Premgandh - 32 books and stories free download online pdf in Marathi

प्रेमगंध... (भाग - ३२)

(आपण मागच्या भागात पाहिलं की अजय आपलं नदिवर राहीलेलं घड्याळ घ्यायला परत येतो... पण तिथे नारायण काका कचरा टोपलीत भरत असतात... अजयपण त्यांना मदत करत असतो. पण तिथे गोविंद आपल्या माणसांसोबत येतो... गोविंद रागातच अजयला मारायला जातो पण तो गोविंदच्या नाकावरच मुक्का मारतो... त्याच्या नाकातून रक्त येऊ लागते... भीम्या ते बघतो आणि अजयला मारायला धावतो... अजयचं राधिकाच्या आवाजाकडे लक्ष जाते आणि तेवढ्यात भीम्या अजयच्या डोक्यात मारतो.... रक्त खूप वाहून जाते त्यामुळे तो बेशुद्ध पडतो... अजयला हाॅस्पीटलमध्ये अॅडमीट केले जाते... आता पुढे...)


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


अजयला सकाळीच शुद्ध येते... अजय ठिक असल्याचं डाॅक्टर सांगतात... सगळ्यांच्या जीवात जीव येतो... अजयच्या आईच्या डोळ्यांतून मात्र अजूनही अश्रू ओघळतच असतात... अजय बोलायचा प्रयत्न करतो पण त्याचं डोकं दुखत असते... त्यामुळे त्याला बोलायला जमत नसते... अर्चना, अमृता वैगेरे सगळे सकाळीच येतात... दोघीही त्याला बघून रडत असतात... सगळ्यांचे चेहरे मात्र साफ सुकुन गेलेले असतात...


कुसुम हाॅस्पीटलपासून घर जवळ असल्यामुळे सगळ्यांना आपल्या घरी येण्याची विनंती करते पण कोणीही अजयला सोडून जाण्याच्या विचारात नसतात...



कूसुम सगळ्यांची राहण्या, खाण्यापिण्याची नीट व्यवस्था करते... कुसुम राधिकाची आत्या आहे हे एव्हाना सगळ्यांना समजलं होतं...


अजयच्या तब्येतीत हळुहळू सुधारणा होत असते... पण त्याच्या डोक्याची जखम अजूनही पुर्णपणे भरलेली नसते... त्याला काही दिवसातच डिस्चार्ज दिला जातो... पण सगळ्यांना त्याची काळजी घ्यायला सांगितली जाते... राधिकाच्या आणि अजयच्या घरचे आपापल्या घरी जायला निघतात... पण कुसुम मात्र त्यांना जाऊ देत नाही... ती सगळ्यांना आपल्या घरी घेऊन जाते...


भालेकर वाड्यासमोर गाडी येऊन थांबते... सगळे गाडीतून खाली उतरतात... वाड्याचा थाटमाट बघून सगळेच अवाक होतात... एवढ्या वर्षांनी आपल्या वाड्यांत पाय ठेवताना राधिकाच्या बाबांचे पाय मात्र थरथरतात आणि डोळे भरून येतात... सगळीकडे ते भोवताली नजर फिरवून बघतात... सगळ्या जून्या आठवणी डोळ्यासमोरून तरळून जातात... पण वाड्यांत बरेचसे बदल झालेले असतात... सगळेच चारी बाजूंनी बघत बघत आतमध्ये प्रवेश करत होते... पण कुसूमने त्यांना थांबवलं आणि नोकरांना आरतीचं ताट आणायला सांगितलं आणि राधिकाच्या आईबाबांना ओवाळलं....


"आज इतक्या वर्षांनी पहिल्यांदाच दोघंपण या घरात प्रवेश करत आहेत...." -- कुसुम.


राधिकाच्या आईबाबांनी वाड्यांत पाय ठेवला... कुसुमने सगळ्यांनाच ओवाळून वाड्यांत घेतलं... सगळेजण आत येऊन बसले आणि सगळेच चारीबाजूंनी वाडा अगदी न्याहाळून बघत होते... खूप सुंदर पद्धतीने, जून्या- नवीन वस्तूंनी वाडा पुर्णपणे सजवलेला होता...


