Addiction - 2 - 14 books and stories free download online pdf in Marathi

एडिक्शन - पर्व दुसरे - भाग 14

भरपूर दिवसानी अजिंक्यशी मनमोकळा संवाद झाल्याने मृणाल खुश होती ..त्याने तिला अस्वस्थ असण्याच कारण विचारलं असताना तिने चुप्पी साधली होती ..पण तिने पुढे काही दिवसाच मनात होणारी घालमेल त्याला सांगायचं ठरवलं ..ती त्यासाठी एका अचूक संधीची वाट पाहू लागली ..फक्त प्रश्न हा होता की ती संधी तिला मिळणार की नाही ?

काही दिवस झाले होते ..अजिंक्यच्या जवळच्या मैत्रिणीचा विवाह सोहळा होता ..घर बाजूलाच लागून असल्याने सर्व तयारी मध्ये तो त्यांना मदत करत होता ..विवाह रविवारला असल्याने त्याला सुट्टीच टेंशन नव्हतं शिवाय हॉलमधली सर्व अरेंजमेंट पण नीट झाली होती ..अजिंक्य सकाळपासूनच हॉलमधील सर्व तयारी पाहत होता ..सकाळपासून कामात असलेल्या अजिंक्यला वेळेचं भानच नव्हत ..काम बऱ्यापैकी आटोपलं होत आणि हॉलमध्ये लोकांची गर्दी वाढू लागली ..मुलगीही तयार होण्यासाठी हॉलला पोहोचली ..तर मुलगा काहीच अंतरावर नाचत गाजत हॉलकडे येऊ लागला ..हे सर्व असताना अजिंक्यची मात्र काहीच तयारी झाली नव्हती ..म्हणून तो लगेच घरी परतला ..आईने प्रज्ञाची तयारी करून दिली होती आणि ती स्वतःही तयार झाली ..बाबा तर आधीच हॉलमध्ये पोहोचले होते ..अजिंक्यने फार जास्त वेळ न घेता लवकरच तयारी आटोपली ..आणि बाहेर कार जवळ येऊन त्यांची वाट पाहू लागला ..काही क्षणात आई- प्रज्ञा बाहेर आल्या तर मृणालचा काहीच पत्ता नव्हता ..अजिंक्यला जेवणाची व्यवस्था पाहण्यासाठी राणे काकूंचे फोन वर फोन येत होते पण मृणाल काही बाहेर येत नव्हती ..अजिंक्य घाई - घाईतच आतमध्ये पोहोचला ..तर मृणाल आरशासमोर काहीतरी शोधत होती ..तिच्याजवळ जात तो म्हणाला , " मृणाल आणखी किती वेळ लागणार आहे ? ..मला उशीर होतोय ..काकूंचा बऱ्याच वेळ फोन येऊन गेला .." ती आताही काहीतरी शोधत होती ..हे पाहून अजिंक्यने तिला आपल्या बाजूला वळविले ..मृणाल आज डोक्यापासून तर पायापर्यंत अप्सरेसारखी सजली होती ..जणू आज तिचच लग्न अजिंक्यशी घडून येणार होत ..अजिंक्य तिला पाहतच होता आणि त्याच्या ओठातून शब्द निघाले , " आज काही खर नाही माझं ..नक्कीच वेड लावशील तू मला ..शीट नेहमी असच होत तुझ्यात हरवलो की काहीच भान राहत नाही ..मला सांग तुझी तयारी झाली आहे तर मग बाहेर का नाही येत आहेस ? " आणि मृणाल म्हणाली , " सॉरी अजिंक्य तयारी करत असताना मंगळसूत्राचा धागा तुटला ..त्यालाच ओवायचा प्रयत्न करतेय म्हणून उशीर होतो आहे ..एक काम कर तू जा मी येते एकटीच ..अस मोकळ्या गळ्याने जाण छान वाटणार नाही .." आणि अजिंक्य स्वतःच्या गळ्यातली चैन तिच्या गळ्यात टाकत म्हणाला , " आता तर नाही ना मोकळा गळा ...चल मग ..काहीच वेळेची गोष्ट आहे आल्यावर ओवून घेशील .." ती त्याला समजवायचा प्रयत्न करीत होती पण त्याच्यासमोर काहीच फायदा नव्हता शिवाय अजिंक्यला गळ्यात मंगळसूत्र असलं काय आणि नसलं काय याने कधीच फरक पडत नव्हता त्यामुळे तिने त्याच्याशी वाद न घालायच ठरवलं आणि सर्वच कारमध्ये बसून हॉलला पोहोचले...

