Real Stories in Marathi books and stories free download online pdf in Marathi

आजूलाबाजूला - सत्य कथा मराठी

आजूलाबाजूला

(सत्य घटनेवर आधारित कथा)

निर्देशांक

1 - अंकुश - अमिता ऐ. साल्वी

2 - अधांतरी - वृषाली

3 - आजूबाजूला - अरुण वि. देशपांडे

4 - कॉफी हाऊस- मन मोकळ करण्याची जागा.. - अनुजा कुलकर्णी

5 - गुरू आपैसी भेटती...!! - Dipti Methe

6 - डोमडी - मनीष गोडे

7 - नितळ - परशुराम माली

***

1 - अंकुश

अमिता ऐ. साल्वी

रात्री सुजाताला कशानेतरी अचानक् जाग आली. कुठून तरी अगदी दबक्या आवाजात स्त्रीचा रडण्याचा आवाज ऐकू येत होता. या नवीन घरात आल्यापासून तिच्या कानावर हे रडणं अनेक वेळा आलं होतं. तिला लहानपणी ऐकलेल्या भुतांच्या गोष्टींमधील अरण्यात रडणाऱ्या स्त्रीचे आठवण झाली, आली अंगावर काटा आला. नाही ! नाही! या गजबजलेल्या मुंबईत असं काही असणे शक्य नाही. तिने स्वतःला समजावलं.

चार महिन्यांपूर्वीच ती आणि तिचे पती दिनकर या फ्लॅटमध्ये रहायला आली होती. दोघंही दिवसभर नोकरीला जात असल्यामुळे आजूबाजूला फारशी ओळख अजून झाली नव्हती. परिसरही विशेष परिचयाचा नव्हता. तिच्या पहिल्या मजल्यावरील घराच्या बाल्कनीपलीकडे एक लहानसा रस्ता..अगदी पायवाटच ! आणि पलीकडे हाऊसिंग बोर्डाच्या खूप जुन्या चाळी! रस्त्याच्या कडेला गुलमोहराची ओळीने उभी असलेली झाडे. या झाडांच्या गर्द पाना- फुलांमधे पलीकडील चाळीतली घरे लपून गेलेली होती. हा रम्य परिसर तिला पाहताक्षणीच आवडला होता. पण हा रात्री रडू ऐकू येण्याचा प्रकार भीतीदायक होता. दुसऱ्या दिवशी रविवार होता. दोघांनाही रजा होती. दोघंही नोकरी करत असल्यामुळे एरव्ही निवांत चहा घेणं शक्य नसे. पण रविवारी दोघे गप्पागोष्टी करत एकत्र चहा घेत असत. सुजाता काही जास्त बोलत नाही हे पाहून दिनकरनी विचारले, " तुझी तब्येत बरी नाही का? चेहरा उतरलेला का दिसतोय? डोळेही लाल दिसतायत!"

त्यांना रात्रीच्या प्रकाराविषयी सांगितले, तर ते मस्करी करतील या भीतीने सुजाता त्यांना काही सांगत नव्हती. त्यांचा भुताखेतांवर विश्वास नाही हे तिला चांगलेच माहीत होते.

" हल्ली बऱ्याच वेळा तू अस्वस्थ दिसतेस. या नवीन घरात काही प्रॉब्लेम आहे का तुला?" दिनकरच्या स्वरात आता काळजी दिसत होती. त्यामुळे यांना खरा प्रकार सांगितलाच पाहिजे असा विचार करून सुजाता म्हणाली,

" इथे आल्यापासून रात्री मला बऱ्याच वेळा कुण्या बाईचा रडण्याचा आवाज ऐकू येतो आणि खूप भीती वाटते. एकदा का तो आवाज ऐकू आला की मला रात्रभर झोप लागत नाही! हा काही भुताखेतांच्या तर प्रकार नसेल ना? "

" असं काही नसतं सुजाता! तुला बहुतेक स्वप्न पडत असतील. नवीन जागा आहे नं ! मनात उगाच विकल्प येत असतील. मनातली भीती काढून टाक, आणि रात्री जाग आली तर मला उठवत जा. आपण एवढ्या रात्री रडणा-या भुताचा आपण शोध घेऊ!" दिनकर हसत हसत म्हणाले.

"यासाठीच यांना मला काही सांगायचं नव्हतं. प्रत्येक गोष्ट हसण्यावारी नेतात." मनातल्या मनात तणतणत सुजाता किचन मध्ये गेली. आणि आश्चर्य म्हणजे अचानक् मोठ्याने रडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. दोघंही आवाज कुठून येतोय हे पाहण्यासाठी बाल्कनीत जाऊन उभी राहिली. पण रस्त्यावर कोणी दिसत नव्हते. चाळींमधली घरं झाडांमधून दिसत नव्हती, पण आवाज तिकडूनच येत होता. थोड्या वेळाने सगळं शांत झालं. त्या चाळीत राहणाऱ्या पीटरचे इस्त्रीचे दुकान होते. दिनकर त्याच्याकडे इस्त्रीसाठी कपडे देत असे, त्यामुळे त्याच्याशी ओळख झाली होती. तो रस्त्याच्या कडेला त्याची रिक्षा स्वच्छ करत होता. त्याला दिनकरने विचारलं " आता रडत कोण होतं? तुमच्या चाळीच्या बाजूने आवाज येत होता."

" त्या आमच्या शेजारी दवे राहतात ना! त्यांच्या घरची ही रोजची कटकट आहे. फॅमिली मॅटरमध्ये कोणी कसं पडणार? " पीटर वैतागून बोलत होता.

" ती बाई रात्रीसुद्धा रडत असते का?" दिनकरना सुजाताच्या बोलण्याची आठवण झाली होती.

" तर काय! रात्री रात्री भांडणं चालतात. कधीकधी तर मारझोडही होते. आणि ती मुलगी रडत बसते. आम्हाला हा रोजचा त्रास आहे." पीटर सांगू लागला. " ही कांता त्यांच्या मुलाची दुसरी बायको! पहिली बायको अशीच झुरून झुरून गेली. आता ही त्यांच्या हातात मिळालीय. दिवसभर काम करून घेतात, आणि पुरेसे जेवणही देत नाहीत. हुंड्यावरून सतत टोमणे मारत असतात. तिने जरा उत्तर दिलं की हात उगारतात. काय त्या मुलीच्या नशिबात आहे, कळत नाही. आई-वडील दूर गावाला आहेत. मध्ये एकदा इथे आले होते. त्यांना रिक्षाने मीच स्टेशनला घेऊन गेलो होतो. त्यावेळी त्यांना हिला होणारा त्रास सांगण्याचा मी प्रयत्न केला. पण त्यांनी लक्ष दिले नाही. आई तर म्हणाली, "मुलगी दिली तिथे मेली! आम्ही यात काही करू शकत नाही. इथे आमच्याच घरात हाता-तोंडाची मिळवणी कशीबशी होतेय. ती आणि तिचं नशीब! दुसरं काय? " ...जर आई वडील इतके बेफिकीर आहेत, तर इतर कोणी काय करू शकणार?"

" आज काय झालं?" दिनकरने कुतुहलाने विचारले.

" आज तर तिला घराबाहेर काढलं! दरवाजातून बाहेर ढकलून दिलं. पायऱ्यांवरून धडपडून पडली. बरंच लागलं असणार तिला! जेव्हा ती रडू लागली आणि माणसं जमू लागली, तेव्हा तिला आता घरात घेऊन गेले आहेत. या गोष्टी जरी डोळ्यासमोर घडल्या तरी कोणी मधे पडत नाही. याच गोष्टीचा फायदा हे लोक घेतात."

एवढं कळल्यावर गप्प बसणाऱ्यांपैकी दिनकर नव्हते. त्यांनी दवेंच्या घराचा नंबर विचारून घेतला. दीपक नवलकर हे त्या विभागातील सामाजिक कार्यकर्ते सोसायटीच्या कामांमुळे त्यांच्या परिचयाचे झाले होते. त्यांना त्यांनी फोन लावला. "साहेब एक घरगुती हिंसाचाराची केस आहे. काही करता येईल का?"

" F I R करावा लागेल. कोणी तुमच्या नात्यातलं आहे का?"

" मी ती मुलगी---कांता- तिचं नावही मला आताच कळलं--किंवा तिच्या घरच्या लोकांना - दवे कुटुंबाला -ओळखत नाही, कधी त्यांना पाहिलंही नाही." दिनकर म्हणाले. सकाळचा सर्व प्रसंग त्यांनी नवलकरना सांगितला." अशा केसेसमध्ये ब-याच वेळा व्हिक्टिम आयत्या वेळी कच खातात . स्वतःला कितीही त्रास झाला तरी आपल्या नव-याला किंवा घरातल्या इतर माणसांना त्रास व्हावा असे त्यांना वाटत नाही. शिवाय ज्या घरात आयुष्य काढायचे तिथल्या माणसांशी दुष्मनी घ्यायला त्या घाबरतात आणि या सगळ्यामध्ये त्यांच्या वतीने तक्रार करणारा माणूस अडचणीत येतो... दुसरा काही उपाय नाही का?" दिनकरने प्रांजळपणे सत्यस्थिती सांगितली.

"ठीक आहे. इथले इन्सपेक्टर माझे चांगले मित्र आहेत. त्यांच्याशी बोलून बघतो." नवलकरसाहेबांनी आश्वासन दिले. त्यांना दवेंच्या घरचा पत्ता सांगून दिनकरने फोन ठेवला. नवलकरसाहेबांनी जरी आश्वासन दिले तरी ते ही गोष्ट फार गंभीरपणे घेतील असे दिनकरना वाटत नव्हते.

दुसऱ्या दिवशीपासून ऑफिस चालू झाले सकाळपासून रात्रीपर्यंत रोजच्या रहाटगाडग्यात ते इतके व्यस्त होते रविवारची घटना ते विसरून गेले. मधे एकदा सुजाता त्यांना म्हणाली, "हल्ली मला रात्री जाग येत नाही. बहुतेक दवेंनी कांताला माहेरी पाठवलंय किंवा त्यांच्या समझोता झालाय. तिला माहेरी पाठवलं असलं बरं झालं म्हणायचं, यांच्या जाचातून ती सुटेल. "

त्यानंतरच्या रविवारी संध्याकाळी ते इस्त्रीचे कपडे घेण्यासाठी पीटरच्या दुकानात गेले होते. पीटर तिथेच उभा होता. तिथे काम करणा-या माणसाला काही सूचना देत होता. एकदा एखादी गोष्ट हाती घेतली, की अर्धवट न सोडण्याच्या दिनकरच्या स्वभावाने उचल खाल्ली. " तुझ्या शेजारच्या सासू- सुनेमध्ये समझोता झाला असे दिसते. गेल्या आठवड्यात भांडणाचा आणि रडण्याचा आवाज आला नाही. " त्याने सहज स्वरात हसत - हसत पीटरला विचारले.

पीटरसुद्धा हसला आणि उत्साहाने सांगू लागला, " आपलं बोलणं झालं, त्याच्या दुसऱ्याच दिवशी पोलिसांची गाडी त्यांच्या घरासमोर उभी राहिली. पोलिसांना बघूनच तो-यात वागणारी कांताची सासू आणि सासरे गर्भगळीत झाले. इन्स्पेक्टरनी तीक्ष्ण नजर त्यांच्याकडे रोखत बोलायला सुरुवात केली,

"तुमच्या घरात सुनेला मारहाण होते अशी आजूबाजूच्या लोकांनी तक्रार केली आहे. तुमच्याकडच्या भांडणाचा त्यांना फार त्रास होत आहे. त्या चौकशीसाठी आम्ही आलो आहोत."

" मग घरातील लोक घाबरुनच गेले असतील." दिनकर कुतूहलाने म्हणाले.

" हो. ती दोघं नवरा-बायको गयावया करू लागली. 'आम्ही प्रतिष्ठित लोक आहोत. आणि सुनेला तर आम्ही खूप प्रेमाने वागवतो. तिला काही कमी पडू देत नाही.' असा कांगावा करू लागली. कांता समोरच होती. आदल्या दिवशी सासूने पायऱ्यांवरून ढकलल्यामुळे तिचा पाय सुजला होता. ते बघून इन्स्पेक्टर म्हणाले, " तुम्ही तिला किती प्रेमाने वागवता, हे तिच्याकडे बघूनच कळतंय. चौकशीसाठी पोलीस स्टेशनला यायचंय का तुम्हाला सगळ्यांना?"

" यावर त्यांनी डोळ्यात पाणी आणलं आणि नकारर्थी मान हलवत हात जोडले." पीटर उत्साहाने सांगत होता. "इन्स्पेक्टर पुढे म्हणाले, लक्षात ठेवा यापुढे जरी चुकून खरोखरीचा अपघात झाला किंवा तिला दुखापत झाली, तरी पहिला संशय तुमच्यावर जाईल. आणि तुम्हाला फार त्रास होईल. तेव्हा यापुढे सुनेला जपा. अन्यथा परिणामांना सामोरे जा. ही माझी शेवटची वॉर्निंग समजा."

" वा! इन्स्पेक्टर साहेबानी फार चांगलं काम केलं. " दिनकर म्हणाले.

" होय साहेब! पण यानंतर फार ताणून न धरता कधीही गरज पडली तर निःसंकोच मदत माग असे आश्वासन कांताला देऊन ते निघाले. आता घरात सगळे कांताला फुलासारखं जपतात. तिची काळजी घेतात; नाइलाजास्तव का होईना, तिला घरात सन्मानाने वागवतात. कामाला बाई ठेवली आहे. ज्या कुणी यांची तक्रार केली, त्याला कांताच्या दुवा मिळतील."

त्याच्याशी बोलण्यात जास्त वेळ न घालवता दिनकर घरी आले. त्यांनी नवलकरना फोन लावला. " साहेब त्या इन्स्पेक्टरनी खूप चांगलं काम केलं. दवे कुटुंबीयांना अशी काही तंबी दिली की कांतावर होणारे सर्व अत्याचार थांबले. एका मुलीचं आयुष्य त्यांच्यामुळे सुखी झालं. तुमचे दोघांचे खूप खूप आभार."

" खरं म्हणजे लेखी तक्रारी शिवाय पोलीस काही करू शकत नाहीत. पण इन्सपेक्टर 'विश्वास' स्वतःच्या जबाबदारीवर कारवाई करण्यासाठी गेले हा त्यांचा मोठेपणा आहे. त्यांचं व्यक्तिमत्त्व असं आहे की त्यांना बघूनच गुन्हेगार थरथर कापू लागतात! ही तर मध्यमवर्गीय माणसं!" नवलकर बोलत होते.

