती त्यामुळेच विक्रमने हा निर्णय घेतला, मान्य आहे त्याने तुला सांगायला हवं होतं पण तू किती चिडचिड करतेस आधीपेक्षा, शांततेने कोणती गोष्ट ऐकत नाही आणि बोलत ही नाही..."

मला कळलं की विक्रमने खोटं बोलून बाबांना बाटलीत उतरवलं आहे, पण त्यांना आता मी सगळं खरं सांगणार होती...विक्रमने कसं मला यवतमाळला नेलं, कशी त्याने तिथे सोनोग्राफी करून घेतली आणि आल्यानंतर तो माझ्या सोबत कसा वागला हे सगळं मी बाबांना सांगितलं.. त्यांना ऐकून धक्काच बसला, मी बाबांना बोलली की मला कम्प्लेन्ट करायची आहे विक्रम च्या विरोधात, विक्रमने ते ऐकलं आणि बोलला,
"बघा बाबा, तुमच्या मुलीचे कारनामे बघा... नवऱ्याच्याच विरोधात जात आहे ती, आणि हे कोणामुळे तर फक्त तिच्या त्या मित्रामुळे, तो शिकवतोय तिला सगळं, पण सांगून ठेवतो जर नैना ने असं काही केलं तर माझ्याकडे येऊ नका पुन्हा, ठेवा तिला तुमच्या घरी आयुष्य भरासाठी..."

विक्रमने एक धमकी बाबांना दिली आणि बाबा मला समजवायला लागले की असे घरगुती वाद बाहेर नेऊ नये, विक्रमला सगळे मिळून समज देतील, चांगल्या घरातले लोकं घरातले वाद चार भिंतीच्या आतच सोडवतात, वैगरे वैगरे... मला विक्रमच्या वागणुकीचा जेवढा धक्का पोहोचला नव्हता तेवढा बाबांचे शब्द ऐकून मिळाला होता...चार भिंतीतला वाद म्हणजे??? म्हणजे जीव जरी गेला तरी चार भिंतीत ठेवावी का ती गोष्ट?? किती अंत बघायचा मुलीचा??? आणि कोणी अधिकार दिला आहे पुरुषांना स्त्रियांचे प्रत्येक निर्णय घेण्याचे??

मला एक गोष्ट प्रकर्षाने त्या दिवशी जाणवली की एक पुरुष नवरा, भाऊ, बाबा, मित्र कोणीही असला तर आधी तो एक पुरुष असतो आणि त्यामुळेच आपल्या आयुष्यातील प्रत्येक पुरुषाला त्याच्या नात्याच्या मर्यादा आपण कधीच लांघु द्यायला नको...ते कितीही कणखर आपल्या पाठीमागे उभे असले तरी आपल्या आयुष्याचे निर्णय मात्र आपणच घ्यावेत... आणि आजपर्यंत माझ्या आयुष्यातील सगळे निर्णय बाबांनी आणि नंतर विक्रमने घेतले ज्याचे खूप गंभीर परिणाम मी भोगत होती, त्यामुळेच आता यानंतरचे सगळे निर्णय मला घ्यायचे होते...हाच विचार करून जेंव्हा बाबांना मी बोलली की विक्रम विरोधात कम्प्लेन्ट ही करणार आणि त्याला कायदेशीर घटस्फोट ही देणार तेंव्हा बाबा बोलले,

"मी तुला समजूत घालत आहे, प्रेमाने बोलत आहे तर तू त्याचा गैरफायदा घेशील का नैना?? आणि हे काय तुझ्या डोक्यावर भूत नाचत आहे घटस्फोट आणि तक्रार करण्याचे...मला वाटलं होतं माझी मुलगी समजदार आहे, नात्यांची किंमत आहे तिला आणि तीच आज एका मित्राच्या बहकाव्यात येऊन स्वतःचा संसार मोडायला निघाली आहे..हेच संस्कार आहेत का माझे?? आजपर्यंत एवढ्या पिढ्यांमध्ये आपल्या कुटुंबात असं कोणी केलं नाही घटस्फोट वैगरे...का समाजात माझी नामुष्की करायला निघाली आहेस नैना??"

