Shevtacha Kshan books and stories free download online pdf in Marathi

शेवटचा क्षण - भाग 19

असेच किती तरी क्षण दोघेही मस्ती करत तर कधी प्रेमाच्या भावना व्यक्त करत जगत होते.. मित्रांच्या ग्रुप मध्ये ते नेहमीसारखेच असायचे पण एकांतात कधी भेटून त्यांच्या प्रेमला बहर द्यायचे.. नवेनवे बहाणे देऊन दोघेही कधी बगिच्यात मध्ये तर कधी सिनेमा बघायला जायचे.. तर कधी असच रात्रीच्या वेळेला गच्चीत भेटायचे.. चंद्राकडे बघत किती किती वेळ त्याच्या साक्षीने त्यांच्या प्रेमला आकार द्यायचे..

असच एकदा दोघे एकांतात बसले असताना गार्गीच्या मनातली शंका गार्गी बोलू लागली..

गार्गी - प्रतीक, आपलं हे नक्की प्रेमच आहे ना रे?? तू मला कधी सोडून तर जाणार नाहीस ना??

प्रतीक - काय झालं गार्गी?? तू आज अचानक असं का विचारतेय??

गार्गी - प्रतीक, आईबाबांनी आणि शाळेतही माझ्या वर्गावर येऊन आमच्या मुख्याध्यापिका मॅडम नि आम्हाला समजावलं की या वयात हार्मोनल बदल होत असतात आणि त्यामुळे मुलाला मुलीचं आणि मुलीला मुलाचं आकर्षण वाटू लागतं.. पण या वयात तेवढी समज नसते त्यामुळे आपण या आकर्षणाला प्रेम समजून बसतो आणि पुढे मोठमोठे चुकीचे निर्णय घेऊन आपण पच्छतापाला बळी पडतो.. म्हणून मला अचानक आज प्रश्न पडला की आपलं हे प्रेम आहे का आकर्षण?? आपण मोठं झाल्यावर आपल्यातलं हे प्रेम संपणार तर नाही??

प्रतीक - किती वेडी आणि भोळी आहे ग माझी गार्गी तू... तुझ्या आईबाबांनी आणि मॅडमने अगदी बरोबर सांगितलंय.. ते चूक आहे असं मला म्हणायचं नाहीय पण प्रेम आणि आकर्षण यात अगदी छोटासा पण खूप मोठा फरक असतो, कोणता माहिती आहे??

गार्गी नकारार्थी मान हलवून विचारते..

गार्गी - काय फरक असतो??

प्रतीक तिचे हात हातात घेत तिला सांगतो..

प्रतीक - गार्गी तुझ्या आधी हाच प्रश्न मलाही पडला होता.. पण मी त्याची पडताळणी केली आणि माझ्या लक्षात आलं की हे प्रेमच आहे.. त्यानंतरच मी तुला विचारलं.. गार्गी, अग आकर्षण म्हणजे अगदी तू एकदा बघितलं आणि तुला ते हवंहवंसं वाटलं हे असतं, तर प्रेम हे तू समोरच्याला खूप चांगलं ओळखून पारखून नंतर तुला त्याच्याबद्दल जे वाटतं ते असतं.. सहसा आकर्षणामध्ये शारिरीक सुंदरता आणि समोरच्याची बुद्धिमत्ता किवा व्यक्तिमत्त्व या सगळ्या बाबी असतात.. पण प्रेम हे या सर्वांच्या पुढे असतं.. प्रेमात तू कशी दिसते, यापेक्षा तुझं मन कस आहे हे बघितल्या जातं.. तुझ्यात हा दोष आहे म्हणून तू मला आवडली नाही अस होत नाही तर पूर्ण गुणदोषांसकट दोघेही मनापासून एकमेकांना स्वीकारतात आणि एकमेकांचे दोष आपल्या गुणांनी कमी करण्याचा प्रयत्न करतात.. प्रेमात कुठली गरज नसते ग, ना शारीरिक ना भौतिक.. त्यात तर फक्त भावना असते ती समोरच्याला कायम आनंदी बघण्याची.. आणि गार्गी!! मला तुला कायम आनंदी बघायचं आहे.. आणखी एक म्हणजे आकर्षण असेल तर ते दुरव्याने संपतं आणि प्रेम विरहाने आणखी बहरतं.. आता तूच सांग आपल्यात काय आहे??

गार्गी तर अगदी भारावून गेल्यासारखं त्याच बोलणं ऐकत होती.. त्याच्या प्रश्नाने ती पुन्हा बुचकड्यात पडली..

गार्गी - किती छान समजावून सांगितलं ना तू प्रतीक.. पण मला अजूनही स्पष्ट नाही झालं की माझं प्रेम आहे की तुझ्याप्रतीचं आकर्षण?? तुला खरच वाटतं ना हे प्रेम आहे??

प्रतीक - मला खात्री आहे गार्गी पण तू का एवढी विचलित होत आहे?? तूच सांग तुला काय आवडतं माझ्यात??

गार्गी 2 क्षण पुन्हा विचार करत बसली.. पुढे तोच बोलला..

मी सांगू?? मला काय आवडतं ते??

गार्गी - हो .. सांग..

ती हळू आवाजात थोडं लाजतच म्हणाली.. तसं प्रतीक तिच्याकडे बघून एक एक गोष्ट सांगू लागला..