" त्यांना आणि तुम्हाला ----दोघांनाही तुमच्या कामासाठी खूप खूप शुभेच्छा. " दिनकरनी फोन ठेवला. पण त्यांच्या मनात विचार येत होते; ही मुलगी रडत होती म्हणून तिचे दुःख आजूबाजूच्या लोकांना कळलं तरी! तिला मदतही करता आली पण अशा कित्येक सुना आणि काही ठिकाणी घरातली वृद्ध माणसे कोणालाही कळू न देता आसवे ढाळत असतात. दुर्बलाच्या असहायतेचा फायदा कुठे सुन, तर कुठे सासू घेत असते. वरकरणी सर्व आलबेल दिसते, पण गृहकलहाच्या ह्या वाळवीने समाज पोखरला गेला आहे; बाहेरून सुसंस्कृत दिसणा-या माणसांकडून होणारे अत्याचार नियंत्रणात येणं कधी शक्य होईल का? जेव्हा सरकारने केलेले कायदे फक्त कायद्याच्या पुस्तकात न राहता, त्यांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचेल- स्वतःच्या हक्कांची जाणीव पीडितांना होईल ; तेव्हाच या गुन्ह्यांवर अंकुश ठेवणे शक्य होईल.

***

2 - अधांतरी

वृषाली

सकाळचे साडेदहा वाजत आले होते नुकतीच ती होस्टेल बाहेर पडली आणि झप झप बस कडे चालु लागली अगदी एक मिनिटाच्या वळणा वर होता बस स्टोप तीचा ...तिथे पोचताच तिला बस दिसली आणि थोडे धावत तिने बस पकडली आज तीला निघायला थोडा उशीर च झाला होता तरी बस मिळाली त्यामुळे तिला हायसे वाटले आता फक्त दहा मिनिटे आणि मग अगदी ऑफिस च्या दारात उतरणे .मुंबईत राहत असुन सुद्धा ती खुप लकी होती ..!तो लोकल चा प्रवास ..फास्ट आणि स्लो लोकल चे गणित ती एक एक सेकंदाच्या हिशोबाने सुटणारी लोकल ..वगैरे वगैरे पासून ती दुर होती हॉस्टेल जवळ बस स्टोप ..नित्यनेमाने ठराविक वेळेला सुटणारी अगदी रिकामी असणारी बस बसमध्ये गर्दी होऊ लागायच्या सुमारास तिचा स्टोप आलेला असायचा ..आणि मग उतरले की लगेच एका पंचवीस मजली इमारती मध्ये तीचे ऑफिस बस मधून उतरून फक्त रस्ता क्रॉस करायचा ..इतके सोप्पे !! ती अगदी खुश होती तीची नोकरी ,तीचे घर आणि तीच आयुष्य यावर .आई वडीलांची एकुलती एक असणारी ती दिसायला सुरेख ..द्विपदवीधर असणारी ती कोकण कन्या होती पण नोकरीचा अनुभव ,किंवा एक थोडे वेगळे आयुष्य जगायला मिळावे म्हणुन ती हट्टाने मुंबईत आली होती .बाबांनी तीला सांगितले होते ,दोन वर्ष कर नोकरी .अनुभव घे थोडा मग पाहू तुझ्या पसंती नुसार लग्नाचे ..खरे म्हणजे आईला अजिबात पसंत नव्हती मुंबई “अग कोल्हापूर ,सातारा ,पुणे ,रत्नागीरी काय कमी फर्म्स आहेत का ?कुठेही मिळेल .काय आहे त्या मुंबईत ..?नुसती धावपळ आणि गडबड ..”पण बाबा मात्र फुल पाठींबा देत तीला.शिवाय त्यांचा सख्खा भाऊ मुंबईत होताच ,त्यामुळे तशी मुंबई चांगल्या परिचयाची होती .त्यामुळे तीला मुंबईत शिरकाव मिळाला होता .पहिले काही दिवस ती राहिली काका जवळ ..नंतर मात्र त्यांच्या घरापासून थोडे दूर पण त्याच भागात असणारे एक लेडीज हॉस्टेलतिच्या नजरेत आले आणि तीने तिकडे शिफ्ट व्हायचा निर्णय घेतला .तशीही मुंबईत घरे लहान असल्यामुळे फार दिवस तीला काकाकडे राहता येणार नव्हतेच मात्र वीकेंड ला आणि इतर वेळेस कधीही घरी यायचा दिलासा तीने काकुला दिला होता तीच्या छोट्या चुलत भावाला पण सुट्टीत तिच्याशी खेळायचे असे ..तेही प्रॉमिस तिला द्यावे लागले होतेच .. ती ऑफिस ला पोचली तेव्हा लेडीज रूम मध्ये तीच्या मैत्रिणी नुकत्याच पोचल्या होत्या . मग थोडी किरकोळ बोलाचाली होऊन सर्व जण कामाला लागले .त्यांची ही फर्म खुप जुनी होती .त्यांच्या बॉस ची तीसरी पिढी ही फर्म चालवत होती .काही तरुण मंडळी, तर काही मध्यम वयीन असा स्टाफ होता त्यांचा . ऑफिस चे वातावरण अगदी खेळीमेळी चे होते .!!!मात्र कामात जराही चालढकल बॉस ना खपत नसे .बाकी इतर वेळेस टी टाईम किंवा लंच ब्रेक मध्ये भरपूर मस्करी चालत असे ऑफिसातशिवाय एकमेकांचे वाढदिवस ,केक कापणे ,नवीन डिशेस ओर्डेर करणे या गोष्टी नेहेमीच असत एकूणच भरपूर काम आणि भरपूर मजा पण असे ..कधी कधी कामा निमित्त लेट थांबावे पण लागे .पण तिथुन तीला नऊवाजे पर्यंत आरामात बस मिळत असे .त्यामुळे काळजीचे कारण नसे .. तो ऑफिस मधून बाहेर पडला आणि हलकी शिळ वाजवत लिफ्ट मध्ये शिरला रात्री आठ वाजल्या नंतर बहुतेक त्या बिल्डींग मधील बहुतांश ऑफिसे बंद झालेली असत बहुतेक येथे सर्व फर्म्स असल्याने रात्रीचे काम फारसे नसेच तो लिफ्ट मध्ये शिरला तेव्हा एकटाच होता त्याने लिफ्ट मधील आरशात पाहुन दाट केसातून कंगवा फिरवला आणि स्वता वर खुश होऊन शिळ आणखी जोरदार केली .तळ मजला आल्यावर त्याने बाहेर पडून रिक्षा बोलावली आणि रेल्वे स्टेशन कडे निघाला तो मुंबईत एका बिल्डर कडे सहायक म्हणून काम करीत होता नुकते सहा महीन्या पुंर्वी इंजिनीरिंग ची पदवी घेतलेला तो, मुळचा नागपूर चा होता पण एक अनुभव म्हणुन मुंबईत प्रथम काम करायची त्याची इच्छा होती घरी नागपूरला वडील निवृत्त कर्मचारी होते एका बहिणीचे लग्न झाले असुन ती पुण्यात मजेत होती मोठा भाऊ त्याची शिक्षिका पत्नी छोटा मुलगा हे सर्व आई वडिला सोबत नागपुरात होती .त्यामुळे थोडासा बिन्दास्त असा तो मजेत मुंबई लाईफ अनुभवत होता !त्याच्या ऑफिस पासून पुढील दोन स्टेशन नंतर असणार्या उपनगरात तो आपल्या एका नागपूरच्या मित्रा सोबत रूम शेअर करून रहात होता . आज फारच उशीर झाला काम करता करता त्यात सगळ्या मैत्रिणी पण लवकर गेल्या ..असे काहीसे विचार मनात असताना ती ऑफिस बाहेर पडून लिफ्ट मध्ये शिरली .तसे गुप्ते काका म्हणाले होते आपण एकत्र जाऊया कारण ते पण तिच्या होस्टेल जवळ रहात असत ,मग बस मध्ये सोबत असे तेवढीच ..पण त्याना अजुन निघायला उशीर होता ..आणि आज का कोण जाणे थोडे डोके पण दुखत होते त्यामुळे ती त्यांना सांगून बाहेर पडली लिफ्ट मध्ये ती एकटीच होती पण खालच्या मजल्या वर एक तरुण अचानक शिळ वाजवत आत शिरला ..ती थोडी बिचकली ..पण तिला पाहून त्याने शिळ हलकेच कमी केली ..तिने त्याच्या कडे एक नजर टाकली छान,गोरापान आणि नीटनेटकी वेशभूषा असलेला तो एकदम तिला बरा वाटला ..त्याचीही तिच्या कडे नजर गेली ..मग मात्र तिने आपले लक्ष दुसरीकडे वळवले..तिच्या मनात आले चुकून जरी आपण म्हणले आई लिफ्ट मध्ये एक छान मुलगा भेटला होता तर लगेच आईच्या चौकश्या सुरु होतील..काय करतो तो ,किती शिकलाय ,...वगैरे वगैरे तसे तिला घरातून तिच्या निवडीचे स्वातंत्र्य होते ..पण अद्याप तिचा विचार नव्हता तीला उगाचच हसू फुटले ..पण तीने ते दिसू दिले नाही हो ...त्या लिफ्ट मधल्या मुलाचा गैरसमज नको व्हायला ...!खाली आल्यावर तीने बस स्टोप च्या दिशेने चालायला सुरवात केली मागुंन रिक्षा बोलावल्याचा आवाज येत होता फारसा विचार न करता ती बस स्टोप ला पोचली रात्रीचे साडेआठ वाजले होते तेव्हा त्याने सर्व काम आवरून ऑफिस सोडले लिफ्ट पाशी पोचल्यावर त्याला समजले की लिफ्ट खाली येत आहे त्याने त्याच्या आवडीच्या गाण्या वर शिळ घालायला सुरवात केली बहुधा लिफ्ट मध्ये कोणीच नसेल असा अंदाज बाळगून तो लिफ्ट मध्ये शिरला पण आत एका मोहक तरुणीला पाहून तो अचानक चपापला ..आणि त्याने हलकेच शिळ बंद केली अगदी मवाली आहे की काय अशी शंका नको यायला या मुलीला तो विचार करू लागला ..अरेच्या अचानक ही सुंदरी आली कुठून ?या आधी तर कधीच हीला पाहिले नाही आपण ..वरच्या मजल्या वरून आली म्हणजे वर काही फर्म आहेत तिथे नोकरी करते की काय पण मग इतक्या उशीर पर्यत ती का बरे इथे असेल काही वेगळा प्रकार नाही ना ?असे विचार मनात असताना त्याने थोडे निरीक्षण करायला सुरवात केली मुलगी साधी सोज्वळ दिसत होती एक लांब शेपटा केसांचा छाती वर रुळत होता फारसी छान छोकीची वाट्त नव्हती गुलाबी कुर्ता आणि निळी जीन्स होती अंगात गळ्याला गुलाबी दुपट्टा पण होता अगदी शोभेल असा ..हातात गुलाबी बांगड्या एकां हातात घड्याळ लहान टिकली होती कपाळावर..आणि डोळ्यात काजळ पण ..!त्याच्या मनात आले आजकाल कोण लावते टिकली ?इतकी साधी कशी काय बरे ही मुलगी .तीने मात्र त्याच्या कडे साफ दुर्लक्ष केले होते ..तळ मजल्या वर येताच तीला बाहेर पडताना पाहिले त्याने पण नंतर अचानक समोर एक रिक्षा आल्याने तो त्यात बसून निघून गेला . ती नेहेमीच्या वेळेत बाहेर पडली ,सोबत मैत्रीण होतीच तीने सांगितली मैत्रिणीला काल संध्याकाळ ची गम्मत ...मैत्रीण पण हसायला लागली “का ग इतका आवडला तर प्रोपोज का नाही केले त्याला “असे विचारले मैत्रिणीने ..”तुझ म्हणजे काही पण असते..असे दिसलेल्या प्रत्येक मुलाला प्रोपोज थोडे करतात “ती बोलली .मैत्रीण म्हणाली अग वरती काही इंजीनियर ची ऑफिस आहेत तिथे कुठेतरी असेल कामाला जाउदे .. काय करायचं आहे आपल्याला “ असे म्हणुन तीने विषय टाळला ..आता होस्टेल ला गेल्या वर सामान भरायला हवे .उद्या सकाळी लवकर घरी जायचेय चार दिवस सुट्टी आणि एक दोन दिवस रजा असे मिळुन चांगली भक्कम एक आठवडा निवांत मिळाला होता .मस्त घरी जाऊन आराम करायचा ,आईच्या हाताचे मस्त मस्त खायचे,मैत्रिणी नातेवाईक याना भेटायचे ,आईसोबत मुंबई लाईफ च्या गप्पा करायच्या असे मनात बेत होते तिच्या ..नोकरी सुरु केल्यानंतर दोन महिन्यानंतर प्रथमच सुट्टी मिळाली होती त्यामुळे ती खुप एक्साईट होती . गेला आठवडा भर तो वाट पाहत होता पण एकदाही ती सुंदरी परत भेटली नाही इथे कुठे काम करते ही पण चौकशी करायला वेळ झालाच नाही त्यातच दोन तीन दिवस सुट्टी लागून आली होती पण इतके दिवसात नागपूर ला जाऊन येणे केवळ अशक्य होते शिवाय ऑफिस मध्ये बर्याच लोकांनी सुट्ट्या घेतल्या होत्या मग त्याला काहीच संधी नव्हती ,उलट सुट्टीत साईट वर जावे लागणार होते .एकंदर थोडा बोअर गेला तो आठवडा त्यात त्या एकदाच पाहिलेल्या “सुंदरी “ची पण आठवण येत होती इतकेच बरे होते की वरच्या मजल्या वर एका फर्म मध्ये ती काम करते हे समजल होत त्याला पण अजून कशात काहीच नाही आणि नाव गाव जाणून काय करायचे ..?असे म्हणुन तो शांत होता . सुट्टीचे दिवस कसे भुर्र दिशी उडून जातात न ..तिच्या मनात विचार आला ..आता उद्या निघायला हवे ,पुन्हा सगळ्या सामानाची आवरा आवर ..आईने सोबत दिलेल्या खायच्या वस्तु आणि इतर साहित्य प्याक करणे कुठल्या तरी मैत्रिणीची गाठ पडली नाही म्हणुन तिच्या वाडीत जाऊन येणे या आणि अशा असंख्य गोष्टी करता करता जायची वेळ जवळ आली आईच्या लाख सुचना ...असे करू नको ,अशी राहत जा ,स्वताची काळजी घे ,खाणे पिणे नीट कर ,वेळच्या वेळी झोपत जा ,सारखे नेट वर गुंतून राहु नको ,..संपत नव्हते सांगणे ..आणि बाबांचे त्यावर मिश्कील हसणे ..!बाकी दिवस कसे मस्त गेले !!आता परत मुंबईच्या आयुष्याचे “वेध “लागले ..आणि अचानक तिला त्या लिफ्ट मध्ये भेटलेल्या तरूणा ची आठवण आली कोण असेल आणि काय करीत असेल तो कोण जाणे .. सोमवार उजाडला आणि त्याला अगदी “हायसे वाटले..आज त्या कन्यकेचा पत्ता लागेल कदाचित ..आणि तसेच झाले ,खालच्या मजल्यावर एका कॅन्टीन मध्ये दुपारी त्याला ती दिसलीच एका मैत्रिणी बरोबर चहा घेत होती बहुधा ..सोबत काही खाणेपिणे चालूच होते ..आणि गप्पा पण ..आज तिच्या अंगात पिवळा पंजाबी ड्रेस होता ..आणि फुला फुलांची ओढणी गळ्याला लपेटली होती केस अगदी घट्ट वर बांधून मोकळे सोडले होते केसांचा “रेशमी “लुक लांबून पण जाणवत होता !!हात वारे करीत ती मैत्रिणीला बरेच काही सांगत होती आणि दोघी हसत होत्या ..!!खरेतर तो कोणत्या तरी वेगळ्या कामासाठी बाहेर आला होता ,पण तिला पाहून सहजच कॅन्टीन मध्ये शिरला आणि तिच्या कडे पाहत राहिला वेटर ने विचारले तेव्हा त्याने पण टोस्ट कॉफी ओर्डेर केले आणि तिच्या कडे लक्ष ठेवत राहिला काही वेळाने बहुधा तिच्या पण लक्षात आले की आपल्याला कोणी तरी निरखते आहे सहज म्हणुन कोपर्यात तिची नजर गेली ..त्याला पाहताच तीही थोडी चपापली ..पण हलकेच हसली सुद्धा किंचित ओळखीचे असे हास्य पाहून तो पण खुश झाला काही मिनिटात दोघी लंच ब्रेक आवरून निघून गेल्या जाताना पण तिने त्याच्या कडे पाहून मस्त “लुक” दिला ..तोही मग खाणे आवरून कामा साठी निघून गेला . सोमवारी सकाळी इकडे यायला उशीर होणार होता आईने नाश्ता सोबत दिलेला होता तो तीने गाडी मध्ये खाल्ला होता .मात्र दुपारच्या डब्याची सोय झाली नव्हती म्हणुन आज लंच ब्रेक ला ती मैत्रिणी सोबत खालच्या मजल्या वर कॅन्टीन ला आली होती आवडीच्या मस्त पदार्थांचा आस्वाद घेता घेता दोघी पण सुट्टी कशी घालवली हे एकमेकीत शेअर करीत होत्या ..सोबत चहा होताच ..खुप दिवसांनी भेट झाल्याने दोघी अगदी मनापासून गप्पा करीत होत्या आणि अचानक तिला जाणवले की कोणीतरी त्यांच्या कडे पहातेय ..सहज तिने इकडे तिकडे नजर टाकली ..तर काय कोपर्यात तो “हिरो शिळ घालणारा ...दोघीकडे पाहत होता ..तिला अचानक मंद हसू फुटले ..मैत्रिणीच्या नकळत तिने त्याच्या कडे एक “स्मित “फेकले आणि मग ब्रेक संपवुन दोघी परत निघाल्या ..हॉटेल च्या दरवाज्यातून बाहेर पडताना ..वळून तिने त्याच्याकडे पाहून एक मस्त “लुक “पण फेकला …. दोन तीन दिवस सलग त्याने संध्याकाळी लिफ्ट मध्ये ती दिसती का ते पाहिले पण काहीच नाही ...अरेच्या गेली कुठे बरे ही ...अशी रुखरुख लागली त्याला त्यांनतर मात्र एके दिवशी सात वाजता तो बाहेर पडला आणि खालच्या मजल्या वर उतरला लिफ्ट मधून बाहेर पडून तो इकडे तिकडे कोणती ऑफिसे आहेत पाहत चालु लागला ,आणि अचानक एका ऑफिस मधून त्याने तिला व तिच्या मैत्रिणीला बाहेर पडताना पाहिले .ती लिफ्ट कडे चालु लागताना पाहिल्या वर तोही तडक लिफ्ट कडे निघाला त्या दोघी तो आणि आणखी दोन तीन लोक लिफ्ट मध्ये शिरले आणि लिफ्ट तळ मजल्या कडे चालु लागली प्रथम तिचे त्याच्या कडे अजिबात लक्ष नव्हते त्या दोघी शांत पणे लिफ्ट खाली जायची वाट पाहत होत्या आज तिने निळ्या रंगाचे कपडे घातले होते आणि गळ्यात पांढरा स्कार्फ घातला होता बाकी नेहेमीचेच हातात बांगड्या ,कपाळाला टिकली ,एकदम साधी पण उठावदार ...!अगदी “नील परी “वाटली त्याला ती तिचे लक्ष अचानक त्याच्याकडे गेले ..काही रेस्पोंस यायच्या आताच लिफ्ट खाली पोचली आणि सर्व जण लिफ्ट मधून बाहेर पडले .त्याने पाहिले तीने तिच्या मैत्रिणीचा निरोप घेतला आणि ती उलट दिशेने चालु लागली तोही तिच्या पाठीमागून चालु लागला रस्त्यात गर्दी असल्याने तिच्या लक्षात ते नाही आले पाच मिनिटात ती एका बस स्टोप वर पोचली आणि बस ची वाट पाहत राहिली .काही मिनिटात बस आली आणि इतर काही लोका सोबत तोही बस मध्ये चढला .ती पुढील बाकावर जाऊन बसली ..तो काही अंतर सोडून मागे बसलां तिने कंडक्टर ला पास दाखवला ..बहुधा रोज चे जाणे येणे असावे त्याला कोणते तिकीट काढावे समजेना कारण हा भाग परिचित नव्हता मग त्याने शेवटचे तिकीट मागितले आणि बाहेर पाहत राहिला अचानक तीन चार स्टोप नंतर ती उतरली आणि बसने वळण घेतले .तो अचानक गोंधळून गेला आणि पुढल्या स्टोप ला उतरला ती कुठे गेली कळायला मार्ग नव्हता मग पुन्हा उलट्या बसने तो परतला गेले काही दिवस झाले तिच्या लक्षात आले की तो आपला पाठलाग करीत आहे .तिला एकदम मज्जा वाटली ..!!बहुधा ओळख करून घेणार वाटते आपली तिला पण खुप उत्सुकता वाटली होती तिने ही त्याची थोडी माहिती काढली होती ..त्याची एक सज्जन मुलगा होता आणि एका कंत्राट दाराच्या ऑफिस मध्ये होता इतके समजले नाव गाव इतक्यात काय करायचे ओळख होईल तेव्हा पाहू ...रोज मात्र ती त्याच्याकडे स्मित हास्य टाकत होती .जणु त्यांची जुनी ओळख असावी ..असे तिचा स्टोप येवून ती उतरून जात असे तो बहुधा पुढल्या स्टोप वर उतरत असावा ... आठ दहा दिवस सतत तो तिच्या बरोबर बसने जात होता आणि तिच्या पुढील बस स्टोप वर उतरून परत येत होता ती पण त्याच्या कडे पाहून रोज हसत होती अगदी जुनी ओळख असल्या सारखी ..पण अद्याप तिच्याशी बोलायचा त्याचा धीर होत नव्हता काय करावे त्याला सुचत नव्हते ..एकदा वाटत होते सरळ सरळ तिला हाक मारून तिचे नाव गाव विचारावे कुणा मित्राकडून त्याची माहिती काढावी ...तर त्यालाच ही गोष्ट पसंत नव्हती कशाला कुणाला मध्यस्थ घालायचे ..असे त्याला वाट्त होते आता मात्र त्याने ठरवून टाकले ...बस झाले आता ..उद्या ती उतरते तिथेच उतरायचे आणि जाऊन तिच्याशी बोलायचे कधी ना कधी हे धाडस करायलाच हव होते मग आतां उद्याच मुहूर्त करून टाकू ... रोजची त्याची धावपळ ती पहात होती ..आपली ओळख करून घ्यायची आहे त्याला हेही तिला समजत होते पण स्वताहून त्याच्याशी काही बोलावे अशी तिची हिम्मत होत नव्हती हा ..आता जर तो काही बोलला असता तर रेस्पोंस द्यायची तिची मात्र तयारी होती तिलाही तो आवडायला लागला होता ..एक दोन दिवसात तो नक्की आपल्याशी बोलणार अशी तिला का कुणास ठाऊक पण मनातून खात्री वाटत होती .. तो आज लवकरच बाहेर पडला हो कोणत्याही प्रकारे आज चुकामुक व्हायला नको आजचा दिवस त्याने पक्का केला होता तिच्याशी बोलायला ..कधी देव दर्शन न करणारा तो आज चक्क गणपती बाप्पाच्या पाया पडून आला होता. काहीतरी शुभ नक्कीच घडणार असे त्याला वाटत होते ..ऑफिस मध्ये पण आज त्याचे लक्ष लागेना कधी एकदा संध्याकाळ होते असे झाले होते त्याला आणि अखेर सात वाजले आणि तो बाहेर पडला, लिफ्ट मध्ये शिरला पण ती दिसेना .खाली आल्यावर त्याला समजेना ती गेली की काय ..?तरी पण थोडा वेळ वाट पहायची असे त्याने ठरवले आणि जवळच्या एका दुकानापाशी जाऊन उभा राहिला .आणि खरेच दोन च मिनिटात ती खाली आली नेहेमी प्रमाणे मैत्रिणी चा निरोप घेवून बस कडे चालु लागली तोही निघाला तिच्या मागे बस मध्ये तिच्या मागच्या सीट वर त्याला जागा मिळाली होती आज तिने पांढरा पंजाबी ड्रेस घातला होता आणि एक रंगीत ओढणी गळया भोवती होती केस बांधले होते पण आता ते थोडे विस्कटले असल्याने काही चुकार बटा वार्याने तिच्या गालावर झेपावत होत्या ..त्याला मोह झाला हळूच त्या बाजूला कराव्या ..मग तो अचानक भानावर आला ..कारण बस थांबली आणि ती उठून उतरू लागली तोही लगेच उठून तिच्या मागे उतरला .आणि तिच्या मागून चालु लागला तिला बहुधा हे जाणवले होते कारण तिने मग एकदा मागे वळून हलके हास्य फेकले होते एक दोन मिनिटे चालल्या वर ती एका वळणा वर वळली आणि तिने आपला दुपट्टा काढून एका एका खांद्यावर ओढला आणि एका क्षणात तिच्या गळ्यात असलेले “मंगळसूत्र “त्याला दिसले एक क्षण तो चमकला ..आणि थबकला सुद्धा ...!अरेच्या म्हणजे हिचे लग्न झालेय ..आणि आपण एका विवाहित स्त्रीच्या मागे फिरतो आहे ?काय हा आपला उतावळा स्वभाव ..निदान आधी चौकशी तरी करायला हवी होती खुप मोठी चूक झाली आपल्याकडून आणि तिला काय वाटेल आपल्या विषयी ..?तो खूपच शरमिंदा झाला आणि तडक मागे फिरला आणि झपझप चालु लागला ...तिच्यापासून दूर दूर ..!! ती संध्याकाळी ऑफिस मधून बाहेर पडली तेव्हा तिला वाटल आपल्याला आज तो हिरो नाही दिसणार ..कारण तिला ऑफिस मधून बाहेर पडायला थोडा उशीरच झाला होता .मैत्रिणीचा निरोप घेऊन ती बस स्टोप च्या दिशेने वळली पण तिच्या नजरेने ओळखले की कोपर्यातल्या दुकानात तो उभा आहे आणि नंतर हे ही जाणवले की तो तिच्या मागे येतो आहे ..आज त्याने घातलेला निळा शर्ट पण तिने “नोटीस ‘ केला होता बस मध्ये सुद्धा तो आसपास असावा असे जाणवत होता ती मनातून अगदी “मोहरून “गेली होती आज नुसती ओळख नाही तर खुप गप्पा पण करायच्या त्याच्याशी असे तिने पक्के ठरवले होते अखेर तो क्षण जवळ जवळ येत होता ज्याची दोघे पण वाट पाहत होते ..आनंदाने कोपर्यावर वळताच तिने गळ्यातली ओढणी काढून एका बाजूला घेतली आणि ..पर्स दुसर्या खांद्यावर अडकवली ..होस्टेल च्या थोडे अलीकडे ती थांबली आणि तिने इकडे तिकडे पाहिले पण तो कुठेच दिसेना ..कुठे अडकला बरे हा ..?आता तर मागे मागे होता ..पाच मिनिटे झाली दहां झाली चांगली अर्धा तास ती थांबली पण तो आलाच नाही ..निराश होवून ती होस्टेल च्या दिशेने निघाली रूम वर जाताच कपडे बदलण्या पूर्वी तिने गळ्यातले “मंगळसूत्र “काढले होय ..हे खोटे मंगळसूत्र फक्त आईच्या सांगण्या नुसार तिने गळ्यात घातले होते खोटे का असेना मंगळसूत्र गळ्यात असले की बाई “सुरक्षित असते असा तिचा आईचा विश्वास होता मोठ्या शहरात मुलीला पाठवताना हि काळजी घ्यावी असे तिच्या आईला वाटत होते आणि मग परत तिच्या मनात विचार आला तो कुठे गेला असेल बरे ?पण तिला आता कधीच समजणार नव्हते की तो तिच्या पासून दूर गेलाय आणि आता तो तिला कधीच भेटणार नव्हता या “मंगळसुत्रा “मुळे तीचां घात झाला होता ..!