राधिकाचे बाबा आपल्या आईवडीलांचे फोटो ठेवले होते तिथे गेले आणि त्यांना नमस्कार केला... बाजूलाच गोविंदच्या बाबांचा पण फोटो लावला होता... त्यांना पण नमस्कार केला... कुसुम आणि राधिकाच्या आईने पण नमस्कार केला... तिघांचेही डोळे भरून आले होते...


कुसुम - "आईबाबा, बघा आज तुमचा लाडका लेक परत आपल्या घरी परतलाय.... खूप वाईट वागले मी माझ्या भावाशी... आईबाबा माफ करा मला... आता मी माझ्या भावाला कुठेच जाऊ देणार नाही... इथेच ठेवणार आहे, अगदी माझ्या जवळच..." ती हात जोडून म्हणाली...


सगळे त्यांच्याकडेच बघत होते... त्यांना काहीच उलगडत नव्हतं आणि सगळ्यांच्या तोंडावर थोडे आश्चर्याचे भावच होते....


कुसुम - "नाम्या, आता इथून कुठेही जायचं नाही तू कळलं... इथेच राहायचं सगळ्यांनी माझ्यासोबत..."


घरातल्या नोकरांनी त्यांच्या समोर खाण्यापिण्याचे गोड तिखट पदार्थ, फळे, सरबत, पाणी सगळंच आणून ठेवले... कुसुम त्यांना ते घेण्यांस आग्रह करत होती... सगळ्यांना राधिकाचे बाबा आणि कुसूमच्या नात्याबद्दल जाणून घ्यायचे होते, पण कोणीही काहीही बोलत नव्हते... त्यांच्या चेहर्‍यावरूनच ही गोष्ट कुसुमच्या लक्षात आली होती... म्हणून तीने सगळ्यांना सर्व सांगण्याचा निर्णय घेतला...


कुसुम - " तुम्हाला आमच्याविषयी काही गोष्टींचा उलगडा झाला नसेल... तुम्हाला आमच्या नात्याविषयी जाणून घ्यायचं असेल ना... सांगते मी सगळं तुम्हाला..."


अजयचे बाबा - "ताई असं काही नाही, तुमचे ते कौटुंबिक वैयक्तीक प्रश्न आहेत... त्यांत आम्ही कसं पडणार..."


कुसुम - "आमच्यामध्ये असे वैयक्तिक प्रश्न कसले दादा... आता जे काही आहे ते आपलं म्हणून चालायचं... आता तुम्ही आमचे व्याही होणार... राधिका अजयरावांच्या लग्नानंतर आपलं कुटुंब एक होणार... मग तुम्हाला राधिकाच्या कुटुंबाविषयी सगळं माहीती असायला हवं ना..."


अजयचे बाबा - "हो ताई तुमचं पण बरोबरच आहे..."


कुसुमने आपल्या कुटुंबाविषयी अजयच्या घरच्यांना सगळंच सांगितलं... सगळ्यांना ते ऐकून आश्चर्यच वाटत होतं....


कुसुम - "पण आता माझी चुकी मला कळलंय... आता मला माझ्या भावाला माझ्यापासून दूर करायचं नाही... आणि माझ्या पोराच्या वतीने मी तुमची सगळ्यांची माफी मागते..." तिने सगळ्यांसमोर हात जोडले...


अजयचे बाबा - "अहो ताई, तुम्ही का असे हात जोडताय...? आम्हाला तुमच्याविषयी काहीच राग नाही... देवकृपेने माझा मुलगा पण सुखरुप आहे... झालं गेलं गंगेला मिळालं... जाऊ द्या सोडून द्या ते... सगळं काही विसरून आता पुन्हा नव्याने सुरुवात करा... यातच आनंद आहे..."


कुसुम - "हो दादा अगदी बरोबर बोललात तुम्ही... आणि खूप मोठ्या मनाचे आहेत तुम्ही सगळे... पटकन मोठ्या मनाने माफ केलंत आम्हाला..."