आणि याच आगीत तेल ओतायला विक्रम अगदी कंबर कसून बसला होता, त्याला कोणत्याही प्रकारे मला नमवायचं होतं त्याच्यासमोर, पण माझेही निश्चय पक्के होते की यावेळी मी मोडली तरी चालेल पण वाकणार अजिबात नाही...आणि मी बाबांना बोलली,

"बाबा, इतके दिवस, तुमचे हे संस्कार, समाज, प्रतिष्ठा, तुमचे खोटे नातेवाईक यांच्या ओझ्याखालीच माझं आयुष्य गेलं, त्यात तुमची खोटी शान तुम्ही सांभाळली असेल पण माझं तर फक्त नुकसानच झालंय, आणि आजही तुम्हाला माझ्या जीवापेक्षा जास्त तेच महत्त्वाच वाटते...माझ्या गर्भात मुलगी आहे म्हणुन मला न सांगता माझ्या जीवाशी खेळ करून तो जीव मारण्यात आला याचंही काहीच वाटत नाहीये तुम्हाला?? बरोबर, वाटणार तरी कसं?? तुम्हाला तुमचीच मुलगी ओझं वाटली इतके दिवस, मग माझी तर वाटणारच...."

आतापर्यंत विक्रम मात्र सगळा तमाशा बघत उभा होता, कदाचित त्याला जे हवं होतं ते त्याने साध्य केलय असं त्याला वाटत असावं, पण मला त्याच वाईट वाटलं नाही, मला तर दुःख याचं होतं की बाबांना हे कळत होतं की मला त्रास होतोय तरी मलाच नमायला सांगत होते...बरं, नात टिकवण्यासाठी झुकण्यात काहीच कमीपणा नाही पण जर ते नातं तुमची आत्माच मारून टाकत असेल तर ते पोसून काय करायचं...आणि त्यामुळेच मी माझे निर्णय स्पष्ट सांगितले आणि माझ्यातली हिम्मत विक्रमला हादरवणारी होती, त्याने बाबांना धमकी वजा विनंती केली की जर मला असं काही करण्यापासून थांबवा अथवा त्याला ही काही कठोर पाऊलं उचलावी लागतील...आणि त्याने सोडलेला बाण बरोबर बाबांच्या निशाण्यावर जाऊन बसला आणि बाबा बोलले,

"नैना, तुझ्यासोबत जर चुकीचं झालं असेल तर त्यातून आपण नागपूर ला जाऊन तोडगा काढू शकतो, त्यामुळे शांत बस आणि नागपूर ला जायची तयारी कर...मुलीच्या जातीने एवढी अरेरावी बरी नाही..."

"नागपूरला तर नक्कीच जायचं आहे बाबा, पण ही कम्प्लेन्ट केल्यानंतर, आता तुम्ही माझी ही अरेरावी समजा किंवा माझा उद्धटपणा...."

"हा शेवटचा निर्णय आहे तुझा?? आताही प्रेमाने विचारतोय, तोंडातून काहीही अभद्र काढायचा आधी विचार करशील..."

"तुम्ही येताय पोलीस स्टेशन ला की मी एकटी जाऊ बाबा.."

मी असं बोलल्यावर विक्रमचा पारा चढला, त्याचे डोळे आग ओकत होते..बाबांसाठी मात्र हा धक्का होता, ज्यामुलीने त्यांच्या समोर तोंडातून ब्र शब्द काढला नाही तिने आज त्यांच्या शब्दांचा मान ठेवला नव्हता...डोळ्यातले पाणी लपवत बाबा बोलले,

"ठीक आहे, हाच निर्णय असेल तुझा तर तुला जे करायचं ते कर, पण आजपासून तुला कोणी आईबाबा आहेत हे विसरून जा, मी आताच्या आता परत जात आहे...तुला आता तुझा मान तुझ्या आईबाबांपेक्षा ही मोठा झाला आहे, कर तुला जे करायचं आहे ते..."

मी बाबांचं बोलणं गुपचूप ऐकून घेतलं आणि घरातून निघाली, काय उत्तर देणार होती त्यांना मी?? माझ्यासाठी त्यांच्यापेक्षा मोठं कोणीच नव्हतं या जगात पण त्यांनीही समजून घ्यायचं होत की आता प्रश्न माझ्या अस्तित्वाचा आहे..आणि ज्यांनी जन्म दिलाय त्यांना विसरून कशी जाणार होती मी...पण मी हा विचार केला की आज बाबा मला समजून घेत नसतील पण काही दिवसांनी ते मला नक्कीच समजून घेतील...

बाबा नागपुरला निघून गेले, मलाही जायचं होतं, पण मी आधी पोलीस स्टेशन ला गेली आणि विचार केला ती सगळी कामं झाली की मी पण नागपूर ला निघून जाईल, कारण आताच जर गेली तर तिथुन मला हे काहीच करता येणार नाही, आईबाबा मला मजबूर करतील हे थांबवण्यासाठी..त्यामुळे मला पोलीस स्टेशन ला जाणं गरजेचं होतं...