***

3 - आजूबाजूला

अरुण वि. देशपांडे

भरवस्तीत असलेला तो वाडा .आता जरी जीर्ण अवस्थेत दिसत असला तरी त्याच्या गत-वैभवाच्या खाणाखुणा त्याच्या आजूबाजूला दिसत असत, बुरूजा सारख्या त्याच्या भिंती ढासळत होत्या पण जुन्या जमान्यातले बांधकाम अजून तसे पक्के होते,जणू वाकेन पण मोडणार नाही .अशा ताठयात हा वाडा आहे..असे समोरून जाणारा येणारा म्हणत असे.

अनेक पिढ्यांना घडवणारा हा वाडा ..गेल्या शतकाचा साक्षीदार म्हणून आजूबाजूला परिचित होता ..

आजच्या पिढीचे प्रतिनिधी म्हणून तात्यासाहेब परिवारासहित या वाड्यात वास्तव्यास होते .. त्यांचेच वय आता ऐंशीच्या आसपास होते ...वयपरत्वे होणारे आजार त्यांच्या मागे लागून काही वर्षे झाली होती .. त्यामुळे सगळे आर्थिक - व्यवहार, संपत्तीची देखभाल आणि पारिवारिक जबाबदारी अशा कार्यातून त्यांनी स्वतःला मुक्त करीत नव्या पिढीच्या हाती सर्व कारभार सोपवला होता .

तात्या त्यांच्या स्वभावामुळे, वृत्तीमुळे आजूबाजूच्या परिसरात सर्वांच्या आदरास प्राप्त झाले होते ..त्यांनी त्यांच्या उमेदीच्या काळात ..आपल्या वाड-वडिलांच्या कीर्तीमध्ये भरच घातली, सचोटी, आणि माणसाची पारख, माणूस जोडण्याची कला ..या गुणांच्या बळावर तात्यासाहेबांनी माणसांचा गोतावळा आपल्या भोवती जमवला होता ..आजूबाजूच्या छोट्या मोठ्या गावात लोकोपयोगी कार्य सेवाभावी भावनेतून करण्याची सवय लोकांना लावली,

ज्याची जीभ गोड ..त्याला सारे जग गोड " याची प्रचीती तात्यासाहेबांच्या सहवासात आलेल्या माणसाला येत असे.