हॉलला पोहोचताच अजिंक्य जेवणाची व्यवस्था पाहण्यात व्यस्त झाला ..इकडे मुलगाही विवाहस्थळी दाखल झाला ..काहीच वेळात मुलगीही आपल्या जागेवर स्थानापन्न झाली ..अग्निकुंडाच्या भोवती सात फेरे घेताच ते एकमेकांचे झाले ..हळूहळू लोक जेवण करण्यासाठी बाहेर जात होते तर काही लोक वधू वराला गिफ्ट देण्यात व्यस्त होते ..गर्दीही ओसरू लागली होती ..अजिंक्य कामाची व्यवस्था पाहण्यासाठी इकडे - तिकडे फिरत होता ..फिरत असताना त्याला मृणाल हा शब्द ऐकू आला आणि तो तिथेच थांबला ...पुढचे शब्द होते , " ए उषा बघ अजिंक्यच्या बायकोला !! कशी सजून धजून आली आहे ..पण तू एक गोष्ट बघितली का ? तिच्या गळ्यात मंगळसूत्र नाही ..आजच्या मुलींना न संस्कारच नाहीत ..तशी ही देखील मुबंईची मग आपल्या प्रथा परंपरा कशा माहिती असतील तिला ..चार मुलांनी पाहावं म्हणून एवढी सजून धजून आली असेल ..मग फक्त मंगळसूत्र टोचत का हिच्या गळ्याला ..." , जोशी काकू म्हणाल्या आणि उषा काकू त्यांच्या शब्दाला हमी भरत होत्या ..हे सर्व बोलत असताना अजिंक्य त्यांच्या मागे आहे हे त्यांच्या लक्षातच आलं नाही ..मृणालबद्दल एकूण अजिंक्यला फारच वाईट वाटलं आणि तो सरळ त्यांच्या समोर येत म्हणाला , " हो बरोबर आहे मुंबईची ना ती संस्कार नसतीलच तिच्यात ..मुलांना फिरवायला आवडत अस म्हणू राहिलात जस तुम्हाला सर्वच माहिती आहे ..आणि राहिला मंगळसूत्र लावण्याचा प्रश्न ..तर तिने का लावलं नाही ते एकदा तिला विचारून बघायचं होत मग काय तो निष्कर्ष काढा की उचलली जीभ आणि लावली टाळ्याला ..आणि ती मुलांना फसविण्यासाठी सजून आली आहे तर तुम्हीही या वयात सजून आला आहात , का ते कळेल मला ? " अजिंक्यच्या बोलण्याने त्यांना मिरची झोम्बली आणि जोशी काकू त्याच्यावर ओरडत म्हणाल्या , " तोंड आवर अजिंक्य ..आम्ही काय इथे मुलांना लुभविण्यासाठी आलो आहेत ..जा आपल्या बायकोला सांग जी मंगळसूत्रविना फिरते आहे ..तिला सांग संस्कारबद्दल .." काकूंचा आवाज इतका वाढला होता की अजिंक्यची आई , मृणाल तिथे पोहोचली ..जोशी काकूंचा शब्द अजिंक्यच्या मनाला इतका लागला की तोही त्यांच्यावर ओरडत म्हणाला , " मला नका सांगू संस्काराबद्दल .आधी स्वतःच्या घरात झाकून बघा किती अंधार आहे तर मग दुसर्यांना बोला आणि बायको माझी आहे तिने मंगळसूत्र लावो की नाही ही तिची इच्छा ..तुम्हाला बोलण्याचा काहीच हक्क नाही .." आई अजिंक्यला आवरण्याचा प्रयत्न करीत होती पण अजिंक्य शांत होईना ..आणि समोर जोशी काकू मृणाल बद्दल काहीही बोलत होत्या ..वातावरण अगदीच तापलं होत ..त्यांच्याभोवती सर्व गोळा झाले ..अजिंक्य आईच काहीच ऐकत नाही म्हणून आईने तिथेच त्याला कानाखाली मारली आणि अजिंक्य रागात हॉल बाहेर पडला ..मृणाल त्याला थांबवायचा प्रयत्न करीत होती पण तो आज कुणाच काहीच ऐकणार नव्हता ..त्याने कार सुरू केली आणि लगेचच पसार झाला ..

