Passport - 3 - final books and stories free download online pdf in Marathi

पासपोर्ट - भाग ३ (अंतिम )

पासपोर्ट  भाग  ३

 

भाग २ वरुन पुढे वाचा.

 

 

रंगनाथ साहेबांनी सांगितलं की हे काम इतक्या सहजा सहजी होत नाही. तुम्हाला पासपोर्ट मिळेल पण आठवडा तरी लागेल. तुमचे पेपर इंडियात जातील तिथे scrutiny होईल मगच तुम्हाला प्रोविजनल पासपोर्ट मिळेल. आता काय करायचं ? सुनीता बाई जवळ इतके दिवस हॉटेल मध्ये राहण्या साठी पैसेच नव्हते. त्यांना रडायला यायला लागलं. रंगनाथन ला काही माहीत नव्हतं. त्यानी खोदून खोदून  सुनीता बाईंना विचारलं की काय प्रॉब्लेम आहे म्हणून.

“हॉटेल वाला म्हणतो की ट्रॅवल चं बूकिंग आज संध्याकाळ पर्यंतच होतं. आता तुम्हाला इथे राहता येणार नाही कारण तुमच्या जवळ पासपोर्ट नाहीये. आणि तरीही राहायचंच असेल तर दिवसाचे १०० पौंड पडतील, आणि माझ्या जवळ एवढे पैसे नाहीयेत.” सुनीता बाईंनी त्यांची अडचण सांगितली.

“तुमचं इथे कोणी ओळखीचं किंवा कोणी नातलग आहे का ?” – रंगनाथन

“अग बाई हो, ते माझ्या लक्षातच आलं नाही. चला हा प्रश्न सुटेल आता. माझा पुतण्या असतो इथे, आणि माझ्या भावजईच्या भावाचा मुलगा पण असतो इथे. पण मी फोन कुठून करू त्यांना ?” – सुनीताबाई.

तिथे पे फोन होता. रंगनाथन सुनीता बाईंना तिकडे घेऊन गेला. म्हणाला, “ही नाणी आहेत, ही टाकून फोन लावा. वेळ संपल्यावर पुन्हा टाका.”

सुनीता बाईंनी पुतण्याला फोन लावला.

“मी सुनीता काकू बोलते आहे.

कुठून बोलते आहेस ?” – पुतण्या.

“मी लंडन हूनच बोलते आहे. जरा प्रॉब्लेम झाला आहे, माझा पासपोर्ट हरवला आहे आणि नवीन मिळायला आठ दिवस लागतील असं म्हणताहेत. मला तुझ्याकडे घेऊन जातोस का ?” – सुनीताबाई.

पुतण्या काही बोलणार त्यांच्या आधीच त्याची बायको बोलली आणि सुनीताबाईंना ते स्पष्ट ऐकू आलं. किंवा त्यांना ऐकू जावं म्हणून ती मुद्दामच मोठ्याने बोलली. काही असो, तिने नवऱ्याला झापलं. मतितार्थ  इतकाच होता की सुनीता बाईंनी त्यांच्या कडे यायचा विचारही करू नये. आणि तिनेच फोन बंद पण केला. याचीच पुनरावृत्ती भावजईच्या भावाच्या मुलाशी बोलतांना झाली. रंगनाथन ला सुनीता बाईंचा चेहरा पाहूनच कळलं की काय झालं असेल ते. त्यांना अश्या गोष्टींची सवय होती. असे ओळख नाकारणारे बरेच लोकं लंडन मध्ये राहत होते.

आता काय करायचं? सुनीता बाई आता खरोखरी निराधार झाल्या होत्या. त्यांच्या मनात येऊन गेलं की वसंत राव बरोबर असते तर ही परिस्थिती कधीच आली नसती. त्या तिथल्या खुर्चीवर बसून राहिल्या. त्यांचं डोकं आता काम करत नव्हतं. अश्या विचित्र परिस्थितीत आपण सापडू असं त्यांना कधीच वाटलं नव्हतं. त्याची कधी कल्पना सुद्धा केली नव्हती. त्यांना असं असहाय्य बसलेलं बघून रंगनाथन ला सुद्धा खूप वाईट वाटलं. तो शेजारीच चूप चाप उभा होता.

