Shevtacha Kshan books and stories free download online pdf in Marathi

शेवटचा क्षण - भाग 21


आता प्रतिकच्या अश्या तुटक वागण्यामागचं कारण गार्गीला कळलं होतं.. आणि त्याची मनःस्थिती तिनेही समजून घेतली.. कदाचित या सगळ्याचा काही सकारात्मक परिणामही होऊ शकतो अस तिला वाटलं पण प्रतिक शिवाय तिला खूप अवघड जात होतं..

दोन दिवसांनी तिने पुन्हा प्रतिकला फोन केला आणि प्रतिकने तो उचलला ..

तिने मनातच.. " हुश्श, थँक्स देवा.."

प्रतीक - हॅलो..

तिकडून काहीच आवाज आला नाही.. म्हणून त्याने पून्हा..

हॅलो.. हॅलो.. गार्गी..

गार्गी - हा.. हॅलो..

प्रतीक - अग काय झालं? फोन करते आणि बोलत नाही..

गार्गी - अरे नाही तस नाही.. तू फोन उचलला म्हणून देवाला धन्यवाद करत होते..

प्रतीक - फोन मी उचलला ना मग मला धन्यवाद दे , देवाला कशाला?

गार्गी - अच्छा.. तुझा मूड झाला माझ्याशी बोलण्याचा यासाठी त्यालाच धन्यवाद देईल ना मी..

प्रतीक - बरं .. जाऊ दे काय म्हणतेस?? कशासाठी केला फोन..

गार्गी - तुला सांगायला की तू अस का वागतोय त्याच कारण मला माहिती झालं.. पण प्रतीक सगळ्यांच आयुष्य सारखाच असेल अस कशावरून..

प्रतीक - तुला कस कळलं?? आणि काय कळलं??

गार्गी - मला निशा ताईंनी सांगितलंय सगळं.. रेणुका ताईची आपबीती .. आणि तुला वाटतय की आपलं पण तसाच होईल म्हणून तू अस वागतोय ना.. अरे पण अजून खूप वेळ आहे या सर्व गोष्टींना प्रतीक.. तोपर्यंत तुला कुठे न कुठं नोकरी मिळूनच जाईल..

प्रतीक - गार्गी , या विषयावर तुझ्याशी बोलणं माझ्यासाठी खुप अवघड आहे ग..पण तू विषय काढलाच आहेस तर... गार्गी जर मला नोकरी मिळालीच नाही तर?? तुझ्या घरचे मान्य करतील आपल्या नात्याला?? आपल्या घरचे मानले नाही तर?? त्यांना सोडून आपण राहू शकू?? राहून पण घेऊ पण पुढे काय?? प्रेमाने पोट नाही भरत... आणखी एक गोष्ट आहे गार्गी ती तुला माहिती नसेल.. मी काही कामानिमित्त तुझ्या घरी गेलो होतो .. तेव्हा असच काकूंशी बोलता बोलता रेणुका ताईचा विषय निघाला.. आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक अनामिक भीती मला दिसली ती भीती कोणती माहिती आहे?? "माझी मुलगी पण असाच काही वाकड पाऊल टाकणार नाही ना कधी?? " ही होती.. त्यांनी बोलून दाखवलं नाही पण मला कळलं.. नंतर मी त्यांना सहजच विचारलं त्यांना जावई कसा हवाय तेव्हा त्यांनी जे वर्णन केलं त्यात मी कुठेच नव्हतो गार्गी.. मला त्यांच्या चेहऱ्यावर ची भीती सत्यात नाही आणायची गार्गी आणि त्यांना कुठलाच दुःख होईल असही नाही वागायचं.. आपल्या घरचे किती विश्वास ठेवतात ना गार्गी आपल्यावर आणि आपण किती सहज त्यांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचे काम करतो ग.. आणि तू म्हणत होती ना वेळ आहे अजून या सर्व गोष्टींसाठी पण गार्गी अग ही चूक आज सुधारली नाही तर आणखी उशीर होईल..

गार्गी - वाह प्रतीक!!! आपलं प्रेम चूक वाटतेय तुला?? आणि या सगळ्यात माझा विचार केला तू?? माझ्या मनाचा, माझ्या भावनांचा विचार केला तू?? हे सगळं प्रेम कबुल करण्या आधी का नाही सुचलं तुला?? मी बोलू शकली नाही म्हणून तूच बोलला होता ना रे..

प्रतीक - गार्गी, माझ्यासाठीही सोपं नाहीय हे सगळं विसरणं पण विसरावं लागेल आपल्याला.. खूप काही नाही झालंय.. काही दिवस एकमेकांशी बोललो नाही, आपला संपर्क राहिला नाही की अपोआप विसर पडेल.. आपलं प्रेम चूक नाही ग पण आपल्या घरच्यांची फसवणूक करणं त्यांच्या विश्वासाचा गैरफायदा घेणं हे तर चूक आहे ना!!! आणि मला म्हणायचं होत की आजपासुन प्रयत्न केले तर वेळीच सावरू आपण.. प्लीज या सर्वाला आणखी अवघड नको बनवू.. आणि मला माफ कर..