अजिंक्य तर हॉल सोडून गेला होता पण आईने सर्व स्थिती सावरली ..आईने कधी नव्हे तो अजिंक्यवर हात उचलला त्यामुळे तिला त्याची काळजी वाटत होती ..मृणालला तर अजिंक्यकडे केव्हा जातेय असच जात होतं पण जवळच लग्न असल्याने ते सोडून येन शक्य नव्हतं त्यामुळे कशीतरी संध्याकाळ काढली आणि बिदाई होताच ते घरी पोहोचले ..घरी पोहोचले तरीही अजिंक्यचा पत्ता नव्हता ..त्याला मृणालने बरेच फोन केले पण त्याने एकही रिसिव्ह केला नाही ..घरचे सर्व चिंतेत होते आणि अजिंक्यच्या येण्याची आतुरतेने वाट पाहू लागले ..साधारणतः नऊच्या दरम्यान तो घरी पोहोचला...दारावर त्याची सर्व वाट पाहत असताना तो त्यांच्याकडे दुर्लक्ष करून बेडरूममध्ये पोहोचला ..मृणालने आज त्याला पहिल्यांदाच इतक्या रागात पाहिलं होतं ..त्याच्यासमोर जाण्याची तिची हिम्मत होत नव्हती तरीही ती हिम्मत करून आत पोहोचली ..तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्यानेही तिच्याकडे पाहिले ...अजिंक्य तिच्याकडे पाहू लागला ..त्यांच्या डोळ्यात राग होता आणि तो राग सांगत होता की आज त्याला तिच्याशी बोलायच नाही ..ती त्याला अस बघून घाबरली आणि काहीच न बोलता बाहेर निघून गेली ..