इतक्यात त्याचा एक सहकारी त्याला शोधत आला. त्याच काही काम अडलं होतं

आणि ते विचारायला तो आला होता. त्यांनी सुनीता बाईंना पाहीलं आणि त्याला थोडा फार अंदाज आला. त्यांनी रंगनाथन ला मल्याळम भाषेतून विचारलं आणि रंगनाथनने त्याला मल्याळम मध्येच काय घडलं आहे ते सांगितलं. एक सधन घरातली बाई  आणि  कोणच्या अवस्थेतून तिला जावं लागतेय हे पाहून त्याला सुनीता बाईंची कीव आली. तो म्हणाला की त्याचा एक मित्र आहे, त्याला विचारून बघू का ? तो जरा दूर राहतो पण आठ दिवस राहायचा प्रॉब्लेम सुटून जाईल. आणि तेवढ्या वेळात तू यांचा पासपोर्ट बनवून ठेव. रंगनाथन पण त्याच्या मित्राला ओळखत होता, त्याला पण ते पटलं. तो म्हणाला विचार. सुनीता बाईंना त्यांचं काहीच बोलणं कळत नव्हतं. त्या विमनस्क अवस्थेत तशाच बसून होत्या. त्यांना सगळा अंधारच दिसत होता त्यांच्या डोळ्या समोर.

रंगनाथन च्या सहकाऱ्याने त्यांच्या मित्राला फोन केला. त्याला सर्व परिस्थिती समजावून सांगितल्यावर तो तयार झाला. मग रंगनाथन ने सुनीता बाईंना सांगितलं की

“माझ्या एका मित्रा कडे तुमची आठ एक दिवस राहायची सोय होऊ शकते. तो पर्यन्त मी तुमचा  पासपोर्ट बनवतो. तुमची तयारी आहे का?”

सुनीता बाईंच्या जवळ हो म्हणण्या शिवाय काही पर्यायच नव्हता. पण त्या म्हणाल्या

“माझ्या जवळ फारसे पैसे नाहीएत. मग कसं करणार?” – सुनीता बाई

“तुम्हाला एकही पैसा खर्च पडणार नाही. मग तर चालेल?” – रंगनाथन.

अनोळखी माणसाकडे राहायचं ? त्यांना विचार पडला, पण जवळच्या लोकांनी धुडकावून लावलं होतं, त्यामुळे अजून काही शक्यता दिसत नव्हती. त्यामुळे सुनीता बाईंनी मान डोलावली.

मग रंगनाथन त्यांना म्हणाला की ऑफिस संपे पर्यन्त इथेच थांबा. मग मी तुम्हाला त्याच्या कडे घेऊन जाईन.

संध्याकाळी सहा वाजे पर्यन्त सुनीता बाई तिथेच बसून होत्या. त्यांच्या चहा पाण्याची आणि जेवणाची व्यवस्था रंगनाथन ने केली होती. त्यामुळे काही त्रास झाला नाही पण सलग इतका वेळ बसून राहिल्यामुळे अंग मात्र अखडून गेलं होतं.

ऑफिस टाइम संपल्यावर, रंगनाथन आला आणि सुनीता बाईंना घेऊन त्यांचं सामान ताब्यात घेण्या साठी, प्रथम हॉटेल वर गेले. तिथे थोडी झंझट झाली. मॅनेजर म्हणाला की चेक आउट करायला उशीर झाला आहे त्यामुळे, एक दिवसाचे १०० पौंड आणि आमचा कस्टमर वापस गेल्यामुळे, ३०० पौंड एक्स्ट्रा असे ४०० पौंड द्यावे लागतील.