प्रतीक - मला ना तुझी ही नजर आणि त्यात माझ्या भेटीसाठी असलेली ओढ खूप आवडते, माझ्या नाममात्र नि तुझ्या चेहऱ्यावर उमटणारे हे लाजेच्या लालीचे भाव आणि माझ्या रसिक बोलण्याने तुझ्या हृदयाची होणारी धडधड खूप आवडते.. तुझं निर्मल मन आणि माझ्यासाठीची तुझी काळजी मला आवडते.. माझ्या खाण्यापिण्याची, माझ्या अभ्यासाची, माझ्या नात्यांची!! ... कारण त्यात तुझं प्रेम दिसतं.. तुझा हसरा चेहरा मला खूप आवडतो, तुझ्या सुखासाठी मी काहीही करू शकतो गार्गी.. मला तुझी शारीरिक ओढ नाही ग तर भावना जुळल्या आहेत माझ्या, तुझ्या हृदयाशी.!!. माझ्या हृदयात अगदी खोल खोलपर्यंत फक्त तू आणि तूच आहेस.. आणि तुझही माझ्यावर प्रेमच आहे.. तू जरी विचलित असली तरी मला खात्री आहे.. कारण मला ते प्रेम तुझ्या डोळ्यात दिसतं.. मी कधी गावाला गेलो की माझ्या विरहाने तू किती सैरभैर होते आणि मी दिसल्यानंतर जे समाधान तुझ्या चेहऱ्यावर झळकत असतं .. अग वेडे हेच प्रेम आहे..

गार्गी - किती किती गोड गोड बोलतोस ना तू?? मला ना तुझं अस मनाला मोहून टाकणारं बोलणं खूप आवडतं खरंच..

त्याचे दोन्ही गाल ओढत ती बोलली..

गार्गी - जाऊ दे सोड कुठला विषय घेऊन बसले मी आज... तुझ्या सगळ्या बोलण्यावरून तर मला पटतंय की माझ्याही मनात प्रेम भावनाच आहेत..

प्रतीक - हम्म.. किती अवघड आहे तुला समजावून सांगणं बापरे.. धाप लागली मला..

तिला चिढवण्याच्या आणि वातावरण हलकं करण्याच्या दृष्टिने तो नाटकी धाप टाकत बोलला.. आणि तिनेही एक धपाटा त्याच्या पाठीत ठेऊन दिला..

2 वर्षांपासून रोज सोबत काही क्षण तरी घालवणारे त्या दोघांची पुढे ताटातूट झाली ती शिक्षणासाठी बाहेरगावी जावं लागल्या मुळे.. प्रतीक 2 वर्ष पुढे होता म्हणून गार्गी 11वी ला असताना तो पुढच्या शिक्षणासाठी बाहेरगावी निघून गेला होता.. फोनवर ते नेहमी संपर्कात असायचे.. भेट होत नसली तरी संवाद सुरू होते.. दोघांचे शैक्षणिक मार्ग वेगवेगळे होते... प्रतीकची कला शाखा होती आणि गार्गीची विज्ञान शाखा.. पुढे प्रतिकने D.ED ला ऍडमिशन घेतली होती, आणि गार्गीच्या 12 वी झाल्यावर तिला इंजिनिअरिंग ला प्रवेश मिळाला..

प्रतीकच d. ed आणि गार्गीच इंजिनिअरिंग च पाहिलं वर्ष सोबतच झालं.. त्यानंतर त्याला नोकरी करायची होती पण नोकरी मिळाली नाही म्हणून नोकरी मिळे पर्यंत पुढचं शिक्षण घ्यायचं त्याने ठरवलं.. आणि गार्गीचही शिक्षणं सुरूच होतं.. रोज तासंतास त्यांच्या फोनवर गप्पाही सुरू होत्या.. फक्त परीक्षेच्या काळात काय तो तेवढा त्यांच्या गप्पांना आराम भेटायचा.. घरी आले की पुन्हा दोघेही एकमेकांना भेटायचे.. काही दिवस सोबत जगून त्याच आठवणींच्या शिदोरीसोबत पुढचे विरहाचे दिवस काढायचे..

पण काही दिवसांनंतर अचानक प्रतिकनी गार्गीशी बोलणं थांबवलं.. कधीतरी बोलायचं ते ही अगदी तात्पुरतं.. तो तिला टाळायला लागला.. गार्गीला काहीच कळत नव्हतं बतो अस का वागतोय.. विचारलं तर उडवाउडवीची उत्तर द्यायचा.. त्याच असं वागणं तिला खूप त्रास देत होतं.. म्हणून तिने नेमकं काय झालंय याचा तपास करायचं ठरवलं.. तेव्हा तिला सहज बोलत बोलत निशा ताईकडून कळलं की "प्रतीक आजकाल खूप डिस्टर्ब राहतो, काय झालंय काही कळत नाही, नोकरीला घेऊन त्याला खूप टेन्शन आलाय अस वाटतय बहुतेक... "..

तो अस कधीपासून वागतोय नेमकं त्याआधी अस काय झालं असं विचारल्यावर निशाताईने जे सांगितलं त्यावरून गार्गी सगळं समजून गेली...



-------------------------

क्रमशः