मृणालला बाहेर येताना पाहून अजिंक्यच्या रागाच कारण आईला समजलं ..आई आत जात म्हणाल्या , " अजिंक्य इतकं आयुष्य झालं मी तुझ्यावर कधीच हात उचलला नाही पण आज उचलाव लागलं .तू चुकला म्हणून नाही पण वाद वाढू नयेत म्हणून त्यामुळे सॉरी पण माझा राग इतरांवर काढू नको बाळा ..मी चुकले मला माफ कर .." आईचे शब्द एकताच अजिंक्यच्या लाल बुंद डोळ्यात अश्रूंनी जागा घेतली आणि आईचा हात थांबवत तो म्हणाला , " मी नाही रागावलो ग तुझ्यावर ..तुझा हक्क आहे माझ्यावर ..मग तू मारलंस तरीही चालेल .." आणि आईने त्याला आपल्या मांडीवर घेतलं ..त्याचे अश्रू तिने आपल्या साडीने पुसले ..अजिंक्य आपले अश्रू मोकळे करत म्हणाला , " नाही रागावलो तुझ्यावर पण जोशी काकू मृणाबद्दल जे काही बोलल्या ते सहन झालं नाही ..ती तर मंगळसूत्र लावूनच येणार होती पण उशीर होईल म्हणून मी तिला लावू दिलं नाही आणि फक्त एवढ्या छोट्या गोष्टींचा त्यांनी मोठा इशू केला ..शिवाय मृणाबद्दल काही बाही बोलत होत्या म्हणून मला सहन झालं नाही आणि मीही रागात त्यांना बरच काही बोलून गेलो .." आई त्याच्या डोक्यावरून हात फेरत म्हणाली , " हो कळतय मला ..मला माहिती आहे माझा मुलगा कसा आहे तर ? " आणि पुन्हा अजिंक्य बोलू लागला .." आई एक विचारू का ग ? आज गोष्ट होती ती फक्त मंगळसूत्राची ..जर स्त्रियाच एवढ्या छोट्याश्या गोष्टीसाठी दुसऱ्या स्त्रीला बोलत असतील तर मग या समाजात त्यांना स्वातंत्र्य कोन देणार ? ..आज मी मृणालसाठी उभा झालोय पण एका स्त्रीनेच मला यासाठी विरोध केला ..तर मग पुरुष त्यांच्यासाठी खरच झटू शकतील ..? " आणि आई त्याच्यावर हसत म्हणाली , " कलियुग आहे बेटा ...जिथे स्त्रियांनाच बंधनातून बाहेर निघायचं नाही त्यात तुझ्यासारखे पुरुष त्यांना स्वातंत्र्य कस मिळवून देणार ..हा असा समाज आहे जिथे सासू आपल्यावर अत्याचार झाला , मला बंधनात अडकवून ठेवलं म्हणून आपल्या सुनेलाही तसच अडकवून ठेवते ..मग पुरुष काय करणार यात .." आणि अजिंक्य विचार करत म्हणाला , " आई हे कधीच बदलणार नाही का ? काकूंनी मंगळसूत्र म्हटलं परंतु मुस्लिम , ख्रिश्चन समाजात तर कुणीच लावत नाही मग त्यांना उत्तम संस्कार दिलें नाहीत ..जीन्सवर बांगड्या , टिकली सूट होत नाही म्हणून स्त्रियांनी त्या सर्व गोष्टींचा त्याग केला ..आज कदाचीतच जोडवे , पैंजण लावताना स्त्री दिसते जर या गोष्टी सोडल्या जाऊ शकतात तर मंगळसूत्र का नाही ..? चला मान्य केलं की ती लग्नातील सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट आहे पण जेव्हा एखादी गरीब स्त्री घरची स्थिती खराब झाली असताना मंगसूत्र विकते त्यावेळी तीच आपल्या पतीसोबत नात तुटल आहे असं होतं का की तीच तिच्या नवऱ्यावर प्रेमच नाही अस होत ? " आई त्याचे प्रश्न एकूण जोराने हसत होती तर मृणालही बाहेर हळूच हसू लागली ..आई स्वताच हसू आवरत म्हणाली , " बाळा ह्या प्रश्नाचं उत्तर मी नाही देऊ शकत ..कधीतरी मीही नव्यानेच या घरी आले होते तेव्हा त्याच गोष्टींना मलाही सहन कराव लागलं ..भरपूर गोष्टी मलाही मन मारूनच जगाव्या लागला नंतर तर त्या जीवनाच्या भाग झाल्या ..अचानक सासू सासरे जग सोडून गेले आणि माझ्यावरची सर्व बंधने आपोआपच शिथिल झाली ..खूप कठीण असत रे समाजाच्या विरोधात जाऊन जग बद्दलवीन ? तू मलाही विचारलं असत तरी मी तुझं बोलणं किती समजून घेतलं असत मला नाही माहीत ..कारण आई वडिलांकडून आयुष्यभर हेच शिकत आलोय सो ते अचानक सोडणं शक्य नाही ..आणि अजिंक्य नाराज होत म्हणाला , " म्हणजे आई मी चुकलो का ग ? " आणि आई त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली , " अजिबात नाही ..तू योग्यच केलंस आणि त्याचा मला अभिमान आहे .तुला माहीत नाही पण तू मृणालशी लग्न केलं आणि तुला मुलगी झाली आहे हे घरच्यांना कळविल तेव्हा आम्हाला घरचे खूप काही बोलले..मला त्याच फार वाईट वाटलं त्यावेळी माझ्याकडे दोन पर्याय होते ..लोकांचं एकूण तुला सोडून देणं की तुला स्वीकारून दोघानाही हवं तितक प्रेम देणं ..मी अशा वळणावर होते जिथे मीच गोंधळले ..आणि जून सोडून नवीन स्वीकारलं ..पण प्रत्येक वेळी असाच निर्णय घेईल हे सांगता येत नाही पण एवढं नक्कीच सांगेल की सास भी कभी बहु थी म्हणणाऱ्या सासुना आपल्याला झालेला त्रास आपल्या सुनेला होणार नाही याची काळजी घेणं गरजेच आहे तरच पुरुष विरोधात असला तरीही जास्तीत जास्त गोष्टी सुधारता येतील ..तू माझा मुलगा आहेस आणि बायकोची एवढी काळजी घेतोस हे बघून फार अभिमान वाटतो ..कधीकधी मृणालमध्ये मी माझे स्वप्न बघते ..खूप अभिमान आहे मला तुम्हा दोघांचा ..आता तरी गेला का राग लाडोबा ? " आणि अजिंक्य हसत म्हणाला , " हो ग आई ..आता जा आणि सॉरी .." आई त्याच्याकडे बघून निघून गेली आणि अजिंक्यही शांत झाला मृणाल त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊन होती ...आई बाहेर आल्या आणि मृणाल देखील किचनला पोहोचली ..