सुनीताबाईंना त्यांच्या बोलण्याचा आशय कळला  पण त्यांच्या जवळ केवळ २५० पौंड होते, काय करायचं आता ? त्यांनी प्रश्नार्थक मुद्रेने रंगनाथन कडे पाहीलं. रंगनाथन ला त्यांचा प्रॉब्लेम माहीत होता, त्यांनी मॅनेजरला पटवून देण्याचा प्रयत्न केला पण तो मुळीच बधत नव्हता.

शेवटी रंगनाथनने हॉटेलच्याच फोन वरुन सरकार मधल्या एका उच्चपदस्थ व्यक्तीला फोन केला.

पाचच मिनिटांनी मॅनेजरला हॉटेल मालकांचा फोन आला आणि मग एकही पैसा न देता सुनीताबाईंची सुटका झाली. त्यांचं सामान वापस मिळालं. आणि ते रंगनाथन च्या मित्रांच्या घरी जायला निघाले.

आपण कोणाकडे चाललो आहोत ? सुनीताबाईंनी विचारलं.

शेखरन नाव आहे त्याचं. तो आणि त्याची बायको हेमांगीनी अशी दोघंच राहतात नुकतच लग्न झालं आहे त्यांचं.

ते लोकं कसे तयार झालेत ? माझ्या माणसांनी तर मला ओळख सुद्धा दाखवायचं नाकारलं.

केरळी लोकं जग भरात पसरले आहेत. त्यामुळे कोणा न कोणावर असे प्रसंग कधी ना कधी येतच असतात. आपणच आपल्या माणसांना मदत केली नाही तर ते बरोबर होणार नाही. आता तुम्ही मल्याळी नाही पण भारतीय तर आहात, आणि एका असहाय्य महिलेला मदत केली नाही तर वरती आम्हाला जागा तरी मिळेल का ? खरं म्हणजे मी मा‍झ्याच घरी तुम्हाला नेलं असतं पण माझी  फॅमिली मोठी आणि घर अगदी छोटं आहे म्हणून शक्य झालं नाही. पण तुम्ही चिंता अजिबात करू  नका. ही माणसं चांगली आहेत. याचही घर छोटच आहे पण ते दोघंच आहेत ना, मग तुम्ही सामावून जाल. आणि आठच दिवसांचा तर प्रश्न आहे.

शेखरन च्या घरी पोचले. सुनीताबाई, जरा भीत भीतच घरात  शिरल्या. समोरच हेमांगीनी उभी होती. ती सुनीताबाईंना आत घेऊन गेली. पाहता क्षणीच हेमांगीनी, सुनीताबाईंना आवडली. शांत सोज्वळ चेहरा पाहून सुनीताबाईंना जरा बरं वाटलं. दुधात साखर म्हणजे ती मुंबईची होती, तिचं आणि सगळं शिक्षण मुंबईतच झालं होतं त्यामुळे तिला चांगलं मराठी आणि हिन्दी येत होतं. सुनीताबाईंना पाहिल्यावर तिने ओळखलं की सुनीताबाई मराठी आहेत म्हणून. तिने एकदम मराठीतच बोलायला सुरवात केली. आता सुनीताबाईंना आश्चर्याचा धक्का बसला.

थोड्याच वेळात त्यांच्या गप्पा चांगल्याच रंगल्या. हेमांगीनीला तर माहेराचाच भास झाला. थोड्या वेळाने सुनीताबाईंना सांगून रंगनाथन निघाला. पासपोर्ट झाल्यावर कळवतो म्हणाला. आता सुनीताबाईंना कसलीच चिंता नव्हती. थोड्या वेळाने हेमांगीनी किचन मध्ये गेली, तिच्या पाठोपाठ सुनीताबाई पण गेल्या. हेमांगीनी म्हणाली की अहो तुम्ही बसा.