अजयचे बाबा - "अहो ताई, असं काही नाही आणि चुका होत असतात माणसांकडून... किती दिवस तेच तेच धरून चालायचं ना... जास्त विचार केला की आपल्यालाच त्रास होतो... म्हणून सगळं विसरून पुढे चालत राहायचं..."


सावित्रीमाय - "पोरा... लाखमोलाची गोष्ट बोललास बघ तू... माणसाने मागे वळुन न बघता पुढे पुढे चालत राहायचं... वाईट गोष्टी तिथल्या तिथे सोडून द्यायच्या, चांगल्या गोष्टी आठवणीत ठेवायच्या... यालाच तर आयुष्य म्हणतात..."


कुसुम - "हो माय अगदी बरोबरच आहे दादांचं आणि तूझं पण..."


अजयचे बाबा - "सावित्रीमाय, खूप छान बोललात बघा तुम्ही..."


सावित्रीमाय - "अनुभवाचे बोल आहेत पोरा, बाकी काही नाही..." ती हसतच म्हणाली.... सगळेच हसू लागले.


अजयचे बाबा - "चला खूप उशीर झाला, आता घरी जायला निघतो आम्ही..."


कुसुम - "नाही नाही, असं कसं लगेच घरी जाणार तुम्ही...? इतक्या वर्षांनी माझा भाऊ घरी आलाय... तुम्ही सगळे आहात... घर कसं छान भरलेलं दिसतंय... थोडे दिवस रहा इथे आणि नंतर घरी जावा... मला पण थोडं बरं वाटेल..."


अजयचे बाबा - "ताई असं कसं राहणार तुमच्या घरी... उगाचच आमच्यामुळे तुम्हाला त्रास... आणि काही कामं वगैरे पण पडलेत घरी... ती करावी लागतील ना... नंतर येऊ आम्ही कधीतरी सगळे..."


कुसुम - "अहो दादा आम्हाला कसला तुमचा त्रास होणार?. उलट आमच्या गावात तुम्ही पहिल्यांदा आलात आणि माझ्या पोरामुळे तुम्हाला इतका त्रास झाला, या गोष्टीचं मलाच वाईट वाटतंय आणि नंतरचा दिवस कधी येत नसतो दादा... आणि कामं काय होतच राहतील... एकदा तुम्ही गेले की परत कधी येणं होईल कोण जाणे... म्हणून आला आहात तर काही दिवस रहा आणि नंतर घरी जा... या मोठ्या बहीणीची तुम्हाला आग्रहाची विनंती आहे असं समजा..." ती हात जोडून म्हणाली...


अजयचे बाबा - "बरं ताई ठीक आहे राहतो आम्ही पण असे सारखे सारखे हात नका जोडू... तुम्ही मोठ्या बहिणीसारख्या आहेत माझ्या..."


अजयची आई मात्र आल्यापासून शांत शांतच होती... ती एक शब्दही बोलत नव्हती... तीच्या मनात सगळा विचारांचा गोंधळ चालू होता... अजयच्या बाबांच्या ते व्यवस्थित लक्षात आलं होतं... पण तीच्याशी नंतर बोलू असं त्यांनी ठरवलं.... कुसुमने राधिका, मीरा, मेघा, सोनाली कडे पाहीलं... चौघीपण शांतच बसल्या होत्या...


कुसुम - "तुम्ही चौघी पण एवढ्या शांत शांत का गं पोरींनो...? अगं लहान तेव्हा धावण्यासाठी पुर्ण घर कमी पडायचं तुम्हाला... दुडुदुडु धावत फिरायच्या सगळीकडे... आपल्याच स्वतःच्या घरी आहात तुम्ही... असं परक्यासारखं वावरू नका... आणि या तुमच्या आत्याकडे काही मागायला संकोचू नका... हक्काने भांडून मागायचं कळलं का...?" चौघीपण आईबाबांकडे बघत होत्या....