आजची रात्रही मजेशीर होती ..रागात असलेला अजिंक्य मृणालच्या जवळ शांत झोपला होता आणि काही वेळापूर्वी हसत असलेली मृणाल विचारत पडली ..फक्त मंगळसूत्र न घातल्याने जोशी काकूने तिची केलेली नाचक्की तिला मनातून तोडू लागली ..आईचेही काही काही शब्द नकळत तिच्या लक्षात राहून गेले ..माणूस जेव्हा नकारार्थी असतो तेव्हा त्याला नकारार्थीच गोष्टी लक्षात राहतात आणि हेच मृणालच्या बाबतीत घडत होतं ..एका छोट्याश्या गोष्टीबाबत समजात इतका विरोध घडून येत असेल तर माझा भूतकाळ समोर आला तर काय होईल याबाबत तिला विचार येऊ लागले ..तिला खुपच भीती वाटू लागली ..बाजूला झोपलेल्या अजिंक्यकडे तिने एक नजर टाकली ..तो शांत चित्ताने झोपी गेला होता ..त्याच्या डोक्यावरून हात फिरवत पुन्हा ती विचार करण्यात गुंग झाली ..अजिंक्य सदैव माझ्यासोबत असेल यात शंका नाही पण अशी स्थिती आली तर मग ? ..तो माझ्यासाठी घरच्यांच्याही विरोधात जाईल आणि मग नकळत फक्त एक नात वाचविण्यासाठी सर्व नात्यांना दुरावला जाईल ..नाही नाही अस होता कामा नये अस तीच मन सांगू लागल .मृणालला चुकीच बोलल्यावर अजिंक्यला होणार मनस्ताप आज तिने जवळून पाहिला आणि तिने ठरवलं की मला माझ्या भूतकाळाने कितीही त्रास दिला तरी याचा परिणाम मी अजिंक्यवर होऊ देणार नाही ..त्याच्याशी विवाह करण्याचा निर्णय माझा होता आणि हे मला सहन करावंच लागेल ..त्याचा कुठलाही त्रास अजिंक्यला होणार नाही ..त्या रात्री मृणालने आपल्या मनाला मारूनच टाकलं आणि नको ते जीवन जगू लागली ..

एक - एक दिवस समोर जात होता पण तिच्या डोक्यातील विचारचक्र मात्र थांबल नव्हतं..सदैव तेच विचार तिला मनातून घायाळ करत होते ..याच काळात पुन्हा एक किस्सा घडला ..अजिंक्यच्या काकांच्या मुलीने पळून लग्न केलं ..त्या दिवशी घरात उहापोह माजला होता ..घरातला प्रत्येक व्यक्ती तिला शिव्या देत होता ..घराण्याच नाव डुबवल , आजपासून तू आम्हाला मेली आहेस अस तिचे आई बाबा बोलून मोकळे झाले ..तर अजिंक्यची आई समोर असून सुद्धा काहीच बोलल्या नव्हत्या ..अजिंक्यच्या बाबांनी देखील त्यांना बरेच खडे बोल सुनावले होते ..त्यांच्याही नकळत त्यांचा प्रत्येक शब्द तिच्या मनावर परिणाम घडवून आणत होता आणि मृणाल तिच्या जागी स्वताला अनुभवू लागली ..मृणालला अजिंक्यची आई काय म्हणते ते पाहायचं होत पण त्या काहीच न बोलल्याने तिची मानसिक अवस्था अस्थिर झाली ..आणि तिला तीच मन सांगू लागलं ..मृणाल तू या जगात एकटीच आहेस ..अजिंक्य सोबत असला तरीही तो प्रत्येक क्षणी तुझ्यासोबत असणार नाही ..आता तुला सर्व सहन करावंच लागेल .. तिची प्रत्येक रात्र आता फक्त विचार करण्यात जाऊ लागली.. मनात सदैव एकच प्रश्न येऊ लागला ..माझा भूतकाळ समोर आला तर ?

क्रमशः ..