अग मी मदत करते ना तुला. सकाळ पासून नुसतं बसून बसून कंटाळा आलाय.

सुनीता बाई आल्या होत्या म्हणून हेमांगीनीनी खास बॉम्बे स्टाइल स्वयंपाक केला. शेखरन ला पण जरा बरं वाटलं की जेंव्हा सुनीताबाई आल्या तेंव्हा किती हवालदिल दिसत होत्या, पण आता त्या अगदी घरच्या सारखं वावरत होत्या. चेहऱ्यावर काळजीचा माग मूस पण दिसत नव्हता सुनीताबाईंच्या मधे हा बदल इतक्या लवकर कसा  झाला असं त्यांनी हेमांगीनीला विचारलं. आणि तिने उत्तर दिलं की “हा सगळा भाषेचा परिणाम आहे. आम्ही मराठीत बोलतो आहे म्हणून त्यांना अगदी घरच्या सारखं वाटतंय.”

सुनीताबाईंची हकीकत ऐकून  हेमांगीनीला खूप वाईट वाटलं. पण ती म्हणाली की रंगनाथन साहेब सर्व ठीक करतील याची तिला खात्री आहे. सुनीता बाईंना पासपोर्ट नसल्या मुळे कुठे बाहेर जाणं शक्य नव्हतं म्हणून हेमांगीनी सुद्धा कुठे जात नव्हती. दोघींची इतकी घनिष्ट मैत्री झाली की आठ दिवस कसे निघून गेले ते कळलंच नाही.

मधल्या काळात, वसंत रावांना  फोन करावा असं सुनीताबाईंना वाटलं होतं, पण ते शक्य झालं नाही. वसंतराव काळजी करण्याचा प्रश्नच नव्हता कारण त्यांच्या मते त्या टूर एंजॉय करत असणार होत्या.

आठ दिवसांनी रंगनाथन घरी आले आणि त्यांनी सुनीताबाईंच्या हातात पासपोर्ट आणि विमाना चं तिकीट ठेवलं. सुनीताबाईंच्या डोळ्यात अश्रु आले. आणि त्यांनी ते थांबवण्याचा आजिबात प्रयत्न केला नाही. त्या भरलेल्या गळ्याने म्हणाल्या

माझ्या माणसांनी तर मला धुडकावूनच दिलं होतं. पण रंगनाथन साहेब, तुम्ही आणि हे पती पत्नी, देवा सारखे धावून आलात हो, तुम्ही भेटला नसता तर माझं काय झालं असतं त्याचा विचार पण करवत  नाही.

आणि करूही नका. हेमांगीनी म्हणाली. तिच्याही डोळ्यात पाणी होतं. सुनीता ताई, तुम्ही भेटल्या आणि माझं माहेरच मला भेटायला आलं असं वाटलं. मी दोन वर्षांची असतानाच आई गेली. त्यामुळे आईची माया कशी असते हे तुम्ही भेटल्यांवरच कळलं.

रंगनाथन साहेब, या सगळ्याला किती खर्च झाला ते सांगा म्हणजे मी परत गेल्यावर ह्यांना सांगून तुमचे पैसे पाठवून देईन.

त्याची नका काळजी करू. आम्हीच वर्गणी करून हा सगळा  खर्च केला आहे. आता परवाची फ्लाइट आहे ती  मात्र वेळेवर गाठा  आणि हा पासपोर्ट आता मात्र गळ्यात अडकावा, म्हणजे झालं. बरं येतो मी.

शेखरन आणि हेमांगीनी दोघेही त्यांना पोचवायला एयरपोर्ट वर आले होते. हेमांगीनी आणि सुनीता बाई दोघीही रडत होत्या. त्यांच्यात माय लेकीचं नातं निर्माण झालं होतं. हिंदुस्तानात आल्यावर नक्की नागपूरला येईन असं वचन घेऊन सुनीताबाई, चेक इन करायला आत शिरल्या.

 

**समाप्त**

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com