पैशाने सगळ्या गोष्टी खरेदी करता येत असतात, पण आत्मसन्मान असणारी माणसे पैशाने विकत घेता येत नसतात " तात्यासाहेब यातील मर्म ओळखून होते ..त्यामुळे आपल्या मोठेपणाचा, श्रीमंतीचा बडेजाव त्यांनी आयुष्यभर कधीच मिरवला नाही ..आणि आपल्या परिवारातील कुणी श्रीमंतीच्या तोऱ्यात वागणार नाही, त्याच्या वागण्यामुळे कुणी दुखावणार नाही, दुरावणार नाही याची काळजी तात्यासाहेब नेहमी घेत..

सुखात सगळेच सोबत असतात ..पण अडचणीच्या वेळी आधार देणारा खरा माणूस असतो ", असा माणूस आपण असावे " तात्या त्यांच्या मनातले हे विचार आपल्या सहवासातील प्रत्येकाला सांगत असत, गरजू माणसासाठी साठी तात्या म्हणजे आधार-वड झाले होते .

सामाजिक जीवनात -सार्वजनिक जीवनात जनता नेहमीच आदर्श व्यक्तीच्या शोधात असते, तात्यासाहेब या अपेक्षापूर्तीच्या कसोटीवर पूर्ण उतरत होते . नेक- नियत, निर्मल आणि स्वच्छ चारित्र्य ..असे गुण तरुण तात्यासाहेबांच्या काळात आजच्या इतके दुर्मिळ नव्हते .. त्या काळात सार्वजनिक सद्वर्तनाचे जे संस्कार त्यांच्या मनावर झाले ते त्यांच्या आचरणात कायम स्वरुपात लोकांना दिसत गेले

जुनी जाणती माणसे सांगत की ..ज्या घरी तोरण बांधले आहे..लगन-कार्य आहे.त्या ठिकाणी विना निमंत्रण जावे, मानपानाची अपेक्षा न ठेवता ..केवळ त्याला आधार देणारा,मदतीसाठी तत्पर असलेला एक माणूस आपला सहभाग असावा, अशावेळी खूप धीर देणारा असतो ..

आजच्या बदलत्या वातावरणात ..असे कुठेच दिसत नाही ..आपल्या आजूबाजूला एखादे लग्न-कार्य आहे, मोठा समारंभ आहे ..त्यात कुणाला सह्बागी करून न घेता "घरच्या घरी कार्य उरकून घेतले जाते ",

तात्यासाहेब असे काही घडतांना पाहून खूप नाराज होत ..माणसे इतकी बदलत जात आहेत ..का अशी वागत आहेत ही माणसे .असा प्रश्न त्यांना पडत होता.

दुसरा प्रसंग ..मरण -दारी "जाण्याचा ..अशा दुक्ख प्रसंगी सांत्वन करणे,धीर देणे, एकटेपणाची, पोरकेपणाची जाणीव न होऊ देणे ..या साठी धीर देणारी माणसे लागतात .. आज आजूबाजूला ..कुणी गेले " हे कळाले तर ..त्याला खांदा देणारे चार माणसे, नातेवाईक सुद्धा हजर नसतात ..शेवटी नगर-पालिकेच्या वाहनातून गेलेल्याव्यक्तीचा अंतिम प्रवास संपतो ..

सुखात नाही तर नाही निदान दुखाच्या प्रसंगी तरी माणसाने माणसाच्या मदतीला धावून यायचे असते " ही भावना आजूबाजूच्या माणसात शिल्लक नाहीये ..! याला काय म्हणावे ? जागच्या जागी पडून रहात तात्यासाहेब अधिकच व्यथित होत.

अलीकडे त्यांच्या मनाला निराशेच्या भावने ग्रासून टाकण्यास सुरुवात केली होती ..त्याला कारण होते ..त्यांच्या घरातील माणसांच्या वागण्यात -बोलण्यात खूप फरक पडला आहे याची त्यांना होऊ लागलेली जाणीव,

तात्यासाहेबांना वाड-वडिलांच्या कडून वारश्याने मिळालेले वैभव ..त्यांना जरी आयते मिळाले होते..त्यांनी काही काम न करता बसून खाल्ले असते तरी पुरेल इतके ते वैभव मोठे होते .. तात्यासाहेब या श्रीमंतीने कधी वाहवले नाहीत, लबाड आणि संधी-साधू लोकांना त्यांनी कायम दूर ठेवले ..आपल्या पैशाचा विनियोग जास्तीत जास्त लोक-कल्याणासाठी होईल या ध्येयाने सेवाभावी वृत्ती कायम ठेवली .. यामुळे तात्यासाहेब आजूबाजूला भलेही आदरणीय व्यक्ती,आदर्श व्यक्ती म्हणून जनतेत प्रिय झाले .. होते पण त्यांच्या या वागण्यामुळे

..घरातील काही माणसांसाठी, तसेच परिवारातील लबाड आणि लोभी नातेवाईकाच्या कायम रोषाचे कारण ठरत गेले, तात्यासाहेब आणि त्यांच्या शब्दांचा मान त्यांच्या नंतरच्या पिढीने थोडाफार तरी राखला, पण आताच्या पिढीने ..तात्यांच्या वागण्याला नावं ठेवण्यास सुरुवात केली,त्यांना विरोध करण्यास सुरुवात केली आजारी आणि दुर्बल झालेल्या तात्यासाहेबांचा पाणउतारा कसा करता येईल ..याचा विचार करण्यात या नव्या पिढीचा वेळ जाऊ लागला, आपल्या आजूबाजूला ..खूप वेगळे असे काही शिजते आहे ", जे आपल्या विरुध्द आहे ..हे तात्यासाहेब जाणून होते,

जणू ही सगळी असंतुष्ट मंडळी एकत्र येऊन ..इतक्या वर्षांचा बदला घेत होती ..ज्यांना तात्यासाहेबांनी कायम दूर ठेवले होते.

आपल्या तात्यांना वाड्यातील माणसे वाईट पद्धतीने वागवत आहेत ..याची कुणकुण आजूबाजूच्या लोकांना लागली होती, पण कुणी बोलनास धजत नव्हते ..कारण वाड्यात नव्याने दाखल झालेल्या माणसांची उपद्रव शक्ती फार मोठी .होती .त्यामुळे तात्यांना चांगले दिवस नाहीत " याबद्दल हळहळ व्यक्त करण्याशिवाय सामन्य लोकांच्या हातात काही नव्हते. मोठ्या घरातील माणसांच्या कारभारात लक्ष देणे आपल्या शक्तीच्या बाहेरचे आहे, याची जाणीव लोकांना होऊ लागली .

तात्यांनी केलेल्या कार्याची जाणीव लोकांना होती ..त्या भावनेतून लोकांच्या मनात तात्या विषयी आपलेपणाची भावना आहे " हे वाड्यातील लोकांना कळून चुकले होते ..त्यामुळे लोकांच्या नजरेत येईल असे काही करणे,तसे वागणे म्हणजे जन-क्षोभ निमंत्रण देण्या सारखे झाले असते ..त्यामुळे तात्यांना त्रास दिला जातो याबद्दल आजूबाजूला काही कळणार नाही याची काळजी वाड्यातील मंडळी गेऊ लागली.

आजारी पडलेल्या तात्यांना बरे होऊ न देता ..तसेच खितपत पडू द्याचे ..असे ठरवले असावे ..अशी वागणूक तात्यांना मिळते आहे.. ही बातमी आजूबाजूला कळत गेली

गावातील जाणती माणसे .अचानकपणे .एक दिवस वाड्यावर गेली ..घरातील लोकांना सांगितले ..आम्हाला आत्ताच्या आत्ता तात्यांना पहायचे आहे, बोलायचे आहे .आम्हाला त्यांची खोली दाखवा .. जास्त हुशारी करण्याचा प्रयत्न करायचा नाही ..असा दम दिल्यावर .. एकजण आलेल्या सर्वांना तात्या असलेल्या खोलीत घेऊन गेला ..

त्या काळोख्या खोलीत शिक्षा भोगीत असलेल्या कैद्य सारखे तात्या पडून होते .. बाहेरच्या जगातील शेकडो लोकांचे आधार असलेले तात्या इथे अंधारात निराधार होऊन जगत आहेत असे दिसून आले.

वाड्यातील लोकांच्या कडून ..तात्यांना मिळत असलेली वागणूक पाहून आलेले लोक संतप्त झाले, तात्यांना सोडून बाहेरगावी गेलेल्या त्यांच्या मुलांना लगेच कळवले ..आणि उद्याच्या उद्या तात्यांना इथून घेऊन जा असे सांगितले.

आपण ज्या लोकांसाठी कार्य केले त्यातील काहीजण आज आपल्यासाठी आले ..हे पाहून तात्यांना खूप बरे वाटले,

माणसे निष्टुर झालीत, उलट्या काळजाची झालीत हे आपण गेल्या काही दिवसापासून पहात आहोत,

पण, आज आपल्या साठी आलेल्या माणसांच्या वागणुकीतून जाणवले आहे की ..

किती ही वाईट घडो ..आजूबाजूला माणूस आणि माणुसकी अजून शिल्लक आहे.

***

4 - कॉफी हाऊस- मन मोकळ करण्याची जागा...

अनुजा कुलकर्णी.

"हे आभा, तू परत सांगतेस, आपण कधी आणि कुठे भेटतोय?"

"काय नेहा... हाय नाही हेलो नाही!"

" सॉरी विसरले....हाय! आता सांग प्लीज!"

"गम्मत करतीये मी.. सॉरी बिरी नको! सांगते.... रविवारी आपल्या नेहमीच्या कॉफी हाऊस मध्ये..१० वाजता.. तिसऱ्यांदा फोन आलाय तुझा सेम प्रश्न विचारायला! कुठे लक्ष आहे तुझ?? मी तुला ओब्सर्व करतीये.. तू प्रत्येकवेळी सेम प्रश्न विचारून नुसत हु हु करती आहेस! तू माझ बोलण ऐकती आहेस कि नुसत हु हु करतीयेस?"

"मी नुसत हु हु करतीये? सॉरी.. काहीतरी चालू आहे डोक्यात.. सो तुझ बोलण ऐकती तर आहे पण ते कळत न्हवत!! आता नीट ऐकल.... रविवारी नेहमीच्या कॉफी हाऊस मध्ये १० वाजता! ओके डन! मी येते वेळेत.. तू काळजी घे.."

"ओके... भेटूच! आणि हो.. मी काळजी घेते.. तू पण घे आणि उगाच काहीतरी विचार करत बसू नकोस!! ठेवते मी पण फोन!" आभानी फोन ठेवला आणि नेहा सुद्धा तिचा अभ्यास करायला लागली.. पण सारखे सारखे विचार तिच्या मनात येतच होते.. नेहा डिस्टर्ब होत होती! तिच अभ्यासात अजिबात लक्ष लागत न्हवत. इंजिनीरिंगच शेवटच वर्ष होत आणि तिला अस डिस्टर्ब होऊन चालणार न्हवत. पण तिच चित्त अजिबात थाऱ्यावर न्हवत. तिला कामासाठी बाहेर जायचं होत त्यामुळे नेहा घराबाहेर पडली. तिने लगबगीने तिने गाडी चालू केली.. पण मनातले विचार मात्र तिची पाठ सोडत न्हवते! विचारांना दूर करण्यासाठी तिने कानाला हेडफोन लावले आणि गाणी ऐकायला सुरु केल..

तिच्या मनात विचारांचं काहूर आणि कानाला हेडफोन लावले असल्यामुळे तिला गाड्यांचे हॉर्न सुद्धा ऐकू येत न्हवते. आणि जे व्हायला नको तेच झाल.. तिची एका गाडीशी टक्कर झाली. आणि तिची गाडी पडली. गाडी चालवणारा एक मुलगा होता. तो व्यवस्थित गाडी चालवत होता आणि चूक होती ती नेहाची. नेहा भानावर आली आणि तिच्या लक्षात आल कि तिला थोड खरचटलं आहे. नेहाला लागेल्या जखमेची जाणीव झाली आणि ती भानावर आली. नेहा उठली पण तिची गाडी मात्र रस्त्यावरच पडली होती. तिला झालेल्या प्रकारची जाणीव झाली आणि तिचा राग अनावर झाला. तिला हे सुद्धा लक्षात नाही आल कि चूक तिचीच होती तरी तिने एक नजर त्या मुलाकडे रागाने पाहिलं. तो मुलगा सज्जन होता त्यामुळे तिच्याशी न भांडता नेहाला मदत करण्यासाठी पुढे सरसावला. पण त्याची मदत नाकारत नेहा गाडी उचलायला लागली पण तिला काही केल्या तिची गाडी उचलता येईना. तो मुलगा लांबूनच नेहाकडे पाहत होता आणि न राहवून त्यानी परत नेहाला म्हणाला,

"लागल नाही न? आणि मी मदत करतो तुम्हाला.."

"काही गरज नाही त्याची. मी स्वतःला सांभाळू शकते. आधी चुका करायच्या आणि चूक सुधारायच्या बहाण्यानी जवळीक साधायचा प्रयत्न करायचा. " त्या मुलाशी बोलण टाळत नेहा उत्तरली. खर तर चूक त्या मुलाची न्हवतीच तरी त्यानी नेहाच बोलण ऐकून घेतलं आणि तिच्याशी भांडायचं टाळल.

"ठीके.. अॅज यु विश! पण एक सांगतो, चूक माझी न्हवती.. उगाच माझ्यावर चिडू नका. मी शक्यतो मुलींशी भांडण टाळतो. म्हणून शांत आहे. दुसर कोणी असत तर सोडलं नसत. आणि तुम्हाला मदत नको असेल तर मग मी जातो.." इतक बोलून तो मुलगा तिथून जायला निघाला.. त्यावेळी नेहाला काय वाटल कोण जाणे. तिने त्या मुलाला हाक मारली,

"थांबा २ मिनिट.. मला मदत कराच... नाही उचलता येत मला गाडी. आणि चूक माझी होती का? सॉरी!"

नेहाच बोलण ऐकून तो मुलगा गालातल्या गालात हसला आणि त्यानी पुढे येऊन गाडी उचलून दिली.. आणि मग मात्र तो मुलगा तिथे न थांबता तिथून निघून गेला.. नेहाला थँक्यू म्हणायला सुद्धा वेळ मिळाला नाही. मग नेहा सुद्धा तिथून निघाली. आणि सरळ घर गाठल. घरी गेल्यावर नेहा कोणाशीच काहीच न बोलता सरळ तिच्या खोलीत गेली. त्या दिवशी सुद्धा नेहा खूप अस्वस्थ होती. तिची अस्वस्थता कमी होण्याच नावच घेत न्हवती. नेहा सतत कोणत्यातरी गोष्टीत हरवलेली रहायची.

***

ठरल्याप्रमाणे नेहा आभाला भेटायला कॉफी हाऊस मध्ये पोहचली. नेहा कॉफी हाऊसला पोचली तितक्यात तिला आभाचा फोन आला आणि आभानी तिला जमत नाहीये हे सांगितलं. नेहाचा मूड ऑफ झाला पण कॉफी पिऊन जाऊ असा विचार करत नेहा ऑर्डर द्यायला गेली. तिनी तेव्हाच त्या मुलाला पाहिलं ज्याच्या गाडीशी तिच्या गाडीशी टक्कर झाली होती. त्या मुलानी सुद्धा नेहाला पाहिलं. आणि तो सरळ तिच्याशी बोलायला आला..