गार्गी - एक मिनिटं, विसर म्हणजे?? अरे तूच बोलला ना विरहाने प्रेम संपत नाही आणखी बहरतं.. मग?? कस विसरू सांग?? इतकं सहज कस बोलून गेला तू प्रतीक.. अरे आपण घरच्यांना विश्वासात घेऊन समजावू या.. अरे कुठल्याच आईवडिलांना त्यांच्या मुलांच्या आनंदापुढे काहीच महत्वाचं नसतं.. आणि मी तुझ्यासोबत कुठल्याही परिस्थितीत आनंदी राहील प्रतीक.. पण अस विसरून आणि सोडून जाण्याचा नको रे बोलू..

प्रतीक - हेच चुकतं ना गार्गी आपलं, आपल्या आनंदासाठी आपण त्यांच्या आनंदाचा त्यांच्या स्वप्नांचा विचारच करत नाही, नेहमी त्यांना गृहीतच धरून चालत असतो.. आपण काहीही केलं तरी ते स्वीकार करतीलच अस आपल्याला वाटत किंवा आपण तस गृहीत धरतो पण तस जेव्हा होत नाही तेव्हा ते आई वडील आपले जन्मदाते आपल्याच साठी वाईट.. असं आपल्याला वाटायला लागतं.. आपल्याला लहानच मोठं करून चांगलं आयुष्य जगायला देणारेच आपले वैरी वाटू लागतात.. आता रेणुका ताई आणि आशिष दादाचंच प्रकरण घे ना.. किती लाडाची होती रेणुका ताई तिच्या घरच्यांची..तिची कधी कुठलीच इच्छा किंवा मागणी नाकारली नाही त्यांनी.. पण कुठे केला त्यांच्या आई वडिलांनी त्यांच्या नात्याचा स्वीकार?? तसच जर आपल्या बाबतीत घडलं तर... गार्गी रेणुका ताईला ज्या अवस्थेत मी बघितलं ना त्या अवस्थेत मी तुला कधीच नाही बघू शकणार.. तू जरी माझ्यासोबत कुठल्याही परिस्थिती राहायला तयार असली तरी माझ्या या प्रेमामुळे मी तुझ्या आयुष्याचा, तुझ्या सुखांचा बळी नाही घेऊ शकत.. म्हणून मी बोलतोय ग .. मला समजून घे प्लीज, चुकीचे अर्थ नको घेऊ.. यापुढे आपण फक्त पूर्वीसारखे मित्र असू.. या काही दिवसात , वर्षात जे होतं ते एक स्वप्न समजून विसरून जा गार्गी..

बोलत बोलत प्रतिकचा आवज कातर झाला होता, त्याला पुढे काहीच बोलवलं नाही आणि गार्गीच्या अश्रुंचे बांध तर केव्हांच फुटले होते.. प्रतिकने तसाच फोन बंद केला आणि त्याच्या आसवांना वाट मोकळी करून दिली.. गार्गीने कितीही समजावलं असत तरी प्रतिकने त्याचे निर्धार पक्के करून घेतले होते.. त्यामुळे सांगूनही काहीच उपयोग नव्हताच..

दोघांचीही ती रात्र डोक्या खालची उशी भिजवण्यात गेली.. पुढे दोघांनीही कधी हा विषय त्यांच्या बोलण्यात येऊ दिला नाही.. गार्गीला वाटायचं की तो विषय छेडला तर हा जे बोलतो तेही बोलणार नाही.. आणि त्याच्याशी मैत्री तर मैत्री पण काहीतरी नातं आहे ना.. मैत्रीतही प्रेम असतच की.. म्हणून तिने स्वतःला सावरलं.. तसाच प्रतिकनेही एक सकारात्मक दृष्टिकोन उराशी बाळगून नोकरी मिळवण्याचे कसोशीने प्रयत्न सुरू केले ,त्याला वाटत होतं निदान नोकरी असली तर मला गार्गीला कुठेतरी योग्य बनता येईल आणि जर शक्य झालच तर तिला घरच्यांच्या संमतीने त्यांना नीट समजावून सांगून परत मिळवता येईल.. पण त्याचे सगळे प्रयत्न अपयशी ठरत गेले.. कुठलीच नोकरी मिळाली नाही,

आता तर गार्गीच्या लग्नाच्या गोष्टी सुरु झाल्या होत्या मग त्यानी तिला परत मिळवण्याची पूर्ण आशाच सोडून दिली..

गार्गीने डोळ्यात पाणी घेऊन तिचा भूतकाळ गौरवपुढे मांडला.. त्याला सगळं सांगून तिला फार मोकळं वाटत होतं पण काल झालेली प्रतीक आणि गार्गीची चॅटिंग मात्र तिने सांगायचं टाळलं..

गौरवने सगळं शांतपणे ऐकून घेतलं आणि खिचडी झाली असेल मी बघतो म्हणून निघून गेला..

---------------------------------------------------

क्रमशः