पोलीस स्टेशन ला गेल्यावर जेंव्हा मी त्या डॉक्टर च्या विरोधात आणि माझ्या नवऱ्याच्या विरोधात कम्प्लेन्ट केली तेंव्हा त्याचा गवगवा तर होणारच होता, कारण एक DySP च्या बायकोने हे केलं होतं...जेंव्हा बाहेर आली तेंव्हा अभय सर नुकतेच गाडीतून उतरत होते, त्यांना बघून मी तिथेच थांबली, बोलायचं होतं त्यांना पण त्यांच्या सोबत कॉन्स्टेबल होते त्यामुळे बोलायला टाळत होती...मला थांबलेलं पाहून त्यांनी कॉन्स्टेबलला आत जायला सांगितले आणि बोलले,


"धानी सी रोशनी को,
अंधेरे से लढते देखा है।
मैने बादलो से आज,
सूरज को निकलते देखा है।"


"तुम्हाला कधीच सरळ बोलता येत नाही ना??" मी बोलली,

"नाही..😂😂,...." आणि हसत सुटले, पण माझा उतरलेला चेहरा पाहून बोलले,

"कसं आहे, हसल्याने समस्या सुटत नाही पण मनस्थिती चांगली राहते, आणि मनस्थिती चांगली असली की कोणत्याही समस्येतून आपण लवकर बाहेर पडतो..आणि हे तर कोणतेही नियम नाही की जर तुमची वेळ खराब असेल तर तुम्ही हसू शकत नाही..."

"हम्म...लक्षात ठेवेल नक्की...आणि हो, ही 'रोशनी' तुमच्या मुळेच बाहेर पडू शकली आहे..."

"माझ्यामुळे कधीच काही झालं नाहीये, निसर्गाचा नियम आहे नैना, जर आपल्या आवाक्या बाहेर गोष्टी गेल्या की तिथे उद्रेकच होतो आणि सगळं भस्म होते, पण तो अंत नसतो, ती नव्या आयुष्याची सुरुवात असते...नवीन आयुष्याच्या शुभेच्छा नैना.."

"अजून सुरू झालं नाहीये सर, भरपूर गोष्टी अर्धवट आहेत,
त्यांपैकी एक ही की बाबांना मनवायच आहे...नागपूरला जात आहे..."

"म्हणजे ही शेवटची भेट की काय😥😥"

"असं कसं?? तुम्हीच तर बोलले की आधार नाही पण साथ देणार... आता नाही द्यायची का साथ??"

",अरे...नक्कीच...साथ तर मी तेंव्हाही द्यायला तयार होतो आणि आताही...पण हे तुझं नागपूरला जायचं बोलली की मला धडकी भरते...😀😁"

"हम्म, म्हणजे माझ्यामुळे ही कोणी घाबरते...हे आजच कळलं मला..."

"घाबरत नाही, पण एकदा असा जर एक चांगला मित्र दूर जात असेल तर मन अस्वस्थ होते..."

"दूर नाही, नागपूर ला जात आहे..आणि दूर तर तेंव्हा जाणार ना जेंव्हा आपण एकमेकांना दूर करू, पण आता असं काही होणार नाहीये..बरोबर ना?"

"हो..नक्कीच..मी येऊ तुला बस स्टॉप ला सोडायला??"

"तुमची साथ नक्कीच आवडेल मला, पण खूप हिंमतीने सगळं एकटीने करायचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे सुरुवात इथूनच करू द्या.... निघू मी?"

"हो..सांभाळून जा..भेटू लवकरच..."

माझ्या या निर्णयामुळे माझं आयुष्य बदलणार होत, माझ्या एका कम्प्लेन्ट मुळे सगळ्या डिपार्टमेंट मध्ये विक्रमची चर्चा होती, त्याने मला घरात ना राहण्याचा फरमान काढला, आणि मला तरी कोणती हौस होती..विक्रमच्या घरातून घेऊन जायला माझं असं काहीच नव्हतं, मी फक्त माझे कामाचे डॉक्युमेंट घेतले आणि निघाली माझ्या पुढच्या प्रवासाला...पण अभय सर बोलले होते हा प्रवास सुरु करणं जितकं सोप्प आहे त्यापेक्षाही कठीण ते अनुभवणं आहे, याचीही प्रचिती मला येणारच होती...आता माझ्याकडे परतीचे मार्ग नव्हते, ते मी स्वतः माझ्या हाताने बंद केले होते, मला पुढेच जायचं होतं..पण पुढे जात असताना आईबाबा सोबत असणार होते की ते मागेच राहणार होते हे नागपूर ला जाऊनच कळणार होतं...
----------------------------------------------------------
क्रमशः