"तुम्ही त्याच ना ज्यांची गाडी माझ्या गाडीला धडकली होती? त्या दिवशी मला जास्ती वेळ न्हवता आणि कामावर जायचं होत म्हणून काही बोललो नाही.." भुवया उंचावत, कपाळावर आठ्या आणत तो मुलगा बोलला..

"हो...मी सॉरी म्हणले होते... आणि मदत केली सो थॅंक्यू सुद्धा म्हणाले पण तुम्ही थांबला नाहीत.." नेहाच बोलण ऐकून तो मुलगा हसायला लागला..

"तू वेडी आहेस नेहा.." त्या मुलाच बोलण ऐकून नेहा आवाक झाली.. त्याला तिच नाव कस माहिती आहे ह्याचा विचार ती करायला लागली. "तुम्हाला माझ नाव कस माहिती?" जरा घाबरून नेहा बोलली...

"तू मला कस विसरलीस नेहा? आपण एकाच शाळेत, एकाच वर्गात होतो. शाळेची ६ वर्ष तर एकत्र होतो. मी तुला परवाच ओळ्खल होत पण मला वाटलेलं तू मला पाहून माझ्याशी बोलशील. पण तू काहीतरी वेगळ्याच विचारात होतात. तू मला ओळखल नाहीस. आणि तेव्हा माझी खरच गडबड होती." तो मुलगा बोलत होता. नेहा त्या मुलाच बोलण ऐकत होती. तिला एकदम काहीतरी आठवलं आणि ती बोलायला लागली,

"गौतम ना? ए,तू मला अहो का संबोधलंस?" नेहा थोडी हसली आणि बोलली, "कशी काय विसरले तुला? मी खरच काहीतरी वेगळ्याच विचारात होते... सो नाईस टू सी यु.."

"येस.. आणि आदर दिला ना.. हाहा! वूड यु माइंड इफ आय पे फॉर युअर कॉफी?"

"नको..आपण आपल आपल बिल देऊ.." थंडपणे नेहा उत्तरली

"नो प्रॉब्लेम. पण थंड कि गरम कॉफी हे तर सांगू शकतेस. मी बिल देत नाही पण फक्त ऑर्डर तर करू शकतो ना?"

"गुड १.. हाहा! मला हॉट कॉफी." नेहा थोड हसून बोलली.. "वा.. ऑर्डर करून दिलीस.." हसत गौतम नी कॉफी ची ऑर्डर दिली आणि दोघ टेबल वर जाऊन बसले. "सांग मला..कशी आहेस? आणि कोणत्या विचारात होतीस परवा?" गौतमच बोलण ऐकून नेहा अस्वस्थ झाली आणि गौतमनी ते हेरल. "नथिंग सिरिअस ना नेहा?" गौतमला काय उत्तर देऊ हे न कळल्यामुळे नेहा शांत बसून राहिली..

"तू सांगू शकतेस मला नेहा.. आपण अनोळखी नाही आहोत आय थिंक..तू मला नीट ओळखतेस.."

"हो हो.. पण बरेच दिवसांनी भेटतोय.. लगेच खूप ओपनली नाही बोलू शकत. सो मे बी समटाईम्स लेटर.."

"ओके.. आय वोन्ट फोर्स यु.. आत्ता विल एन्जॉय द कॉफी.."

दोघांनी एकमेकांबरोबर कॉफी एन्जॉय केली. इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या आणि परत लवकरच भेटू अस म्हणून नेहा घरी आली. नेहा विचारात पडली.. तिला का कोण जाणे पण गौतमशी सगळ शेअर कारावस वाटल. गौतमला कधी सांगायचं ह्या विचारात नेहा बराच वेळ बसली.

***

नेहा आणि गौतमचा संवाद वाढला. दोघ एकमेकांच्या संपर्कात राहायला लागले. एक दिवशी गौतमनी नेहाला भेटायला बोलावलं. दोघ परत कॉफी हाऊस मध्ये भेटले.. ह्यावेळी गौतम नेहाला काय गोष्ट खातीये हे जाणून घेणार होताच. गौतम लगेच मुद्द्यावर आला,

"आता सांगशील काय झालाय तुला? तू शाळेत असतांना कशी होतीस नेहा.. आणि आता एकदमच बदललीस.. तू मस्त उत्साही असायचीस.. आणि आता हरवलेली असतेस,"

"हो हो.. मी बदलले. आयुष्यात खूप काय काय अनपेक्षितपणे झाल आणि..."

"काय आणि? आय होप आज सांगशील काय झालाय तुला. तुला कोणत्या गोष्टीचा त्रास होतोय इतका? आपण बरेच दिवस फोन वर बोलतो आहोत आणि तुझ्या मानसिक स्थितीत काहीही बदल झालाय अस मला वाटत नाही..तू सतत कोणत्या बर्डन खाली जगती आहेस हे मला जाणवतंय."

"मी कोणालाच सांगितलं नाहीये काही. पण तुला सांगावस वाटतंय.. बरेच दिवस विचार करत होते सांगू का नको. नाऊ आय थिंक विल टेल यु.." हे बोलतांनाच दोघांची कॉफी आली. आणि कॉफीचा एक घोट घेऊन नेहा परत बोलायला लागली, "बरेच दिवस मला माझ्या ओळखीचा एक मुलगा सारखा लग्न कर अस मागे लागलाय. आय नो हिम पण लग्न बिग्न नाही... अजून शिक्षण पूर्ण होतंय.. माझी काही स्वप्न आहेत आणि आत्ता लग्नाबद्दल काय कटकट?. मग मी खूप अस्वस्थ झाले. मी त्याला हे सुद्धा सांगितलं कि मला नाही करायचय लग्न पण तरी तो खूप त्रास देत राहिला... मध्ये तर त्यानी घरी येऊन मला मनवायचा प्रयत्न केला. घरी कळल नाही कोणाला पण जर घरी कळल असत तर... बाबा खूप चिडले असते आणि ग्रुप मध्ये सांगावस वाटल नाही. आता कोणीच नाही वाटत ज्याच्याशी मनमोकळ बोलू शकेन. आणि मी घाबरले..कुठूनतरी बाबांना कळल असत हे तर.. फेसबुक, वोट्सअप अगदी फोन सुद्धा बंद केला असता बाबांनी.. आणि आई बाबांपासून काही लपवून ठेवत नाही. सो आईला पण सांगू शकत न्हवते. तो मुलगा सतत तेच बोलायचा... उबग आला मला..सगळच अनपेक्षित होत. मी फार सुंदर आहे किंवा मी सतत माझे फोटो कुठे न कुठे ठेवते, मला सतत कोणाशी बोलायला लागत अश्यातला सुद्धा भाग न्हवता. मी तशी अलिप्तच वागते.तरी कोणी लग्नासाठी इतक हात धुवून मागे लागलाय हि गोष्ट मला नाही आवडली. माझ्या मनाविरुद्ध गोष्टी झाल्या कि मी अपसेट होते. "

नेहा जरावेळ शांत बसून राहिली.. गौतम सुद्धा शांत बसला आणि बोलायला लागला,

"ऐक नेहा.. तुला माहिती आहे कोणाशी लग्न करायचं आणि कोणाशी नाही. आणि कधी करायच आहे. तू कोणाला हुरळून जाऊन लगेच लग्नाला हो सुद्धा म्हणू नकोस. दिखाव्याला तर अजिबात भुलू नकोस! आभासी जग कधीही वाईटच.. कोणत्याही मुलाला नीट पारखून घेतल्याशिवाय लग्नाला होणार देऊ नकोस. तुला कोणीतरी लग्न कर म्हणून मागे लागलाय ह्या गोष्टीनी तू किती दिवस अस्वस्थ राहणार? तु तुझा नकार सांगितला आहेस. झाल तर मग.."

"आय नो गौतम.. पण एकदा अस झाल तर ठीके.. असाच २-३ वेळा झाल.. जे मला नको होत तेच सारख घडत होत. साहजिकच माझ्या मनावरचा ताण वाढला..माझ काही आयुष्य आहे. आणि कोणीही उठत आणि मनाला येईल ते बोलतं माझ्याशी? एकदा ठीके.. पण सारख तेच आणि तेही वेगवेगळ्या लोकांकडून?? कोण किती सिरिअस होत आय नो.. आणि इतक्या लगेच इतके महत्वाचे निर्णय होतात का? तरी तेच तेच..मग वैतागले मी.. नाही सांगून सुद्धा लोकांना कळत नाही का?" नेहाचा आवाज एकदम वाढला..

"नेहा.. एक सांगू?"

"बोल.." नेहा म्हणाली..

"तू खर तर एन्जॉय केली पाहिजेस हि गोष्ट कि तूझ्याशी लग्न करायला किती मुल उत्सुक आहेत. आणि तू काहीही दिखावा करत नाहीस तरी.. महत्वाच म्हणजे, कोणी कितीही मागे लागल तरी शेवटचा निर्णय तुझाच असेल. मग बर्डन कसल? तू नाही म्हणलास कि झाल...तुला त्या मुलांपैकी कुणाशीच लग्न करायचं नाहीये हा निर्णय सर्वस्वी तुझा आहे आणि तुला कोणी बळजुबरी करू शकत नाही. तू सांग, तू घाबरून कधीपासून जायला लागलीस?" हसत गौतम बोलला, "मी तुला बरेच दिवसांनी पाहिलं तेव्हा मला धक्का बसला. तू वेगळीच वागलीस! तू मला सुद्धा ओळ्खल नाहीस. तू सांग, तुला कोणी बळजुबरी तर केली नाही ना? कोणी धमकी दिली लग्न केल नाहीस तर बघ इत्यादी?"

"बरोबरे.. बर्डन कशाला? पण अनपेक्षितपणे अश्या गोष्टी झाल्या कि साहजिकच मनावर दडपण येतच कि गौतम.. आणि नाही नाही.. कोणी बळजुबरी केली नाही. धमकी देण्या इतकी हिम्मत नाही कोणाची.. पण सारखे मागे लागले.. मी नकार देऊनही.. चिडचिड झाली माझी खूप..मग मी खूप अपसेट झाले. " नेहाच्या बोलत होती आणि तिच्या मनावरचा ताण हलका होत होता. ते तिच्या चेहऱ्यावर दिसत होत.

"तू खरच वेडी आहेस नेहा.. अश्या गोष्टी नॉर्मल असतात. मुलं अशीच असतात. टाईमपास करतात. खडा टाकून पाहतात. मागे लागून पाहतात. मुलगी हो म्हणाली तर म्हणाली, झाल झाल नाही नाही.. त्यानी तू इतकी डिस्टर्ब झालीस? लेट गो करायला शिक गोष्टी..मग आयुष्यात सुखी होशील.. आणि घरी सांगत जा गोष्टी. कारण कोण कस वागेल ह्याचा अंदाज नसतो. आणि तू तशी खंबीर आहेस पण तरी.."

"हो कि गौतम.. असा विचार मी केलाच नाही.. शेवटी आयुष्य माझ आहे आणि मला ते माझ्या पद्धतीनी जगायचं आहे. मी कोणाला का घाबरू मग? आणि कशाला? फक्त, बाबांन कळल तर काय ह्या गोष्टीच सुद्धा टेन्शन आल होत. बाबांना असल्या गोष्टी अजिबात आवडत नाहीत. त्यांना वाटल असत माझ्याच डोक्यात लग्नाच आहे आणि मग ते चिडले असते. त्यांना मला स्वतःच्या पायावर उभ राहिलेलं पहायचं आहे. म्हणजे मी माझ शिक्षण नीट पूर्ण कराव, जॉब करावा हि त्यांची अपेक्षा आहे. तेही काही चूक न्हवत. माझेही विचार तसेच आहेत. आणि बरोबर, सगळ सांगायला पाहिजे घरी. आता नाही लपवणार काही. ए,आता फिलिंग गुड.. थँक्स गौतम.. थँक्स अलॉट.. आपण म्हणतो न, जे होत ते चांगल्यासाठीच होत. आपण भेटलो अनपेक्षितपणेच.. आणि आज तू माझे विचार बदलायला मदत केलीस. सगळ आपोआप होत गेल.. पुढच्या वेळी भेटू तेव्हा कॉफी इज ऑन मी.. खरच, कॉफी हाऊस इज द बेस्ट प्लेस टू टॉक.."

"बर झालो आपण भेटलो.. आता एकदा तरी फुकटची कॉफी प्यायचा आनंद मिळेल मला.. नाहीतर आम्हाला कोण विचारतं कॉफीसाठी.. कधी गेलो मुलीबरोबर तर मलाच पैसे द्यावे लागतात.. तू सांग, नाऊ फिलिंग गुड? उगाच नसत्या गोष्टींच बर्डन घेत नको जाऊस.. आणि गोष्टी शेअर करायला शिक.. गोष्टी शेअर केल्या कि मनावरचा ताण कमी होतो."

"हो.. माझी चूक मी सगळ मनात ठेवलं..आता आपण भेटलोय ना.. आता घरी आणि तुझ्याशी सगळ शेअर करत जाईन.. चालेल?"

"कधीही नेहा.. फक्त जशी होतीस तशीच राहा.. कोणत्याही गोष्टीनी स्वतःला बदलायचं नाही."

"येस गौतम.. नक्की! बाकी तू बोल! आपण इतके वर्षांनी भेटलो पण तरी आय फेल्ट लाईक शेअरिंग विथ यु..आज पण यु हॅव दॅट स्पार्क.."

"मी मस्त.. आपण भेटणार होतो सो भेटलो..मला आनंद आहे कि माझी मदत झाली.. आणि महत्वाच, शाळेत तू मला नेहमीच आवडयचीस... मी कधी सांगितलं नाही पण हे खर आहे! लग्न करशील माझ्याशी?" गौतम मिश्किलपणे बोलला. नेहानी गौतम च बोलण ऐकल आणि ती विचारात पडली पण खंबीरपणे म्हणाली, "बर बर.. करेन ह विचार..." आणि दोघ हसायला लागले..

***

5 - गुरू आपैसी भेटती...!!

Dipti Methe

1

"अरे..! हा टी व्ही कोणी असा मधेच ठेवला..? जरा धक्का लागला तर लाखाचं नुकसान. कळत कसं नाही यांना.." मी टी व्हि सरकवण्याचा प्रयत्न करत बोलत होते. एवढ्यात चिरंजीवांनी मला बाजूला करीत मदतीचा हात दिला."आई..! तू आधी शांत हो. उगाच ब्लडप्रेशर वाढवून घेशील स्वतःच. मी करतो काय ते. तू जा बाल्कनीत बस."त्याच्या तसं बोलण्याचा त्यावेळी मला फार राग आला. "आणि इथे कोण लक्ष ठेवणार..? तुझा बाबा टेम्पो जवळ उभा आणि तू तिथे कॉरिडोर कडे. हे लोक कसेही समान ठेऊन एकदाचे गेले की मग कोण ते हलवत बसणार..?"मी ऐकणार नाहीसं पहाता तो गडी लोकांना एकेक सामान कुठे कसं लावायचं ते सांगत निघून गेला. फ्लॅट तसा फार हवेशीर होता. पहाताच मला आणि यांना आवडलेला. मोकळी जागा, भरपूर उजेड आणि बाल्कनीत सूर्य उगवायचा, कित्ती छान..! अगदी एखाद्या पेंटिंग सारखं. नवीन घरात रहायला येणं कुणाला नाही आवडणार? फक्त हे शिफ्टिंग म्हटलं की नाकी नऊ येतात. नव्या जागेत बस्तान बसे पर्यंत महिना दोन महिने तरी असेच जातील बहुदा.