कुसुम - "अगं त्यांच्याकडे काय बघताय तुम्ही...? तुझ्या आईबाबांना विचार हि राधी चालायला बोलायला लागली होती, तेव्हा नीट बोलता येत नव्हतं तरी बोबडं बोबडं बोलत किती भांडायची माझ्याशी... मी काही बोलली की मारायला काठी घेऊन माझ्या मागे लागायची... हो ना गं वहीनी..." सगळे खूप हसत होते...


राधिकाची आई - "हो ताई, खरंय तुमचं... राधी लहान तेव्हा लय रागाची... जरा काही बोललं की गाल फुगवून बसायची... पण जसजशी मोठी होत गेली, तशी खूप समझदार होत गेली पोरगी माझी...."


राधिकाचे बाबा - "हो सरू अगदी बरोबर बोललीस... सगळ्या पोरी माझ्या एकदम समझदार झाल्या..."


कुसुम - "एवढ्या दिवसांत सगळेच खूप थकले आहेत... सगळ्यांनी आता आराम करून घ्या... मी दूपारच्या जेवणाची व्यवस्था करते... आणि कोणाला काय हवं असेल तर हक्काने सांगा, आपलंच घर आहे... " सगळे आराम करायला निघून गेले... राधिका अजयला औषध गोळ्या देण्यासाठी त्यांच्या सोबतच गेली...


राधिकाचे आईबाबा संपूर्ण वाडा फिरत होते... त्यांच्यासोबत मीरा, मेघा, सोनाली पण होत्या... त्यांना खूप अप्रूप वाटत होतं.... थोड्या वेळाने त्यांच्यासोबत राधिका पण येऊन उभी राहिली...


मेघा - "बाबा, हा वाडा खरंच आपला आहे का...? आत्या सांगत होती आपण आता इथेच राहायचं... बाबा खरंच आता आपण इथेच राहायचं का...?"


राधिकाचे बाबा - "हो हे सगळं आपलंच आहे, पण आता यांवर आपला काहीच अधिकार नाही... तुमच्या आत्याच्या समाधानासाठी काही दिवस इथे राहुया आणि मग आपल्या घरी आपण निघून जाऊया..."


मीरा - "पण का बाबा आपण इथेच राहू या ना... इथे आवडलं आम्हाला आणि हे पण आपलंच घर आहे मग का जायचं सोडून...?"


राधिकाचे बाबा - "हो बरोबर आहे तुझं, पण आपलं ते घर लहान तर लहान पण ते घर तुमच्या बाबाच्या स्वतःच्या कष्टाच्या घामाचं घर आहे... तिथे चटणी भाकरीपण तूला गोड लागेल बेटा... तुझ्या आजीआजोबांनी जेव्हा हा वाडा उभा केला होता तेव्हा थोडा जून्या पद्धतीचा बांधला होता... पण त्यांत माया, आपुलकी, प्रेम, काळजी सगळंच होतं पण आता हा एवढा मोठा वाडा उभा तर केलाय पण काय माहीती याला किती लोकांची हाय लागली असेल... ते जूनं आपलं मायेचं घर होतं, पण आता ह्या मोठ्या वाड्याला मात्र बेईमानीचा कलप चढलेला आहे... आणि अशा ठिकाणी नाही राहायचं आपल्याला..." त्यांचं म्हणणं सगळ्यांना पटत होतं.... सगळे वरून आजूबाजूचा हिरवागार परिसर बघत होते... तिथून हिरवीगार शेतं, झाडं, गाव सगळं खूप छान दिसत होतं... बाबा चौघींना पण हाताने आपलं सगळं शेतं दाखवत होते... आणि लहानपणीच्या बर्‍याच गोष्टी, आठवणी सांगत होते... तिघींना पण ऐकायला खूप मज्जा येत होती....


अजयच्या घरचे सगळे एकत्रच जमले होते... त्यांच्या सगळ्यांच्या गप्पा चालू होत्या... अजय शांतपणे पडून सगळ्यांच्या गप्पा ऐकत होता... पण मघापासून त्याचं सारखं आईकडेच लक्ष जात होतं... ती खूप शांत शांत वाटत होती... कोणाशी काही बोलतच नव्हती... ती एका साईडला एकटीच खिडकीतून बाहेर बघत बसली होती... अजयने बाबांना इशारा करून विचारलं की, "आईला काय झालंय? बोलत का नाही ती?" यांवर "मी तिच्याशी बोलून बघतो...?" असं त्याला इशार्‍यातच बोलून ते तिच्याजवळ गेले...