कामं काहिकेल्या आटपत नव्हती. रोज काहीना काही करायचं राहून जायचं. आज इलेक्ट्रिशियन मिळाला नाही तर उद्या प्लम्बर अव्हेलेबल नाही. एकटीनेच सारं पहाताना दमछाक होत होती. नवऱ्याला सुट्टी मिळत नव्हती आणि लेकाचे दहावीचे वर्षं. तरी हळूहळू गाडी मार्गाला लागत होती.

त्यादिवशी संध्याकाळी अशीच लेका सोबत बसून त्याचं स्टडी शेल्फ आवरताना दाराची बेल वाजली. नवरा नुकताच ऑफिसमधून आलेला. त्याची पूजेची ती वेळ. देवाला दिवा लावणार ईतक्यात कुणी आले म्हणून दरवाजा उघडून पहावा तर एक सेल्सवुमन साधारण पन्नाशीतली किंवा त्याहून अधिकच वयाची असावी. फिनेल वगैरे विकणारी, पण चांगल्या घरातली दिसत होती, तब्येतीने धडधाकट, कपाळावर लालभडक मोठं कुंकू, हिरव्या रंगाची सोनेरी काठाची साडी, हातात हिरव्या बांगड्या, तेल चोपडून घट्ट आवळलेला अंबाडा. काखेत पर्स आणि एका पिशवीत ह्या फिनेलच्या बाटल्या. मी तिला दारात पाहून खरंतर अचंभित झाले. कारण वॉचमन ने तिला वर

2

येऊच कसं दिलं तेही यावेळी..?

"ताई..! फिनेल घ्या ना. फक्त पंधरा रुपये."

यावर मी काही बोलणार या आधीच माझा नवरा तिचं तेवढं बोलणं ऐकूनच गरजला.

"कोणी पाठवलं तुम्हाला वरती..? नकोय आम्हाला असलं काही." आणि तो पुन्हा पूजेला लागला.

मी तिच्याशी समजावणीच्या सुरात बोलू लागले.

"ताई नकोय मला. आम्ही हे फिनेल वापरत नाही."

"तुझ्या भल्यासाठीच आहे. घर साफ होईल. फक्त पंधराच तर रुपये आहे. सकाळपासून धंदा नाय झाला." ती रडू लागली. मला कसंसच झालं. म्हटलं तिला मदत म्हणून घ्यायला काय हरकत आहे. पण एवढ्यात नवरा दरडावला, "तू अजून तिच्याशी बोलत काय उभी आहेस..? बाई..! नकोय म्हटलं ना तुम्हाला एकदा."

ती बिचारी तिथेच घुटमळत मागे वळली. मी दार लावून घेतलं.

"अरे..! बिचारी गरीब होती. पंधरा रुपयांनी काय एवढं मोठ्ठ जाणार होतं आपलं..?"

"प्रश्न पंधरा रुपयांचा नाही उद्या आम्ही कोणी घरात नसताना आली कोणाला घेऊन मग..? तू एकटी असतेस, लोकांचा भरोसा आहे का हल्ली..?"

मी पुन्हा आपल्या कामाला लागले. पण नवऱ्याने मात्र पूजा होताच वॉचमन ला कॉल केला. आणि सेल्सवुमन ला वर पाठवण्या बद्दल चांगलेच झाडले. पण त्याच यावर उत्तर ऐकून तर आमच्या साहेबांचा पाराच चढला. तो म्हणे तिथेच बसून आहे कधीचा. अशी कुणी सेल्सवुमन आलीच नाही. मग मात्र सोसायटी च्या सेक्रेटरी पर्यंत मजल गाठत वॉचमन खोटं बोलतोय हे सिद्ध करण्यासाठी आमचे हे सी सी टी व्हि कॅमेरा पहायला गेले. आणि बेचैन होत परतले. शेजारच्यांना देखील त्या सेल्सवुमन बद्दल विचारणा केली असता तिने कुणाचेही दार वाजविले नसल्याचे समजले.

3

"अरे..! काय झालं काही सांगशील तरी..? सी सी टी व्हित दिसलीच असेल ना ती..?"

"नाही ग. वॉचमन दिसतोय आणि ईतर दोघ तिघं गेलेली देखील दिसली पण ती सेल्सवुमन काही दिसलीच नाही. कमाल आहे. ती आली कुठून मग..?" नवरा विचार करता करता आत निघून गेला. मीही ते ऐकून एकदम सुन्नच झाले. माझ्या आईने तर याचा अर्थ ती लक्ष्मी असावी असा लावला. अगदी सेम टु सेम आपल्या मार्गशीर्ष महिन्यातील लक्ष्मी व्रतातली. अशीच म्हातारीचं रूप घेऊन राणीची परीक्षा घ्यायला येणारी महालक्ष्मी. मी फारशी देव वगैरे मानणारी नसल्याने मला काही ते पटलं नाही. देवाला कुठाय वेळ आपल्या सारख्या तुच्छ जीवांकडे पहायला? हे सगळं कथा कहाण्यांमध्ये वाचायला बरं वाटतं.

असो, नव्या घरातला अवघा चौथा दिवस तो... ही घटना काय घडून गेली. आणि आयुष्यातील सारी चक्र बदलायला लागली खरी. असेल योगायोग. दुसऱ्याच दिवशी ब्रेकफास्ट करता करता हे म्हणाले मी जॉब सोडतोय. आम्ही एकदम अवाक् होऊन त्यांच्याकडे पहात राहिलो. का बरं? सारं व्यवस्थित चालू होतं. नवं घर. खर्चाचे ताळमेळ जमायला हवे होते अजून आणि ह्यांनी जॉब सोडतो म्हटल्याबरोबर मी व माझा लेक आम्ही दोघे दिडमूढ झालो. "होईल काहीतरी सोय. पण माझं आता मन लागत नाही तिथे. मी पाहीन काय ते. तुम्ही नका टेन्शन घेऊ." असं म्हणत त्यांनी वेळ मारून नेली. मी मग फारसं काही विचारलं नाही उगाच स्वारी चिडायची. म्हटलं असेल काहीतरी यांचं ठरलेलं प्लॅनिंग. आणि तो विषय तिथेच संपला. त्यांनी राजीनामा दिला.माझी आई मात्र म्हणत राहिली, "बघ दाराशी तिन्ही सांजेला आलेल्या लक्ष्मीला रिकाम्या हाती धाडलंस. म्हणून नोकरी सोडायची दुर्बुद्धी झाली याला." मी तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं खरं पण मनात एकवार विचार चमकून गेला. माझ्या घरची लक्ष्मी तर जाणार नाही ना ?

आमचे चिरंजीव आपल्या दहावीच्या अभ्यासात रंगले. त्याला मात्र आम्ही घरातल्या परिस्थितीच कोणतंही टेन्शन येऊ दिलं नव्हतं. तरी तो काही लहान नव्हता सारं समजत होतं. परिणाम तर अभ्यासावर होणारच होता. नव्वद टक्क्यांवर मार्क मिळाले असते पण 87% ने त्याचा निकाल लागला. यातही मी खुश होते. कॉलेज

4

ऍडमिशन आणि इतर घाईगडबडी सुरू झाल्या आणि नव्या विश्वात त्याने पदार्पण केले. सोबत तारुण्याचा उंबरठाही चढला. शाळेच्या सुरक्षित भिंती ओलांडून कॉलेजातले नवखे जग पहायला तो सज्ज झाला.

वर्षं होऊन गेलं तरी हे मात्र घरीच होते. आता तर त्यांचा मोबाईल वाजणे सुध्दा बंद झाले होते. डिप्रेशन, फ्रस्ट्रेशन साऱ्या भावभावनांचा गुंता मनातून कोलमडून टाकत होता. बऱ्याचदा स्वतःचेच शव जागेपणी यांना दिसायचे. सतत कुणीतरी पाठलाग करतंय, आपल्याकडे पहातंय असेही वाटायचे. त्यांची तशी अवस्था पहावत नव्हती. मी मनातून पार घाबरून गेले होते, भास आभास याची चक्र अशी काही सुरू झाली की कधी कधी वाटे हे वेडे होतील किंवा असेच आम्हाला सोडून कुठेतरी निघून जातील म्हणून मी सतत सावली सारखी यांच्या मागे असायचे. पण त्यात मनाला दिलासा म्हणजे यांचा देवावर भलताच विश्वास होता. रात्र रात्र जागून असायचे. नामस्मरण अखंड चालू असायचे. अगदी लहानपणापासूनची सवय. आधी पासूनच संकष्टी, मारुतीचा शनिवार, दत्तांचा गुरुवार असे सगळे उपास तापास करायचे. मला मात्र उपवास कधीच जमले नाहीत. सिनेसृष्टीत असून देखील कसले व्यसन नाही की मित्र परिवार नाही. यांचे हे गुण पाहूनच वीस वर्षांपुर्वी आमच्या लग्नाला घरून होकार मिळाला होता.

एकेदिवशी असेच नोकरीच्या शोधात एका मिटिंग साठी दादरला ते गेले असताना स्वामींच्या मठाजवळून जाता-जाता आरती ऐकू आली आणि त्यांची पावलं तिथे वळली. तो दिवस स्वामींच्या मठातील पारायणाचा पहिला दिवस होता. त्यांना तिथे मनाला हवी ती शांती लाभली. आणि त्यानंतर भारावल्या सारखे कुणाचे बोलावणे आल्याप्रमाणे नित्य नियमे ते परायणाला जाऊन बसू लागले. सलग अकरा दिवस. गुढीपाडव्याचा आदला दिवस पारायणाचा शेवटचा. त्यादिवशी हे नेहमीप्रमाणे घरी यायला निघाले आणि वाटेत पंढरपूरच्या वारकरी संप्रदायातील एका म्हाताऱ्याने त्यांचा हात घट्ट पकडला. तो शिधा मागत होता. पण आसपास किराण्याचे दुकान नसल्याने यांनी त्याला शंभर रुपये देऊ केले पण अहं..! त्याने ते घेतले नाही उलट, "मी सांगतो तिकडे एक दुकान आहे चल तिथे आणि मला जे जे हवे ते दे घेऊन" असे तो हक्काने

5

म्हणाला. तेव्हा तर यांना वाटले आता एकतर खिशात फारसे पैसे नसताना हा कितीचं बिल करेल तिथे कुणास ठाऊक पण तो काहिकेल्या ऐकेना. "चल अरे बाबा तुझ्याच भल्यासाठी सांगतोय मी.." असे म्हणत ओढत त्याने कबुतर खान्या जवळील एका दुकानापाशी यांना नेत दोन खाकरा, पाव किलो चणा डाळ, सुके खोबरे असे काहीसे चार पाच वस्तू अगदी थोड्या थोड्या प्रमाणात घेतल्या साधारणपणे एकशे पाच रुपये बिल झाले. त्याने ते घेतले तोंडभरून आशीर्वाद दिले अन तो आला तसाच गेला. ह्यांनी घरी येताच सारा प्रकार आम्हाला सांगितला आणि माझी आई पुन्हा म्हणाली तुला साक्षात विठ्ठल भेटला बघ. सगळी स्वामींची कृपा. मी मनात म्हटलं असं काही नसतं. त्यांची कृपा असती तर यांची अशी नोकरी सोडायची बुद्धी झाली असती का?

दुसऱ्या दिवशी गुढीपाडवा होता पण सण साजरा करण्यात मला मुळी रसच नव्हता. त्यामुळे तो दिवस जसा उजाडला तसा मावळला. विशेष सांगायचे झाल्यास त्यादिवशी एक घटना मात्र अशी घडली जिने आमच्या अस्तित्वाला जागेपणी हाक दिली. व्हॉट्सऍप वर एक व्हिडिओ क्लिप माझ्या आई द्वारे आली. "मी देवाचे एवढे करतो पण मला यश का नाही..?" डॉ. सुनील काळे यांचे या विषयावर स्पष्टीकरण होते त्यात. हा प्रश्न यांच्या डोक्यात सध्या थैमान घालतच होता आणि नेमके त्याचे उत्तर गवसले. ती व्हिडिओ क्लिप पाहिली आणि त्यातले विचार यांना इतके पटले की यांनी भरल्या डोळ्यांनी मला सांगितलं, "बघ ही व्यक्ती जर भेटली ना तर माथा यांच्या चरणावर ठेऊन त्यांना गुरू मानीन मी." खरंतर यांच्या असे बोलण्याने मी चक्रावून गेले. कारण गुरू वगैरे थोतांड आम्ही दोघेही मानत नव्हतो. पैसे कमवण्यासाठी लोक काहीही सोंग रचतात. हल्ली आपण ही बाबागिरी पहात आहोतच की. शिवाय उपदेश देणे सोपे असते पण आचरणात आणणे कठीण. तरीही मला माझ्या नवऱ्याला या नैराश्यातून लवकरातलवकर बाहेर काढायचे होते. आणि डॉ. काळे ही व्यक्ती इतर बाबा किंवा महाराज गेटअप मधली वाटत नव्हती सगळी शास्त्रीय मीमांसा, सायन्सचा आधार घेऊन साध्या सरळ भाषेत स्पष्ट केलेले रोजच्या जीवनातील प्रश्न आणि त्यांची सोपी करून दिलेली उत्तरे. यु ट्यूबवर त्यांचे ईतर व्हिडीओ देखील पाहिले एकंदरीत आवडलं मलाही, पटलं सारं. गुगलवर ताबडतोब सर्च केला आणि पुण्यातील स्वयंप्रकाशी या संस्थेशी जुळलेले डॉक्टर सुनील शशिकांत काळे ह्या व्यक्तिमत्वा

6

विषयी थोडक्यात माहिती मिळाली. फोन नंबर मिळाला. आणि एकदा कॉल करून तर पाहू भेटायला जमते का? अशाच विचारांत तो दिवस संपला.

दुसऱ्या दिवशी मात्र आम्ही सगळे दर वर्षी प्रमाणे स्वामींच्या वाढदिवसा निमित्त मठात गेलो. तेवढाच यांच्या मनाला आधार म्हणून मला बरे वाटत होते. दिवस आनंदात छान गेला.

सकाळी उठल्यावर आधी स्वयंप्रकाशी, पुणे येथे कॉल केला डॉक्टर चारच दिवसांनी मुंबईत येणार असल्याचे समजले. मी अपॉइंटमेंट घेऊन टाकली. आणि व्हिडीओ क्लिप मिळाल्या पासून अवघ्या सहा दिवसांत आम्ही त्यांच्यासमोर होतो. आम्ही बाहेर बसलो होतो अगदी तेव्हापासूनच ते त्यांच्या केबिन मधून सहज आमच्याकडे पहात होते. आम्ही जाताच ते म्हणाले," या झी टी व्ही वाले मी तुझीच वाट पहात होतो." माझा नवरा त्यांच्या चरणांवर कोसळला. त्याला तसं लहान मुला सारखं रडताना पाहून मलाही अश्रू आवरेना. माझा नवरा झी टी व्ही मध्ये कामाला होता गेल्या बारा वर्षांपासून. नोकरी सोडल्या पासून ज्या विचत्र घटना आम्ही गेली दोन वर्षे अनुभवत होतो ते सारे डॉक्टरांना ठाऊक होते. त्यांचे असे अचानकपणे आमच्या आयुष्यात येणे ही स्वामींचीच ईच्छा असावी असे आता मला वाटू लागले. त्यांनीच आमच्या मदतीसाठी डॉक्टरांना पाठविले होते. आपल्या दिव्यदृष्टीने डॉक्टरांनी आमची कर्म, गतजन्मीचे भोग सारे गूढ उलगडले. एकेक सत्य त्यांच्या तोंडून ऐकताना विश्वास अधिक दृढ होत गेला. क्षमाप्रार्थनेचे त्यांनी जे महत्व सांगितले ते ऐकून तर वाटले असे दिवसभरात आपण कित्येकांची मने नकळत दुखवतो म्हणजे त्या प्रत्येक जीवातील विठ्ठलाचा आपण अपमान करतो. देव दुसरीकडे कुठेही नसून तो हर एक कणात, मनात, प्रत्येक जीवात आहे. मी विचारचक्रात हरवून गेले. त्यांचे बोलणे ऐकत रहावे आणि त्यांच्या हसऱ्या आशावादी चेहऱ्याकडे एकटक पहात रहावे एवढीच भावना मनात उरली होती. "फक्त मी सांगतो त्या व्यक्तींना आठव त्यांची क्षमा माग दहा दिवसांत तुला गेलेली नोकरी मिळेल." असं ते ठासून म्हणाले. आणि एक नवं चैतन्य घेऊन आम्ही तिथून घरी येण्यास निघालो.

नित्यनियमाने डॉक्टरांनी सांगितलेले क्षमा मागणे सुरू होते. दुसर्यांना न दुखवता

7

आदराने प्रेमाने वागवणे चालू झाले. डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर असे आचरणात आणताना कठीण जात होते पण ते करण्यात जो आनंद मिळत होता त्या अनुभूतीने तसे वागण्यास आम्ही नकळत पुढाकार घेत होतो.

आणि काय आश्चर्य त्यांनी म्हटल्या प्रमाणे दहा दिवसांच्या आत अवघ्या नवव्या दिवशी आम्ही पुन्हा डॉक्टरांना भेटलो ते नोकरी मिळाल्याची बातमी घेऊनच. खूप खूप आनंद मनात होता, त्यांच्या विषयीचा आदर आणि विश्वास त्या दिवसापासून आज तागायत क्षणाक्षणाला वाढतोय. कुठले तंत्र नाही मंत्र नाही केवळ वाईट स्वकर्मांची स्वीकृती. आणि इतरांबाबत जजमेंटल न होता क्षमा करण्याचा मनावर घातलेला संस्कार.

|| मृगास माझ्या अनुभुती जाहली कस्तुरी ती माझ्याच ठायी.

मन प्रकाश आता शोधत नाही, मीच काजवा,मीच विठाई.

नवी वाट, नव्या आशा मम तेजाने उजळल्या दाही दिशा.

सद्गुरू मायेची सारी जादू,

क्षमा महादेवा..! आता मी तुला का शोधू..?||

अशाच विचारांनी मन जणू आनंदाचे झाड होऊन डोलू लागले होते. जगण्याला नवी दिशा मिळाली होती. आत्मज्योती वरील जणू काजळी निघाली आणि स्वच्छ होऊन देहात उजळू लागली होती. मन प्रकाशाच्या वेगाने वैकुंठ गाठू पहात होते. केवळ प्रेम हीच भावना उरली होती. सातत्याने याचा अभ्यास करता करता आता सवय झाली आहे असे म्हणायला हरकत नाही. मानवी जन्माचा गूढार्थ आणि ह्या नश्वर देहाचे मोल त्यांनी आम्हाला पटवून दिले.असे डॉक्टर सुनील काळे म्हणजे आमचे लाडके आदरणीय सद्गुरू दादा. परमपूज्य पट्टेकर महाराजांचे शिष्य. गुरूंची कृपा झाली की कसा साधारण मनुष्यही तेजपुंज शिवाच्या स्थानी विराजमान होतो याचे जिवंत उदाहरण. नाहीतर मुंबईत गिरगावातील डॉक्टर घराण्यातील साधारण डॉक्टर असलेले आमचे दादा आज हजारोने आमच्या सारख्या वाट चुकलेल्यांना मार्गदर्शन करीत आहेत. हा काफ़िला वाढतोच आहे. ना कुठे जाहिरात ना कोणताही पब्लिसिटी स्टंट. सध्या

8

केवळ जो त्यांच्याशी जुळेल तो ही दिव्यत्वाची अनुभूती घेतोय हा माझा स्वानुभव आहे. यातील एक एक शब्द मी अनुभवलेला आहे. काल्पनिक असे काही नाही. उलट गेल्या वर्षी कोल्हापूर च्या महालक्ष्मीला गेले असता तशीच वयस्क हिरव्या साडीतील म्हातारी बाई माझ्याकडे पंधरा रुपये मागायला आली त्यावेळी मला रडूच कोसळलं. मी कसबस स्वतःला सावरलं आणि तिला सुट्टे पैसे नसल्याने वीस रुपयांची नोट दिली पण तिचा हट्ट चालूच होता. "पंधरा रुपये दे फक्त.." मी लगेच बाजूच्या दुकानातून पैसे सुट्टे केले आणि तिला पंधरा रुपये दिले तिने आनंदाने मला आशीर्वाद दिला आणि गर्दीत ती दिसेनाशी झाली. ही घटना गुरू लाभल्या नंतर अनुभवली. पुन्हा जणू लक्ष्मीची कृपा झाली. अगदी तिच्याच दारात. गुरू आपल्या आयुष्यात किती महत्वाचे आहेत हे आज समजलं. आजही पावला पावलाला त्यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरत आहे. विश्वास बसणार नाही असे चमत्कार आम्ही रोजच्या जीवनात जगत आहोत. जणू परीस स्पर्श व्हावा तसे जीवन बदलून गेले आहे. जगण्याचा दृष्टिकोन बदलला. जगाकडे पहाण्याची वृत्ती बदलली. एकाच विचारातून, एकाच अणुतून आपण सारे बनलो. सारेच एकमेकांशी कनेक्टेड आहोत. मग जर आपल्या कुटुंबाला आपण प्रेमाची वागणूक देऊ शकतो तर आपल्या आसपास वावरणाऱ्या समाजाला का नाही? देव कोणत्याही मंदिरात सापडत नसून मंदिराबाहेर बसलेल्या गरीबांत वास करतो याची जाणीव झाली ती सद्गुरू दादांमुळे.... खरंच गुरू आपैसी भेटती...!

या हृदयीचे त्या हृदयी ज्ञान तुम्ही जे दिले,

कसे फेडू ऋण त्याचे भाव सारे जे दिले.

अळवा वरच्या थेंबाला या मोल हिऱ्याचे दिले,

अंतरीच्या निर्गुणाला जागेपणी साद दिली,

  • घायाळ माझ्या पंखांना उडण्याची याद दिली,
  • अडखळत्या श्वासांना शब्द दिले,रूप दिले,

    9

    प्रेम द्यावे, प्रेम घ्यावे अंतरी ही वृत्ती दिली,

    हृदयी नाम कोरिले, अशी दृढ भक्ती दिली,

    कसे फेडू ऋण आई..? मला नवा जन्म दिला.

    सोसूनी अनंत कळा, फुलविलास हा मळा.

    आनंदाच्या झाडाला चांदण्यांचा बहर दिला.

    गुरुमाई, कृष्णाई, तू विठाई अन शिवाई तू,

    हृदयी स्थापिले चरण तुमचे, गुरुमाऊली,

    आता संगे सोबतीला सतत तुमची साउली.

    तेजोनिधी किरणांनी उजळल्या दाही दिशा,

    त्यात विरघळोनि गेली मम देहातली निशा.

    ओमकार घुमता कानी चढली ऐसी नशा,

    शिवतांडव नसांत व्हावा ऐसी झाली दशा.

    ज्ञान तुम्ही जे दिले ते हृदयी करिते मी जतन,

    आचरणी आणीता, झाले मम 'परिवर्तन.'

    सौ. दीप मेथे...

    ***

    6 - डोमडीमनीष गोडे

    एका काळ्या रात्री सुमारे दोन वाजता, एम्बुलेंसच्या आवाजाने मी जागा झालो..! कोण म्हणुन सहज स्ट्रीटलाईटच्या उजेडात बघण्याचे प्रयत्न करीत होतो. एम्बुलेंस, जवळच एका झोपडीसमोर उभी झाली. जीव धाडकन झालं... काय झालं, कोण गेलं... अशे एक-ना-अनेक प्रश्न पडत होते.

    “धनूचा नवरा गेला वाटतं...” जवळच उभी बायको म्हणाली..! थोड्याच वेळानी धनू म्हणजे धनश्रीच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. आम्हा सगळ्यांना खूप वाईट वाटत होते, पण एकदा गेलेला माणूस कधी परतुन येतो का..? आमच्या डोळ्यासमोरून धनू आणि तिच्या भूतकाळात घडलेल्या बर्याच गोष्टी, एक मागून एक चित्रफीतीप्रमाणे येत होत्या. विचारांचा चक्र जस-जसं झोपेत रुपांतरीत होत होतं, तस-तसं धनूच्या रडण्याचं आवाजही मंद पडु लागलं..!

    धनूला दोन मुलं होती, एक सहा वर्षाचा मुलगा आणि दुसरी पाच वर्षाची मुलगी. दिसायला ती काळी-सावळी होती, म्हणून तिचा नवरा तिला प्रेमाने “डोमडी” असा हाक मारायचा..! एरवी तो तिला कधीही कूणाकडे कामाला नाही पाठवायचा, ना घरकामाला ना कूठल्या नोकरीला..! ती नेहमी म्हणायची,

    “अहो, मलासुद्धा कामावर जाऊ देत जा.., तितकेच आपल्या घराला हाथभार होईल आणि मी पण आत्मनिर्भर होईल..!” पण त्यानी कधी तिचे ऐकले नाही.

    “तू मुलं आणि घरदार सांभाळ, मी आहे ना काम करायला..!” असा तो नेहमी म्हणायचा. बाहेरचे जग आपल्या बायकोकडे वाईट नजने बघेल, अशी त्याची समझ असावी. रात्रंदिवस ऑटोरिक्शा चालवुन तो आपल्या बायको-पोरांचा सांभाळ करीत होता. थकूनभागून आल्यावर थोडीशी पीतपण होता. जशी सोबत, तश्या सवयी आपोआप लागतात.., नाही का..? मेहनतीचे काम करणारे, मजूरवर्ग यांना संध्याकाळी थोडी घेतल्याशिवाय झोप लागत नसावी..! असो.

    एके दिवशी धनूच्या नवर्याला ऑटो-स्टँडवर चक्कर आली आणि तो खाली रस्त्यावर कोसळला..! त्याच्या सोबतच्या ऑटो-ड्राईवरांनी त्याला लगेच हॉस्पिटलला नेले, पण तो आधीच मरण पावला होता. ऑटोप्सी रिपोर्टप्रमाणे त्याच्या मेंदूत गाँठ आल्याचे कळले, ती फूटल्या कारणाने तो चक्कर येऊन पडला असावा. ऑटो आता धनूच्या घरासमोर एकटाच उभा रहायचा. तिचे मुले त्यात बसून खेळायचे, कोण होता आता त्याला चालवायला..? हळू हळू धनूची परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली. घरात होतं ते सगळं संपायला लागलं. माझ्या बायकोनी तिला घरकामाला यायला बोलविले, पण तिनी चक्कं नकार दिला, म्हणाली,

    “ह्यानां आवडत नव्हतं..! होते तेव्हां काही काम करू दिले नाही, आता उपासमारा होत आहे. मुलांच्या शाळेची फी भरायला सुद्धा पैसे नाही आहे..!”

    “मग आता काय करणार..?” बायकोनी विचारले. ती काहीही न बोलता, खाली मान करून निघून गेली. मला तिचं जरा नवलच वाटलं. मरेल पण वाकणार नाही, अशी ती वागत होती. मी तिच्यासाठी काहीच करू शकत नव्हतो, तसंही मी बायांपासून दोन हाथ लांबच असतो. कारण पुरूषांनी जर परक्याबाईची चांगल्या अंतःकरणानी जरी मदद केली, तरी बघणार्याला अनर्थ काढायला एक क्षण सुद्धा लागत नाही..! हा युगच आगळा-वेगळा आहे. स्त्री-पुरूषांचे संबंध, आदी सारखे पवित्र राहिले नाही. तरूण भाऊ-बहीण जरी सोबत जात असले तरी याचा वेगळाच अर्थ लावल्या जातो. घोर कलयुग आहे हा..!

    धनू कशी बशी दिवस काडीत होती. तिचे मुले आता शाळेतसुद्धा जात नव्हते. ऑटो उभा-उभा खराब होण्यापेक्षा त्याला किरायानी दे, असे तिच्या नवर्याच्या एका मित्रानी तिला एके दिवशी सुचविले. तिला ते योग्यही वाटले आणि धनूने आपला ऑटो त्या माणसाला विश्वासाने देऊन दिले. काही दिवस व्यवस्थित गेले, तो संध्याकाळी तिला पैशे आणून द्यायचा. धनूला तितकाच आधार वाटत होता त्याचा. तिने देवाचे आभार मानले. दसर्याच्या दिवशी त्याने ऑटो धूवूनपुसून काडले, फूलांनी सजवून पूजा केली. नारळ फोडून प्रसाद वाटला, थोडा वेळ मुलांसोबत खेळुन तो परत जायला लागला, तितक्यात धनूनी त्याला थांबवुन संध्याकाळी जेवण करायला सांगितले. तो हो म्हणुन निघुन गेला.

    संध्याकाळची रात्र होत आली होती, पण तो जेवायला आला नाही. वाट पाहता पाहता तिला झोप यायला लागली. “धनू...!” कुणीतरी तिला हाक मारली, ती जागी झाली..!

    “खूप उशीर केलं यायला..?” तिने विचारले.

    “हो.., बराच उशीर झाला..!” तो म्हणाला. धनूनी त्याला जेवणाचे ताट वाढले. दहा वाजत आले होते, जेवण आटोपल्यावर त्याने धनूला विचारले,

    “धनू... माझ्यासोबत पाट (दुसरे लग्न) लावशील..?” धनू अचानक असा प्रश्न ऐकल्यावर घाबरली..! काय उत्तर द्यायचे, तिला कळत नव्हतं, त्याचे तिरस्कारही करू शकत नव्हती, कारण त्याच्याच सहार्याने, सद्यस्थितीत तिचे घर चालत होते. आणि तो ही काही चुकीचे बोलत नव्हता, दोघांना एकामेकाची गरज होती. ती काहीही बोलली नाही. त्याने सुद्धा जास्त जोर दिला नाही. “तू विचार करून सांग, काही घाई नाही आहे..!” तो धनूला सांगत निघुन गेला..!