अमृता - "अजय, आता बरं वाटतेय का तुला? डोकं थोडं दुखत असेल ना अजून?"


अजय - "हो ताई थोडंसं दुखतंय... पण आधीपेक्षा ठीक आहे आता..."


अमृता - "बरं आराम कर तू थोडा वेळ..."


अजयने डोळे मिटले पण त्याला काही झोप लागत नव्हती... त्याला घडलेले सगळे प्रसंग डोळ्यासमोर येत होते... गोविंदबद्दल विचार जरी आला तरी त्याला खूप राग येत होता... त्याला आता सगळं आठवत होतं की, "पहिल्यांदा गोविंदसोबत वाद झाला होता, तेव्हा राधिका खूप टेन्शनमध्ये आली होती... तिला माझी खूप काळजी वाटत होती आणि तीने सहलीला इथे यायला नकार का दिला होता आणि नदिवर पण मला तिला हेच सगळं सांगायचं होतं..." त्याच्या आता सगळं काही लक्षात येत होतं...


"राधिकाचे आईबाबा किती साधे सरळ गरीब स्वभावाचे आहेत आणि राधिका, तीच्या बहीणी किती समजदार आहेत... आणि त्यांचा फॅमिली बॅकग्राऊंड, त्यांचे नातेवाईक असे गुंड प्रवृत्तीचे आहेत, मी तर कधी असा विचार पण केला नव्हता..." तो मनातच सगळे विचार करत होता. त्याला तर विश्वासच बसत नव्हता, त्याला थोडं अजबच वाटत होतं... त्यांत त्याला राधिकाची थोडी काळजी पण वाटत होती....


अजयचे बाबा अजयच्या आईजवळ जाऊन बसले... पण आईने त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही...


अजयचे बाबा - "सावी, अगं आता आपला अजय ठिक आहे... नको जास्त काळजी करूस... अशी शांत शांत नको राहूस गं... अजयचं पण तुझ्याकडेच लक्ष होतं... तूला माहीती आहे ना तुझ्यावर किती जीव आहे त्याचा... त्याला तूला असं बघून तुझीच काळजी वाटत होती... मला माहीती आहे... तू आई आहेस त्याची... तूला खूप काळजी वाटतेय त्याची पण होऊन गेलं ते एक वाईट स्वप्न होतं असं समजून विसरून जा... नको जास्त विचार करत बसू..."


अजयची आई - "का विचार नको करू मी? आधीच त्याच्यासोबत एवढं काही घडून गेलंय आणि आता परत हे सगळं... पण का...? प्रत्येक वेळी माझाच मुलगा का...? माझ्याच मुलाच्या जीवाशी सारखा सारखा खेळ का होतोय...? एकुलता एक मुलगा आहे माझा तो... आणि त्याच्यासोबतच नियती असे जीवघेणे खेळ का खेळत आहे...? त्याला काही झालं तर मी पण जगू शकणार नाही..." आणि आई रडू लागली.... बाबांचे पण डोळे भरून आले...


अजयचे बाबा - "अगं काही होत नाही आपल्या पोराला... आपला आशिर्वाद सदैव पाठीशी आहे त्याच्या..." अजयचे बाबा अजयच्या आईला समजावत होते....



क्रमशः-


(बघुया पुढच्या भागात काय होते ते...)


[ कथा काल्पनिक आहे, वास्तवतेशी त्याचा काहीही संबंध नाही. तसं काही आढळून आल्यांस तो निव्वळ योगायोग समजावा. कथा आवडल्यांस आपली अनमोल प्रतिक्रिया नक्की कळवा..... ]


🌹💕...Ritika V. Patil... 💕🌹


💕💕 ...प्रेमगंध... 💕💕 - ३२


➖❇️➖❇️➖❇️➖❇️➖❇️➖❇️➖❇️➖❇️
🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