    धनूच्या डोळ्याची झोपच उडाली होती..! तिचा नवरा जाऊन जेमतेम सहा महीने होत आले होते, तिला आपले जूने दिवस आठवायला लागले..! मागच्या वर्षी दसर्याला सगळेजण रावणदहनासाठी आपल्या ऑटोनी गेलो होतो. जत्रेत त्याने धनूला नवीन बांगड्या आणि पायातली चांदीची चाळ घेऊन दिल्या होत्या..! ती किती खुश झाली होती..., मुलांना फूगे आणि लाकडी तलवार घेऊन दिली होती. मुलगा हातात ती तलवार घेऊन “जय श्रीरामचा” जयघोष करीत इकडुन तिकडे उड्या मारीत होता..! परत घरी येतांना मारूतीच्या देवळात त्यांनी “सोनं” (आपट्याचे पानं) वाहीले आणि मग घरी येऊन आदी आपल्या देवघरात नंतर एकामेकाला सोनं दिले होते..! मुलं बाहेर पळाल्यावर त्याने तिला घट्ट मिठीत भरले... आणि म्हणाला,

    “डोमडे... पुढच्यावर्षी तुला सोन्याच्या बांगड्या घडवून देणार..!” “नक्की..?” तिने विचारले. “अगदी सोळा आणे..” तो म्हणाला..!

    दोन थेंब तिच्या डोळ्यातून खाली घसरले...! पाहटेचे चार वाजत आले होते..! तिने डोळे पूसले आणि मुलांजवळ झोपायला गेली. पण झोप काही लागत नव्हती..! नशीबानी अशी थट्टा केल्यावर कशी लागणार होती तिला झोप...? दुसरे लग्न करायचे की नाही, आपल्या मुलांचे कसे होईल, ते शेवटी सावत्र मुलंच गणल्या जाणार होते..! माणसाचे काय, त्याला ती फक्त रात्री एक सहचरी म्हणून हवी होती, पूढे त्यांचे मुलं झाले कि तिच्या आपल्या मुलांकडे आपोआप दुर्लक्ष होत जाणार होते..!

    “नाही...” ती पुटपुटली..., मी आपल्या मुलांना अश्या वार्यावर सोडू शकणार नाही. मी त्यांच्यासाठी जगेल, आपल्या नवर्याचे स्वप्न पूर्ण करणार, त्यांना चांगल्या शाळेत शिकविणार, त्यांना त्यांच्या पायावर उभे करणार..! अशे मनाशी घट्ट निर्धार करून ती झोपी गेली.

    “आई.., सकाळचे सात वाजले..!” मुलीने धनूला उठविले..! धनू पटकन उठली आणि घरातल्या कामात गुंतून गेली. नऊच्या सुमारास ‘तो’ ऑटो घ्यायला आला, धनूनी काहीही न बोलता त्याला ऑटोच्या किल्या दिल्या. तिची मानसिक तैयारी नव्हती, त्याच्या प्रश्नाचे उत्तर तिला सापडत नव्हता. काय सांगू त्याला, तिला काहीच कळत नव्हतं...!

    संध्याकाळी तो जेव्हा ऑटो परत करायला आला, तेव्हां धनूनी त्याला म्हटले, “दादा, तुझे आमच्यावर, माझ्या मुलांवर खुप उपकार आहे..! तू जर नसता तर आमच्यावर उपासमाराची वेळ आली असती..! तू देवा सारखा आमच्या मदतीला धावून आला, किंबहुना त्यांनीच तुम्हाला जणू आमच्या करीता पाठविले असणार..! एक उपकार अजून करशील..?” त्यानी प्रश्नवाचक नजरेनी तिच्याकडे बघितले...?

    “काय..?” तो म्हणाला.“तुम्ही मला ऑटो चालविण्याची शिकवणी आणि लायसंस मिळवून द्याल..?”

    एक क्षण तो विचारातच पडला.., त्याला आपला अपमानसुद्धा झाल्यासारखे वाटले असेल, पण तो पटकन सावरला..., रुमालाने घाम पूसत, चेहर्यावर हास्य फुलवित म्हणाला,

    “का नाही.., आपल्या वहिणीसाठी इतकंही करू शकणार नाही का..?”

    तिच्या डोळ्यात पाणी आले, या वेळेस मात्रं ते सूखाचे अश्रु होते...! धावतच ती घरात गेली आणि आपल्या नवर्याच्या फोटोपुढे हाथ जोडत म्हणाली,

    “खरचं, तुम्हाला आमची काळजी आहे हो..!! तुम्ही गेलात पण तिथूनसुद्धा आमची पाठराखन करीत आहात..!”

    “डोमडे... मी सदैव तुझ्या पाठीशी आहे, कूठल्याही रुपात तुमचे सांभाळ करणार आहे.., हे माझे वचन आहे तूला..!” तिनी मान वर करुन फोटोकडे बघितले आणि तिच्या डोळ्यातून सजलधारा वाहू लागल्या..!!!

    ***

    7 - नितळ

    परशुराम माली

    श्वेता आणि दिपाली लहानपणापासून मैत्रिणी अगदी जीवाला जीव देणाऱ्या. एकमेकींपासून काहीही लपवून ठेवायच्या नाहीत. कुठेही जायचं झाल तरी नेहमी एकत्रच जाणाऱ्या, एकमेकींपासून क्षणभरही दूर रहायला घाबरणाऱ्या या जिवलग मैत्रिणी होत्या. एकमेकींशिवाय दोघींनाही करमत नव्हते.आयुष्यातील प्रत्येक प्रसंग एकमेकींना सांगणाऱ्या आणि एकमेकींच दु:ख वाटून घेणाऱ्या या मैत्रिणी होत्या.एखादा महत्वाचा निर्णयही एकमेकींच्या सल्ल्यानेच घेत असत.

    कॉलेजमधील सर्वजण त्यांना दोस्ताना म्हणून चिडवायचे.मैत्रीला दृष्ट लागावी असच काहीस त्यांच्या बाबतीत घडल. दिपाली सुरज नावाच्या एका मुलावर खूप प्रेम करत होती. ती नेहमी दिवस रात्र त्याचाच विचार करायची, त्याच्यासाठी ती वेडी झाली होती. कॉलेजमध्ये नेहमी त्याचीच वाट पहायची.सुरजसाठी काहीही करण्याची तिची तयारी होती. कुणालाही न सांगण्याच्या अटीवर श्वेताजवळ दीपालीने सुरजला प्रपोज करण्याची इच्छया बोलून दाखवली. अशा कठीण प्रसंगी श्वेताशिवाय आधार देणार असं कुणीच नव्हत.

    दीपालीची होणारी घालमेल श्वेताला पाहवत नव्हती. श्वेताने दीपालीला साथ देण्याचे ठरवले आणि श्वेता दीपालीला म्हणली, असं मनात ठेवून झुरत बसण्यापेक्षा एकदाच मन मोकळ कर. दिपाली घाबरत – घाबरत म्हणाली, पण त्याने नकार दिला तर त्यावर श्वेताने दीपालीला धीर दिला आणि म्हणाली तुझ प्रेम निस्वार्थी आणि सच्चे आहे असं काही होणार नाही. मी तुझ्या सोबत आहे. तू घाबरू नकोस, यामुळे दीपालीला धीर आला.एकदाच दीपालीने सुरज जवळ मन मोकळ करायचं ठरवलं सोबत श्वेता होतीच.

    दीपालीने सुरजला एका कॉफी शॉपमध्ये भेटायला बोलावले. त्या दिवशी दिपाली थोडी उदास दिसत होती. एकदाचे तिघे कॉफी शॉपमध्ये आले. कॉफी झाल्यानंतर सुरजने घाईघाईने दिपालीला विचारले...

    का बोलावले मला? काही प्रॉब्लेम आहे का? तसा सुरज आमचा पहिल्यापासूनचा चांगला मित्र होता त्यामुळे त्याला भेटताना दोघीनाही अवघडल्यासारखे वैगेरे होत नव्हते पण भीती नक्कीच होती कारण विषयच तसा होता.

    दिपाली अडखळतच म्हणाली मला थोड बोलायचं होते. त्यावर सुरज अधीर होऊन म्हणाला, बोल लवकर काय बोलायचे ते मला उशीर होतोय.त्यावर दिपाली म्हणाली, सुरज मी तुझ्यावर खूप प्रेम करते.तू मला खूप आवडतोस, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे.दिपाली हे सर्व पट्कन बोलून गेली. एका क्षणाला सुरजला काय करायचे तेच कळेना. थोड्याच वेळात स्वतःला सावरत सुरज दीपालीला म्हणाला, मला माफ कर दिपाली, तुझे प्रेम मी समजू शकतो पण माझ प्रेम एका दुसऱ्याच मुलीवर आहे. सूरजच्या मुखातून हे शब्द येताच दीपालीला आभाळ कोसळल्यागत झाले,काय करायचे तेच कळेना, दीपालीच्या डोळ्यातून अश्रू ओघळायला लागले.श्वेता पूर्ण हताश झाली होती. समुद्राच्या वाळूने नाव कोरावे आणि लाटांनी ते नाव पुसावे असेच काहीसे दिपाली बरोबर झाले होते.

    श्वेताने दीपालीला धीर दिला आणि श्वेता सुरजला रागारागाने म्हणाली,कोण आहे ती मुलगी? यावर सुरज म्हणाला, श्वेता तूच ती मुलगी आहेस, जिच्यावर मी जीवापाड प्रेम करतो. त्या क्षणी दीपालीला धक्काच बसला आणि श्वेताला आश्चर्य वाटले. श्वेता स्वत:ला सावरून रागारागाने सुरजला म्हणाली, तू काय बोलतोयस ते तुला काही कळतय का? तुझे डोके ठीकाण्यावर आहे का ? तू हे खूप चुकीचे केलेस, खरे प्रेम करणाऱ्या व्यक्तीला लाथाडले आहेस हे विसरू नकोस असे म्हणताच, सुरज तिथून रागारागाने निघून गेला. श्वेता दीपालीला घेवून तिथून निघुन आली. दिपाली चार- पाच दिवस या धक्क्यातून सावरली नव्हती. तिकडे श्वेताचे मनही श्वेताला खात होते.

    दीपालीचा गैरसमज तर होणार नाही ना...? मी तिला फसवले असे तर तिला वाटणार नाही ना...? या आणि अश्या प्रश्नांनी श्वेता घायाळ झाली होती. खर तर श्वेताचे सुरज बरोबरच्या मैत्रीच्या नात्यापलीकडे असे कोणतेच नाते नव्हते पण सुरज श्वेतावर एकतर्फी प्रेम करत होता हे ना श्वेताला कळाले ना दीपालीला.

    मी या दोघांच्या नात्यामध्ये आल्यामुळेच या दोघांचे नाते तुटले, असे श्वेताला वाटू लागले.श्वेता दिपालीशी नजरही मिळवू शकत नव्हती. ती स्वतःला अपराधी मानु लागली. स्वतःला मी कधीही माफ करू शकणार नाही. असा दोष श्वेता स्वतःला देवू लागली.

    काही दिवस श्वेता दीपालीला टाळत होती. ही गोष्ट दीपालीच्या लक्षात आली. दीपालीने श्वेताला रस्त्यात अडवले आणि दिपाली श्वेताला म्हणाली तुझी काहीच चूक नसताना तू मला का टाळण्याचा प्रयत्न करतेस? यात तुझा काय दोष? प्रेम हे कोणावरही होऊ शकते. दोघींनीही एकमेकाला मिठी मारली आणि रडू लागल्या.

    श्वेता रडत रडतच दीपालीला म्हणाली, तू माझ्याबरोबर असलेली मैत्री तोडणार तर नाहीस ना...? मला सोडून तर जाणार नाहीस ना...?

    दिपाली श्वेताला सावरत म्हणाली अगं वेडे आपली मैत्री इतकी नाजूक आहे का? आपली मैत्री कुणाच्याही येण्या- जाण्याने थोडीच तुटणार आहे? असे अनेक सुरज मी तुझ्यासाठी कुर्बान करेन. तू मनाला लावून घेवू नको. आजपासून आपल्यासाठी सुरजचा विषय संपला आहे. या सर्व प्रसंगातून दिपाली आणि श्वेता यांच्या मैत्रीच्या नात्याची वीण घट्ट होत गेली. एकमेकींच सुख – दु:ख हे एक झाल होत. दोन शरीर एक जीव अस नात या दोघींचं झाल होत. अशाच आणखी एका घटनेने श्वेता आणि दिपाली खूपच जवळ आल्या

    एक दिवस दिपाली आजोबांना पेपर वाचून दाखवत होती. ती पेपर वाचता वाचता थांबली तिला काहीच कळले नाही. तिने श्वेताच्या बाबांना अटक झाल्याची बातमी वाचली आणि सुन्न झाली. श्वेताच्या बाबांवर चोरीचा आरोप झाला होता.दिपालीने लगेच श्वेताला फोन केला पण तिने तो उचला नाही ही बातमी वाऱ्यासारखी पसरली.सर्व लोकांच्यात कुजबुज सुरु झाली होती.त्यामुळे श्वेता कॉलेजला आली नव्हती.

    तिची विचारपूस करण्यासाठी दिपाली तिच्या घरी गेली.दीपालीला पाहून श्वेताला रडू कोसळले. हि खरी दिपालीच्या आयुष्याची कसोटीची वेळ होती. दिपाली श्वेताला शांत करत तिला धीर देवू लागली. अलीकडे श्वेताने कॉलेजला येणेही बंद केले होते. दीपालीने श्वेताला तिची शपत घातली आणि कॉलेजला येण्यासाठी आग्रह केला. मी असल्यावर तुला चिडवायची आणि त्रास द्यायची कोणाचीही हिम्मत नाही. माझ्या मैत्रिणीच्या केसालाही मी धक्का लागू देणार नाही. तू काळजी करू नको आणि स्वताला एकटी समजू नको.मी तुझ्या सोबत आहे. असा धीर दीपालीने श्वेताला दिला.

    हे सर्व ऐकून श्वेताला गहिवरून आले. दिपाली श्वेताला म्हणाली हे बघ श्वेता जेव्हा माझ्या आयुष्यातून माझी आवडती व्यक्ती गेली त्यावेळी त्या धक्क्यातून तू मला सावरलीस, तू आधार दिलास तुझ्यामुळे आज मी सुरजला विसरू शकले तसेच तुझ्या कठीण प्रसंगी मी तुला साथ देणे हे माझे कर्तव्यच आहे.जगाची पर्वा करू नको तुझे जसे ते बाबा आहेत तसे माझेही आहेत तू उद्या कॉलेजला येशील, मी वाट बघेन. दिपाली श्वेताचा हात हातात घेवून म्हणाली. श्वेताचा होकार येताच दिपाली आनंदाने घरा बाहेर पडली.अस हे दीपालीच आणि श्वेताच सुख दु:खात एकमेकाला साथ देणार नितळ मैत्रीच नात निरंतर तेवत आहे.

    ***